Sunday, March 20, 2011

जैतापूराचा लोकजीवनावर परिणाम नाही


जैतापूर येथील नियोजित अणू प्रकल्पामुळे तेथील लोकजीवन वा पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही. कैगाचा आमचा प्रकल्प म्हणूनच आम्ही निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेस अणूभट्टीपासून काही मीटरवर झाडे असताना चालवत आहोत, असे कैगा अणू उर्जा प्रकल्पाचे प्रमुख आणि संचालक जे. पी. गुप्ता यांनी मला सांगितले.
ते म्हणाले, लोकांनी सुरवातीच्या टप्प्यात आक्षेप घेणे नैसर्गिक आहे पण नंतर उर्जेची म्हणजेच विजेची गरज आणि आता अणूउर्जेइतका अन्य कोणताही अप्रदूषणकारी मार्ग वीज निर्मितीसाठी उपलब्ध नाही हेही समजून घेतले पाहिजे. जैतापूरची जागा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याचा एक आक्षेप आहे पण त्यांनी जगाकडे पहावे. जपान हा भूकंपग्रस्त देश म्हणून ओळखला जातो. जपानी घरांची रचना भूकंपाला तोंड देणारी का असते असे आम्ही शाळेत शिकलो आहोत. त्याच जपानमध्ये साठ टक्‍के वीज अणू प्रकल्पातून मिळते. त्यामुळे भूकंपप्रवण क्षेत्र आहे वा नाही हा विरोधाचा मुद्दा असू शकत नाही.
प्रकल्पासाठी हजारो कोटी लीटर पाणी लागेल, वापरलेले पाणी जास्त तापमान असताना समुद्रात सोडल्याने जलचरांचे प्रजनन क्षेत्रच नष्ट होईल ही भीतीही निराधार असल्याचे सांगत ते म्हणाले, कैगाचे पाणी आम्ही काळी नदीत सोडण्यापूर्वी ते पूर्ववत थंड करतो. ते एका टाकीत जमा होते. ते पाणी नैसर्गिकदृष्ट्या जलचरांसाठी सुरक्षित आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही त्या टाकीचेच मत्स्यपैदास केंद्रात रुपांतर केले आहे. तेथे वाढलेले मासेही नंतर आम्ही काळी नदीत सोडतो. त्यामुळे जलचरांसाठी ते पाणी हानीकारक आहे हे न पटणारे नाही. त्याही पुढे जात आम्ही सारेचजण तेच पाणी पिण्यासाठीही वापरतो.
ते म्हणाले, लाखो युनिट उष्णता हवेत सोडली जाऊन आंबा, फणस, काजू, नारळी पोफळीच्या बागांवर गंभीर परिणाम होणार असा असलेला आक्षेपही कैगा पाहिल्यास किती चुकीचा आहे हे कळते. चहुबाजूने निसर्गाने कैगा प्रकल्प वेढलेला आहे. बांधकामापुरतीच इथली झाडे तोडली आहे. प्रकल्पाच्या बाहेरील सर्व निसर्ग अबाधित आहे प्रकल्पातील अगदी अणूभट्टीला टेकून असलेल्या झाडांनाही काहीही झालेले नाही. आम्ही उलट एक लाख झाडे लावली आणि निसर्गालाच देणगी दिली आहे.
किरणोत्सर्गाचा मानवी आरोग्यावर परिणाम शक्‍य असल्याच्या आक्षेपाकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, इथे अणूभट्टीत काम करणारे वैज्ञानिक, तंत्रज्ञ हे त्यांच्या क्षेत्रातील अत्यंत हुशार व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांना हा धोका कळत नाही असे कोणाला म्हणायचे आहे का? विमानाने प्रवास करताना, क्ष किरण तपासणी करताना वीस मिडीराम (किरणोत्सर्ग मोजण्याचे परिमाण) किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते. इथे अणूभट्टीत काम करणाऱ्याला वर्षाला केवळ एक मिडीराम किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते. अहो, आम्ही आमचे कुटूंब काही शंभर किलोमीटरवर राहत नाही. प्रकल्पासाठी सडकमार्गे 17 किलोमीटरवर (हवाईमार्गे कितीतरी कमी) आम्ही राहतो. धोका असता तर आम्ही आमच्या कुटुंबाला येथे का ठेवले असते? याहीशिवाय मणिपाल आरोग्य विद्यापीठाच्या सहकार्याने आरोग्यविषयक सर्वेक्षण नियमितपणे केले जाते. त्यातही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही.
चाळीस वर्षांनी अणूभट्टी बंद पडल्यानंतर बाहेर पडणाऱ्या कचऱ्यातून किरणोत्साराचा धोका असेल का असे विचारल्यावर त्यांनी चाळीस वर्षे असे अणूभट्टीचे ढोबळ आयुष्यमान तारापूर अणूउर्जा प्रकल्प उभारताना ठरविले होते. चाळीसवर्षांनंतरही तारापूरची अणूभट्टी अद्याप सुरूच आहे. कैगामध्ये तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अणूभटट्या आहेत त्या आणखी कितीतरी वर्षे चालतील. जैतापूरला फ्रेंच तंत्रज्ञानाच्या अणूभट्ट्या बसविल्या जाणार आहेत. त्यांचे आयुर्मान कैगापेक्षाही असेल. त्यामुळे ही भीती बाळगणे चूक आहे.
तरीही कचऱ्याचे काय असे विचारल्यावर ते म्हणाले, तो कचरा हवाबंद पद्धतीने ठेवला जातो. तो कधीही प्रकल्पाबाहेर टाकला जात नाही. त्याचे प्रमाणही वर्षाला अत्यंत नगण्य असते. त्यामुळे कचऱ्यातून किरणोत्सार ही शक्‍यताच नाही. चर्नेबेल येथील उदाहारण अनेकजण देतात पण तेथे झालेले बहुतांश मृत्यू हे लागलेल्या आगीमुळे होते याकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष केले जाते.

अणूभट्टीची इमारत दोनस्तरीय दोन कंटेनर एकावर एक या पद्धतीने ठेवल्यासारखी असते. या दोन भितींमध्ये निर्वात पोकळी असते. त्यामुळे अपघात झाल्यासही किरणोत्सर्ग बाह्य वातावरणापर्यंत पोहोचूच शकत नाही.
जे. पी. गुप्ता

No comments:

Post a Comment