Monday, December 31, 2012

पर्यटनात "गोवा मॉडेल' आणणार - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

पर्यटनात "गोवा मॉडेल' आणणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर
मुलाखत- अवित बगळे


गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून अधिक विकसित करण्याबरोबरच लोकांनी गोव्यात यावे यासाठी त्यांना उद्युक्त करणारे उपक्रम राबविण्यात येतील. त्यात आठवडाभरासाठी गोव्यातील खरेदीवर करमाफी देणारी खरेदीयात्रा, गोव्याबाहेरच्या व्यक्तींनी खरेदी केलेल्या वस्तूंवरील मूल्यवर्धित कर सीमेवर परत करणे अशा कल्पनांचाही समावेश आहे. गोवा म्हणजे केवळ किनारी पर्यटन हा शिक्का पुसून गोव्याच्या पर्यटनाचा विकास बहुआयामी पद्धतीने केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुलाखतीत दिली. त्यांच्याशी झालेली प्रश्‍नोत्तरे अशी

प्रश्‍न- पर्यटन म्हणजेच गोवा याकडे तुम्ही कसे पाहता?
मुख्यमंत्री- गोवा आणि पर्यटन क्षेत्र याचे नाते फार जुने आहे. आजही या क्षेत्रातून येणारा महसूलही सरकारला दुर्लक्षित करता येणारा नाही. तरीही वर्षानुवर्षे केवळ किनारी पर्यटनावर भर दिला गेल्याने जगभरात या पर्यटनातील चढउतारांचा परिणाम गोव्यातील पर्यटनावर होतो. ते टाळण्यासाठी "गोमंतकीय पर्यटन' असा नवा विचार येथे रुजवला गेला पाहिजे. गोव्याच्या पर्यटनाच्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य दुसऱ्या कोणाशीही जुळता कामा नये. गोवा अनेक दृष्टीने वेगळा आहे. ते वेगळेपण आम्ही पर्यटन क्षेत्राच्या भरभराटीसाठी वापरले पाहिजे.

प्रश्‍न-त्यासाठी कोणत्या संकल्पना मनात आहेत?
मुख्यमंत्री- सध्या किनारी पर्यटनासाठी येणारा पर्यटक केवळ चार दिवस रेंगाळतो व परत जातो. पर्यटन हे सेवा क्षेत्र आहे. जितके जास्त दिवस पर्यटक येथे राहील तेवढे पैसे स्थानिक अर्थव्यवस्थेत येतील. येथे मला सरकारी कराच्या रूपाने महसूल वाढेल असे म्हणायचे नाही. बाजारपेठेतील उलाढाल वाढेल, हॉटेलांतील उलाढाल वाढेल, असे सुचवायचे आहे. त्याची सुरवात म्हणून वारसा पर्यटन महोत्सव आम्ही गेल्याच आठवड्यात भरवला. यामागे गोव्याच्या इतिहासाच्या रूपाने दडलेला वारसा जगाला सांगावा आणि तो वारसा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी जगभरातील अभ्यासकांनीच नव्हे तर सर्वांनीच गोव्यात यावे अशी कल्पना होती. ती काही प्रमाणात यशस्वीही झाली आहे. महोत्सवांची संख्या वाढत गेल्यावर जगभरात त्याची माहिती पोचेल आणि लोक येणे सुरू होईल. ही फक्त एक सुरवात आहे.

प्रश्‍न- त्याच्यासाठी काही योजना आहेत का?
मुख्यमंत्री- हो तर! साळावली या दक्षिण गोव्यातील धरण परिसराचा विकास करण्याची योजना आहे. सध्या या धरणातून केवळ पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या जलाशयात नौकाविहाराची सोय, पर्यटकांच्या राहण्याची चांगली सोय करण्याची योजना आहे. धरणाच्या समोरच बोटॅनिकल गार्डन आहे. परिसरातील नेत्रावळी परिसरात मसाल्याची शेती केली जाते. उसाचे मळे आहेत. या सर्वांना जोडून निसर्ग पर्यटनाचे एक चांगले पॅकेज त्या भागात विकसित करता येणार आहे. ही कल्पना लवकरच मूर्त स्वरूपात आणली जाईल. त्याला जोडून इतर तालुक्‍यांतील चांगली ठिकाणे निवडून तेथेही पर्यटकांना लागणाऱ्या सुविधा विकसित केल्या जातील.

