Wednesday, March 16, 2011

खानापूरचे वास्तव!

नाखूष शिक्षक, दूर अंतरावरील शाळा आणि येथील जनतेकडे पाहण्याचा शासनाचा उदासीन दृष्टिकोन यामुळे म्हादई नदीच्या उगमस्थानातील या भागातील कित्येक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. या विभागात निवासी शाळांची संख्या वाढविण्याबरोबरच येथे खऱ्या अर्थाने शैक्षणिक चळवळ राबविली जाण्याची गरज आहे.दुगर्म डोंगरदऱ्यांत जीवन जगताना येथील नागरिकांना बाहेरील जग किती पुढे जात आहे, याची जाणीवच होऊ शकली नाही. येथील कष्टाचे जीवन, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, अज्ञान आणि दारिद्य्र यामुळे येथे शिक्षणाची गंगा लवकर पोचली नाही आणि जेव्हा पोचली, त्यावेळी सरकारी लाल फितीत ती अडकत राहिली. त्यानंतर येथे कशाचीच घडी बसली नाही. शिक्षणाचा सारा खेळखंडोबा होऊन गेला. अनमोड घाट काढला की हेमडगा, देगाव, तळेवाडीपासून या भागास सुरवात होते. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांत अनेक वस्त्या विखुरलेल्या आहेत. या वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शाळा होत्या. नंतर शिक्षक या जंगलात येण्यास तयार नव्हते. सध्या शेजारच्याच गावात शिकलेले दथरथ गजानन गावकर सध्या शिक्षकाची भूमिका बजावत आहेत. तळेवाडीला तर मारूतीच्या मंदिरातच पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत; मात्र या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. अवघड डोंगर, वाहने आणि रस्त्यांचा अभाव, इतर कोणत्याही सुविधा नसल्यामुळे येथे जाण्यास शिक्षक नेहमीच नाखूष असतात. नोकरीस नव्याने लागलेले किंवा अधिकाऱ्यांच्या, तालुक्‍यातील पुढाऱ्यांच्या मर्जीत नसलेल्या शिक्षकांना या दुर्गम भागात पाठविले जाते. यामुळेही जावळीतील शिक्षणाची दुरवस्था झाली आहे. शाळा घरापासून दूर अंतरावर असल्यानेही प्राथमिक शिक्षणाची येथे हेळसांड होते. आठ-दहा वर्षे वयाच्या अनेक मुलांना शाळेसाठी चार ते १० किलोमीटरची पायपीट करावी लागते. घनदाट जंगल ओलांडून पलीकडे जावे लागते, तरीह
ी अनेक मुले हा त्रास सहन करीत शिक्षण घेत आहेत. या भागातील नागरिकांना शेतीशिवाय इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्त्या माणसांना पोटासाठी बेळगाव वा गोव्यात जावे लागते. घरात शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नसल्यास, कोणी नोकरीस नसल्यास दहा-पंधरा वर्षांच्या मुलांनाही गोव्याला धाडले जाते. शाळांमध्ये पट कमी असण्याचे हे मुख्य कारण आहे. यामुळे मुले शिक्षणापासून मोठ्या प्रमाणावर वंचित राहतात. पाचवीचे शिक्षण घेण्यासाठी खानापूरला रहावे लागते. तेथे नातेवाइक असल्यास ठीक अन्यथा कुठेतरी व्यवस्था करणेही पालकांच्या खिशाला परवडत नाही. नाहीतर दररोज किमान ३० किलोमीटरची पायपीट करावी लागते. ते शाररिकदृष्ट्या शक्‍य नसते. परिणामी अनेक हुशार विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित राहतात. शहरात नातेवाईक असतील, अशीच मुले पुढे शिक्षण घेतात. सध्या या भागात अक्षरशः निसर्गाच्या भरवशावर जगणे सुरू आहे. कधी काय होईल याची शाश्‍वती नसल्याने नशीबावर भरवसा हाच जगण्याचा प्रमुख आधार बनला आहे.या परिसरात खाण व्यवसाय या परिसरात दहा वर्षापूर्वी सुरू होता. तोवर येथे निसर्गाच्या भरवशावर जगणाऱ्या लोकांच्या जीवनातील निसर्गाचे सानिध्य हिरावले नव्हते. त्यांच्या पाठीशी डोंगरदऱ्या खंबीरपणे उभ्या होत्या. शेतकऱ्यांच्या हिमतीला त्यांनी साथ दिली. त्यांच्यापाशी कसायला जमीन नव्हती; पण नसानसांत कष्ट भिनले होते. खोऱ्या कुदळींच्या साह्याने त्यांनी खडकाशी धडका घेतल्या. डोंगर उतारावर तुकड्या तुकड्यांची शेती उभी केली. त्यात ते भात, वरी, नाचणी पिकवू लागले.येथे वेडयासारखा पाऊस कोसळायचा. चारा डौलात डोलायचा. त्यावर गाई-म्हशींचे पालन केले जाऊ लागले. त्यांच्यापैकी काही दूध दुभते झाले. कष्टाला आकार येऊ लागले; पण या साऱ्याला मर्यादा होत्या. पिकलेल्यांत भागायचे नाही. आजही भागत नाही. म
