Tuesday, March 29, 2011

जामनगरची द्वारका हीच खरी

जामनगरची द्वारका हीच खरी श्रीकृष्णाची द्वारका आहे, अशी माहिती सोसायटी फॉर मरिन अर्किओलॉजीचे अध्यक्ष डॉ. एस. आर. राव यांचे म्हणणे आहे.द्वारकेचा सागराच्या तळाशी शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाचे नेतृत्व डॉ. राव यांनी केले होते. अलीकडेच जुनागड येथे द्वारका सापडल्याचा दावा "इस्रो'ने केला आहे. त्याविषयी डॉ. राव यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की "इस्रो'च्या दाव्यात जराही तथ्य नाही. मुख्य म्हणजे जुनागडच्या आजूबाजूला कुठेही समुद्र नाही. द्वारका किनाऱ्यालगत होती, याचे महाभारतकालीन पुरावे आहेत. तेथील समुद्र हटला, असेही क्षणभर गृहीत धरले, तरी तो सतराशे वर्षांत एवढा मागे हटणेही शक्‍य नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. जुनागड येथे राईवथका नावाची टेकडी आहे. तिचा उल्लेख महाभारतात आहे. त्यामुळे टेकडीशेजारी द्वारका असावी, असा ढोबळ अंदाज असू शकतो; पण त्या टेकडीचे पूर्वीचे नाव ऊर्जैंता होते, हे आम्ही अभ्यासाअंती शोधून काढले आहे. त्यामुळे "इस्रो'ने केलेल्या जुनागडच्या दाव्यात दम नाही.ते म्हणाले, की इतिहासातील वर्णने पडताळूनच आम्ही द्वारकेपर्यंत पोचलो. आजवर द्वारका बुडल्याचाच उल्लेख सर्वत्र आहे. नवव्या शतकातही आद्य शंकराचार्यांनी द्वारकेला भेट दिली, त्यावेळीही त्यांनी द्वारका पाण्यात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जवळपास कुठेही समुद्र नसणाऱ्या जुनागडमध्ये द्वारका असणे शक्‍यच नाही. अहमदाबादच्या काही अभ्यासकांनी यापूर्वी जुनागडची पाहणी केली होती. त्यांनीही द्वारका तेथे नसल्याचा निष्कर्ष काढला होता.आजही काही जण द्वारका अफगाणिस्तानात असल्याचे मानतात, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, की पुरावा काय म्हणतो, यालाच महत्त्व आहे. पुराव्याशिवाय दावा टिकू शकत नाही. आम्हालाही सौराष्ट्रात उजयवाडा आणि माधेपूर येथे समुद्रतळाशी गाडली गेलेली काही प्राचीन बांधकामे आढळली. ती सुरचित शहरे होती. मात्र, द्वारकेचा शोध घेताना आम्हाला ती सापडली. असे मानले जाते, की श्रीकृष्णांच्या पूर्वजांनी वसविलेले एक शहर (द्वारका) होते. श्रीकृष्णांनी दुसरे शहर (द्वारका) वसवले. ही दोन्ही शहरे सापडली आहेत. शहरात प्रवेश घेण्यासाठी केवळ नागरिकांना दिलेल्या मुद्रा या उत्खननात सापडल्या आहेत. त्यामुळे गोमती द्वारका आणि कुशस्थळी द्वारका सापडली आहे. महाभारतातील वर्णनाप्रमाणे तेथे बांधकाम असल्याचे समुद्रतळाशी केलेल्या उत्खननातून सिद्ध झाले आहे. त्यावेळी वापरात असलेल्या काही वस्तूही सापडल्या आहेत. त्यावरून हे शहर ख्रिस्तपूर्व 1700 ते 1800 वर्षांपूर्वी बुडाले असावे. आपण कलियुगाची सुरवात ख्रिस्तपूर्व 3100 वर्षांपूर्वी झाल्याचे मानतो. त्यामुळे महाभारताचा कालखंड ख्रिस्तपूर्व 1800 च्या दरम्यानचा असावा, असे म्हणण्यास वाव आहे.

No comments:

Post a Comment