Tuesday, July 23, 2013

महासागर माझा सखा!

सागराचे सौंदर्य आणि विविधता ही मानवाला मिळालेली देणगीच आहे. निसर्गाचा हा समतोल किती नाजूक आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी. अत्यंत नाजूक अशा पर्यावरण व्यवस्थेवर होणारे प्रतिकूल परिणाम किमान प्रमाणात राहतील अशा पद्धतीने आमच्या जीवन पद्धतीत बदल घडवून आणणे हाच संदेश आम्ही सागराकडून घेतला पाहिजे.
सागरी प्रदूषणाचा मानवी जीवनाशी थेट संबंध आहे. मानवासाठी उपलब्ध जल स्त्रोत्रांपैकी एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणून आज सागरजलाकडे पाहिले जाते. समुद्रजलावर सौरशक्ती प्रक्रिया करून ते पिण्यासाठी उपलब्ध करून एकमेव पर्याय आज जगातील बऱ्याच देशासमोर राहिला आहे. आज सहापैकी एका व्यक्तीला शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. भावी काळात हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नद्या अडवून प्रचंड मोठी धरणे उभारणे हे दिवसेंदिवस खर्चिक होत चालले आहे. त्यात पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याचा धोकाही जास्त असतो. म्हणून समुद्राचे पाणी खेचून प्रक्रियेद्वारे पुरवठा करणे अधिक स्वस्त आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर सागरांचे वाढते प्रदूषण हा कळीचा मुद्दा ठरला आहे. गेल्या तीस वर्षात तर प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येते. प्रमुख्याने तेल, सांडपाणी, कचरा, रसायने किरणोत्सर्गी पदार्थ वगैरे समुद्रात सोडल्यामुळे सागरी प्रदूषण वाढीस लागते. सागरी प्रदूषणामुळे तेथील सागरी जीवसंपत्तीवर विपरीत परिणाम होणे ओघानेच आलेच. हल्ली मृत मासे किनाऱ्यावर थडकण्याचे प्रमाणही वाढले आहे. 1944 पासून अणुशक्तीद्वारे वीजनिर्मिती आणि अण्वस्त्रे यांचे उत्पादन वाढले आहे. यातून निर्माण होणारा किरणोत्सर्गी पदार्थ मिश्रित कचरा समुद्रात फेकला जातो. आता यावर एका सर्वंकष कराराद्वारे बंदी आलेली असली तरी अशा छोट्या छोट्या घटना डोळ्याआड घडतच राहातात.
ते टाळण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी सागरी प्रदूषणाला आळा घालण्याच्या प्रयत्नात सामान्य माणसालाही हातभार लावता येईल. घरगुती पातळीवर रसायनांचा कमीत कमी वापर करावा. कमीत कमी सांडपाणी तयार होईल याची काळजी घ्यावी. कागदाचा वापर शक्‍यतो कमी करावा. रंगाचा वापर अधिक प्रमाणात करू नये. प्लास्टिकचा वापर टाळावा. इंधन वाचेल अशा प्रकारे गाडी चालवावी आदि अन्य प्रदूषण कमी करण्याचे उपाय हे समुद्री प्रदूषण आटोक्‍यात आणण्यास उपयुक्त ठरतात. कारण प्रदूषण कोणतेही असो, परंतु त्याचे दुष्परिणाम सारखेच असतात.
पृथ्वीचा दोन तृतीयांश भाग महासागराने व्यापला आहे. जीवनदायी पावसापासून जीवसंरक्षक औषधांपासून नित्याच्या भोजनात असलेल्या समुद्री अन्नापासून वाहतुकीच्या किफायतशीर सुविधांपासून ते आमच्या जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या प्राणवायूच्या पुरवठ्यापर्यंत मानवी जीवनातल्या सर्वच बाबतीत महासागर एक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. खरे तर मानवाच्या अस्तित्वासाठी महासागर ही निकडीची गरज आहे.
सागर संपत्तीदिनाच्या निमित्ताने सागराच्या जीवनदायी भूमिकेची पुन्हा एकदा जाणीव करून देण्याची ही संधी आहे. 10 वर्षापूर्वी रिओ- द जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वसुंधरा शिखर परिषदेत महासागर दिवस साजरा करण्याची कल्पना पुढे आली आणि त्यातून गेल्या दहा वर्षाच्या काळात सागरी संपत्तीबाबत फार मोठी लोकजागृती घडवून आणणे शक्‍य झाले आहे.