ुले तरुण झाली, की त्यांना "गोव्याची'ची वाट धरावी लागते. पोरं पैसे पाठवितात; पण डोंगररानांत गावाकडे राहणाऱ्यांची अवस्था वाईट आहे. आजही त्यांच्या कष्टांना सीमा नाही. दळणवळणासाठी रस्ते नाहीत. इतर साधने नाहीत. अनेक वर्षांच्या मागणीनंतर या भागात एक रस्ता झाला; पण तो वन विभागाच्या फितीत अडकला. आरोग्याच्या सुविधा नाहीत. शिक्षणाच्या शाळा मुलांच्या कुवतीतील अंतराच्या बाहेर झाल्या. रस्ते नसल्याने सरकारी नोकर येथे फिरकत नाहीत. आणि जरी फिरकले तरी ते आपल्या मदतीसाठी नव्हे तर, त्रास देण्यासाठीच येतात, अशी भावना येथे निर्माण झाली आहे. निवडणुकांनंतर त्यांना येथील माणसांच्या अवस्थेचे सोयरसुतक नसते. इथे जगण्यासाठी माणसे पाय रोवून उभी आहेत. ती केवळ आपल्या मातीसाठी. म्हादईच्या पाणलोट क्षेत्रातील या जिवंत माणसांचे अरण्यरुदन आजही सुरू आहे. वन विभाग जंगलात फिरकू देत नाही, पुरेशी जमीन नाही, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही आणि आमचे गाऱ्हाणे ऐकायला कोणी येत नाही, अशी खंत आजही खानापूरच्या जंगलातील लोक व्यक्त करीत आहेत. म्हादई बचाव मोहीम सुरू झाल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा या परिसरातील वावर वाढला आहे. त्यानेच जनतेच्या दैनंदिन जीवनाची घडीच बिघडवून टाकली आहे.या भागातील घनदाट अरण्यातून मुबलक जंगल, जमीन, तुटपुंजे पण हमखासपणे मिळणारे पाणी यांसारख्या समृद्ध जीवनस्रोतावर एक स्वयंपूर्ण समाज पिढ्यान्‌ पिढ्या स्थिरावला आहे. भरपूर पाऊस, जंगलात वर्षभर वाहणारे झरे, भात, नाचणी-वरी, मुबलक दूधदुभते देणारी जनावरे, अन्न म्हणून तसेच औषधे देणाऱ्या वनस्पती त्यांच्या हाताशी. येथे मुबलक निसर्गसंपत्तीला कष्टांची जोड देत येथील माणसे जीवन जगत आहेत. जमिनीत भात, नाचणी- नाचणी पिकवून आपले जीवन कंठत आहेत. डोंगरउतारावर वन विभागाचे राज्य असल्यामुळे जादा जमीन उपलब्ध येत नाही. त्य
ामुळे तुटपुंज्या जमिनीतच त्यांना कष्ट करीत राहावे लागते. उन्हाळ्यात खाचरे भाजून पाऊस पडताच रोपे टाकली जातात आणि तेथूनच तेथील शेतकऱ्यांच्या कष्ट आणि हालांना सुरवात होते. रोपे वाढली आणि खाचरे पाण्याने तुडुंब भरली, की उभ्या पावसातच भातलावणीला सुरवात होते. सतत कोसळणारा पाऊस, झोंबणारा वारा अशा कशाचीच पर्वा न करता माणसे शेतात कष्ट करीत राहतात. एवढे करूनही पोटापुरते पिकेलच याची काहीच शाश्‍वती नसते. आधीच जमीन अपुरी. त्यातच रानडुकरे, अस्वले, मोर अशा प्राणी आणि पक्ष्यांच्या तावडीतून वाचेल तेवढेच धान्य शेतकऱ्यांच्या पदरात पडते. शेत राखणीला जावे, तर श्‍वापदांचे भय. कधी कोठून बिबट्या येईल आणि फडशा पाडेल हे सांगता येत नाही. भाताच्या काढणीनंतर शेतीला पाण्याची व्यवस्था नसल्याने परत कोणतेही पीक घेता येत नाही. यामुळेच जगण्यासाठी त्यांना इतर मार्ग चोखाळावे लागतात. या खोऱ्यात राहणाऱ्या माणसांच्या एकूणच जीवनाचा अभ्यास करायला हवा. त्यांना सर्वांनीच वाऱ्यावर सोडले आहे. डोंगरदऱ्यात राहत आहेत, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आहे त्या परिस्थितीतच कोणत्या सुविधा देता येतील, हे पाहिले पाहिजे. त्यांच्या तुटपुंज्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी त्यांना कृषी विभागाने पुरेशी मदत करावयास हवी. दुर्गमपणामुळे येथे कोणत्याही योजना पोचत नाहीत. जास्त दूध देणारी आणि तेथील वातावरणात टिकू शकणारी जनावरे तेथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावयास हवीत.या परिसरात विपुल जंगल आहे. सारा प्रदेश डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. येथे दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नाहीत. रस्ता नसल्याने येथे कोणतेही उद्योग-धंदे येणे शक्‍यच नाही, तरीही येथील माणसांना उद्योग-धंदा उपलब्ध होऊ शकतो, फक्त प्रामाणिक आणि तळमळीने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. येथील जंगलात विपुल प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. या वनस्पती गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे कारखाने काढल्यास येथील नागरिकांना सहज रोजगार उपलब्ध होऊ शकतो.शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी पुरेसेच नव्हे तर थोडेही लक्ष देत नाहीत, अशी तेथील लोकांची तक्रार आहे.

No comments:

Post a Comment