उपाहारगृहात उपलब्ध होणाऱ्या समुद्री अन्नाच्या मूळ स्त्रोताबाबतचा तपशील जाणून घेणे, गाडी धुताना किंवा झाडांना पाणी देताना पाण्याची बचत होईल याकडे लक्ष देणे, घरगुती स्वरूपातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, टाकाऊ पदार्थांचे नीट व्यवस्थापन करणे, त्यांचा पुन्हा पुन्हा उपयोग करणे किंवा त्यांचे कंपोस्ट खतांमध्ये रूपांतर करणे, वाहनांपासून होणारे प्रदूषण आटोक्‍यात ठेवणे, महासागरातील प्राणी जीवनाचे संरक्षण करणे, समुद्री पक्षी, कासवे, आणि त्यांच्या प्रजनन स्थळांचे संरक्षण करणे,किनारा स्वच्छता किंवा अशा प्रकारच्या अन्य सागर स्वच्छतेशी निगडित कार्यक्रमात सहभागी होणे आदी कार्यक्रमातूनही कोणीही सागराशी आपले नाते जोडू शकतो.
किनारा स्वच्छता कार्यक्रम हाती घेणे हा एक आनंददायी उपक्रम. अतिशय सोपा परंतु खूपच परिणामकारक. किनाऱ्यावर फेरफटका मारताना एका माणसाने किनाऱ्यावरची वस्तू उचलून तिची योग्य विल्हेवाट लावण्यापासून संपूर्ण समाजाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विशिष्ट लांबीच्या किनाऱ्याची स्वच्छता करण्यापर्यंत उपक्रम राबवता येईल. किनारा स्वच्छता हा उपक्रम केवळ सागरी किनाऱ्यावरच राबवावा असे मात्र नव्हे. एखाद्या तलावाच्या काठी, नदीच्या किनाऱ्यावर किंवा एखाद्या सामाईक अशा जलस्त्रोतांपासून वाहणारे पाणीच पुढे सागराला मिळत असते आणि म्हणून या स्त्रोतांची स्वच्छता ही देखील सागराच्या स्वच्छतेएवढीच महत्त्वाची आहे. महासागरांचे संरक्षण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. समस्या निर्माण करण्याच्या कामी जर आपण सर्वजण जबाबदार असू तर या समस्येच्या सोडवणुकीसाठी उपाय योजना राबविण्यातही आमच्या सर्वांचे योगदान आवश्‍यक आहे.

Friday, July 19, 2013

लढाई, बिबट्या आणि माणसाची

राज्यातील वनक्षेत्र वाढल्याचा दावा वनखाते करते. दुसऱ्या बाजूने बिबटे मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी असल्या तरी त्या गोष्टी खऱ्या आहेत. बिबटे आणि मानवाचा संघर्ष का होऊ लागला आहे याचा विचार न केल्यास यातून अनेक प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे.
बिबटे शहरात घुसले ही बातमी आता टीव्हीवर पाहण्याइतपत मर्यादित राहिलेली नाही. आपल्या आसपास बिबटे वावरू लागले आहेत. गोव्यात सध्या बिबटे लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. एरवी दाट जंगलात वावरणारा बिबटा लोकवस्तीत घुसण्याचा सिलसिला गोव्यात दहाएक वर्षांपूर्वी सुरू झाला. सिकेरी येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या हेलिपॅडवर आढळलेला बिबटा नंतर गोव्यातील वेगवेगळ्या भागांतील लोकवस्तीमध्ये दिसू लागला. दाबोळीच्या नौदल तळावरही आठनऊ वर्षांपूर्वी बिबटा सापडला होता. नंतर बांबोळी येथे महामार्ग ओलांडत असलेल्या बिबट्याचे दर्शन घडले होते.
अलीकडच्या काही वर्षांत बिबट्याचे दर्शन ही दुर्मिळ बाब राहिली नाही. वाळपई, डिचोली, पेडणे, सासष्टी, केपे व काणकोण या परिसरात बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकायला मिळतात. सासष्टीतील राय, कुडतरी, चांदर, पारोडा, सारझोरा, चिंचोळणे, नुवे या भागात बिबट्यांचा सर्रास वावर आहे. घाटमरड-चांदर येथे तर पाचसहा बिबटे आहेत. वनखात्याने या भागात अनेक वेळा सापळे लावले. पण, या बिबट्यांना पकडण्यात यश आले नाही. बिबटा हा मार्जार कुळातील सर्वांत बिलंदर प्राणी आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्यास बिबटा वाकबगार मानला जातो. म्हणूनच चिता व पट्टेरी वाघांची संख्या कमी होत असताना बिबट्यांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसते. गोव्यात 41 बिबटे असल्याची वनखात्याकडे नोंद आहे. पण, या संख्येपेक्षा तिप्पट बिबट्यांचा गोव्यात वावर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. इतर राज्यांतही बिबटे लोकवस्तीत घुसण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दाट लोकवस्तीच्या मुंबईतही बिबटे सापडले आहेत. सहसा माणसावर हल्ला न करणारा बिबटा नरभक्षक बनल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. हुबळी येथे तीन चार वर्षांपूर्वी बिबट्याने दोन मुलांना ठार केले होते. उत्तराखंडातील तेहरी व छमोली या गावात गेल्या वर्षी दोन नरभक्षक बिबट्यांना वनखात्याने ठार मारले. तर तेहच्या डोंगराळ भागात सहा बिबटे नरभक्षक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गोव्यात डुकरे, कुत्री व मांजरे या पाळीव प्राण्याच्या रूपात बिबट्याला मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. विशेषतः डुकरे हे बिबट्यांचे आवडते खाद्य असल्याचे दिसून आले आहे. तरी बिबट्याची माणसाला भीती ही वाटतेच. याच भयातून आगशी येथे एका बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावणारा बिबटा लोकवस्तीत का घुसू लागला याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. बिबटा माणसांच्या वस्तीत नव्हे, तर माणूस बिबट्यांच्या वस्तीत घुसू लागलाय असा प्राणीप्रेमींचा युक्तिवाद आहे आणि त्यात बरेच तथ्यही आहे.
बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात असे अनेक वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला खडतर कष्ट करावे लागतात. त्यातही मांसाहारी प्राण्यांना जास्त. कारण त्यांना शाकाहारी प्राण्यांप्रमाणे आयते अन्न उपलब्ध नसते. आधी भक्ष्य शोधावयाचे, त्याच्या मागावर जायचे, अनुकूल संधी शोधायची आणि मग हल्ला करून शिकार साधायची हे प्रत्येक मांसाहारी प्राण्याला अपरिहार्य असते. एवढे करूनही भक्ष्य मिळण्याची शक्‍यता तुलनेने कमीच. मार्जार कुळात सिंह, वाघ, बिबट्या आणि जॅग्वार (दक्षिण अमेरिका) हे खरे "बडे' सदस्य म्हणावे लागतील. "परिपूर्ण शिकारी' अशीच त्यांची खरी ओळख आहे. त्या तुलनेत फाटकी शरीरयष्टी, लहान आकार आणि कमी वजनामुळे चित्ता दुय्यम ठरतो, त्यामुळे मार्जार कुळातल्या उपकुळात त्याचा समावेश झाला आहे. या सर्वांनी अधिवासही जणू वाटून घेतले आहेत. सिंह कळपाने राहतो म्हणून तो खुरट्या जंगली किंवा मैदानी प्रदेशात वावरतो. वाघाला दाट जंगल पसंत आहे. बिबट्याने मात्र कोणताही भेदभाव न करता मिळेल ते स्थान आपले असे धोरण ठेवले आहे. उग्र आणि कावेबाज स्वभावामुळे बिबटे मात्र नरभक्षक होतात. जिम कॉर्बेटचा रुद्रप्रयागचा, केनेथ ऍण्डरसनचा गुमालपूरचा हे नरभक्षक बिबटेच होते. त्यामुळे काणकोणच्या गावडोंगरीत बिबट्याने माणसावर हल्ला केला यात कोणतेही नवल नाही.
मुळात बिबटे मानवी वस्तीत येऊ नयेत म्हणून वन खाते कोणतीही उपाययोजना करत नाही हा खरा प्रश्‍न आहे. मानवी वस्तीत बिबटा शिरला की तेथे पिंजरा लाव त्याला पकड आणि जंगलात सोड असे वनखात्याचे बिबट्यांबाबतचे सध्याचे धोरण आहे. शिकारीसाठी लोकवस्तीमधील पाळीव जनावरांना लक्ष्य करणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करण्याचे सत्र वन खात्याने सुरू केले आहे. परंतु हे बिबटे जंगलातून लोकवस्तीत घुसण्यामागची कारणे कोणती व त्यावरील उपाय यावर वन खात्याने गांभीर्याने विचार केलेला नाही. बिबट्यांना जेरबंद करून दुसऱ्या जंगलात सोडल्यावर जंगलातील अन्नसाखळीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. मात्र बिबट्यांच्या समस्येवर शास्त्रीय तोडगा काढण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. गावात बिबट्याचा उपद्रव सुरू झाला, की वन खाते त्याठिकाणी सापळा रचून बिबट्याला पकडून अन्य जंगलात सोडून देते. वन खात्याची ही प्रक्रिया काही वर्षांपूर्वी ठीक वाटायची, परंतु आता बिबटे लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. वन खात्याचे अधिकारी हे बिबटे नेऊन दुसऱ्या जंगलात सोडताहेत. यामुळे ज्या जंगलात पकडण्यात आलेला बिबटा राहतो, तो परिसर मोकळा राहतो, अन्‌ ज्या जंगलात उपद्रवी बिबटे सोडले जातात त्याठिकाणी पूर्वीचा बिबटा व खात्याने सोडलेला बिबटा आल्यामुळे तेथील अन्नसाखळीवर परिणाम होऊ शकतो.
बिबट्यांची नैसर्गिक संचार पद्धती त्यांच्या कृत्रिम स्थलांतरणाने बदलल्यास भविष्यात त्यांच्या एकूण अधिवासावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. बिबटा हा क्षेत्रीय प्राणी (टेरिटोरियल) असल्यामुळे आपले संचार क्षेत्र हा प्राणी आखून घेतो. त्या क्षेत्रात दुसरा बिबटा घुसत नाही. अशा परिस्थितीत बिबटाविरहित जंगलपट्ट्यात दुसऱ्या क्षेत्रातील बिबटा सहजपणे शिकार मिळत असल्याने संचार करतो. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना जंगलामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे असा समज होतो. लोकवस्तीमध्ये बिबट्यांचा संचार वाढला आहे, याचे कारण बिबट्यांची संख्या वाढली आहे, असे नव्हे तर विकासाचे लोण जंगलापर्यंत पोचल्यामुळे बिबट्यांचे अस्तित्व लोकांना सातत्याने जाणवू लागले आहे.
बिबट्या दिसला, बिबट्याने हल्ला केला, बिबट्यासारखा प्राणी दिसला, या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच अफवा हल्ली सर्वांच्या कानावर पडत आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यात पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या डोक्‍यात बिबट्या चांगलाच भिनला आहे. तथापि बिबट्यापेक्षा साधारणपणे बिबट्यासारखाच दिसणारा "तरस' हा प्राणी जंगल परिसरात परिसरात अधिक आढळतो, हे वास्तव आहे. बिबट्यासारखा प्राणी दिसला अशा घटना बऱ्याच घडल्या आहेत. बिबट्यासारखा प्राणी ज्यांनी पाहिला, त्यांनी ती साधारण संध्याकाळची वेळ सांगितली आहे. मात्र बिबट्या दिवसासुद्धा शिकार करतो आणि तरस फक्त रात्रीच्या वेळी शिकार शोधण्यासाठी बाहेर पडतो. बिबट्याला अशा अफवांमुळे बदनाम करणारा तरस हाच प्राणी आहे.
"निसर्गाचा सफाई कामगार' असे संबोधले जाणारे तरस साधारणपणे करड्या-तपकिरी रंगाचे असते. त्यावर आडवे धुसर पट्टे असतात. त्यामुळे तो साधारण पट्टेरी वाघाच्या किंवा बिबट्याच्या बछड्यासारखा दिसतो. प्रत्यक्षात बिबट्याचा रंग तांबूस पिवळसर असून त्यावर काळे ठिपके असतात. पाळीव जनावरांना असला तरी तरसापासून माणसाला तसा धोका नाही. शिवाय राजबिंडा बिबट्या आणि कुत्रा वर्गातील तरस यांची तुलना होऊच शकत नाही. मात्र मुळात सर्वांच्या मनात बसलेली बिबट्याची भीती आणि रात्रीच्या अंधारात लांबून भासणारे दोघांच्या बाह्यरूपातील काहीसे साम्य, यामुळे लोक तरसालाच बिबट्या समजून भेदरून जातात. त्यामुळे पावलांचे ठसे घेऊन वन खात्याने याबाबत लोकांना सत्य नेमके काय हे सांगण्याचीही वेळ आली आहे.