प्रश्‍नः यातून पारंपरिक पर्यटनाचा चेहरा बदलला जाणार का?
मुख्यमंत्री- तसे शंभर टक्के नाही. धार्मिक पर्यटन टिकणार आहे. त्याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास ते अधिक विकसित केले जाणार आहे. आजवर धार्मिक पर्यटन या अंगाने या क्षेत्राच्या विकासाचा कधी विचार केला गेलेला नाही. पर्यटन म्हणजे किनारे असाच विकासाचा आराखडा आखला जायचा. आमचे सरकार त्याही पुढे जाऊन धार्मिक पर्यटन विकसित व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. त्यात मंदिरांविषयी जगभरात माहिती देण्यासह पर्यटकांना आवश्‍यक असणाऱ्या सेवा मिळाव्यात म्हणून त्या सेवादात्यांचे जाळे विणणे आदींचा समावेश आहे. धार्मिक पर्यटनासाठी गोव्यात येऊ पाहणाऱ्यांना सर्व माहिती मिळण्याच्या सोयीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. काही पुरातन मंदिरांचे पुनर्बांधणी जुन्या ठिकाणी करण्यात आली आहे. ती मंदिरे पोर्तुगाज काळात इतरत्र हलविण्यात आली होती. त्या मंदिरांची माहितीही सर्वांना देणे आवश्‍यक आहे.

प्रश्‍न- यासाठी पायाभूत सुविधा आहेत?
मुख्यमंत्री- पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर येत्या दोन वर्षात अधिक लक्ष द्यावे लागेल यात दुमत नाही. सरकारचे धोरण म्हणून सांगतो, हॉटेल्सच्या प्रकल्पांना प्राधान्यांने मंजुरी आम्ही देत आहोत. गृहबांधणीचे मोठे प्रकल्प एकवेळ मागे पडले तरी चालतील, परंतु हॉटेल्स उभी राहिल्यास पर्यटन क्षेत्राच्या विकासाचा दर वाढविता येणार आहे. हॉटेल प्रकल्प आणताना कोणत्याही कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याकडेही सरकार लक्ष देणार आहे.

प्रश्‍न -पर्यटन क्षेत्र वाढीच्या वेगाविषयी तुमचे मत काय?
मुख्यमंत्री- पर्यटनक्षेत्राच्या विकासाचा दर 40 टक्के असावा असे सरकारचे प्रयत्न आहेत. या दराने पुढील तीन चार वर्षे या क्षेत्राचा विकास वाव आहे. आजवर गोव्याच्या पर्यटनातील अनेक क्षेत्रे उपेक्षित राहिली. ती विकसित करावी लागणार आहेत. शेजारील सिंधुदुर्ग, बेळगाव आणि कारवारमध्ये पर्यटन विकासाचे प्रयत्न त्या त्या राज्य सरकारांनी सुरू केले असताना त्या प्रयत्नांकडे आम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील आमचे स्थान टिकवितानाच आम्हाला आणखी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ते प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत.

प्रश्‍न- याविषयी अधिक तपशीलाने सांगू शकाल?
मुख्यमंत्री- गोव्यात अनेक परिषदा होतात. जगभरातील व्यक्ती त्या परिषदांत सहभागी होण्यासाठी येथे येतात. त्यासाठी चांगले परिषदगृह उभारण्याचा मानस आहे. आरोग्य पर्यटनासाठी विदेशातील व्यक्तींनी गोव्याला याआधीच पसंती दिली आहे. येथे आरोग्यविषयक सुपरस्पेशालिटी विभाग विकसित करत आणि काही खासगी इस्पितळांशी करार करावे लागतील. यासाठी अर्थात काही वेळ जाईल परंतु ही दोन्ही पर्यटनाची अंगे आजही विकास करण्यास वाव असणारी आहेत. त्यामुळे परिषदा आणि उपचार यासाठी जगभरातील लोकांची गोव्याला पसंती मिळेल.

प्रश्‍न - मध्यंतरी गोव्याचे नाव या क्षेत्रानेच बदनाम केले होते!
मुख्यमंत्री- त्याचमुळे किनारी भागातील गुन्हेगारी आणि बेकायदा व्यवसाय आम्ही बंद केले. अमली पदार्थ विक्री थंडावली. जगभरातील मुलींना गोव्यात आणले जाते, त्यांना वाममार्गाकडे वळविणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे. पूर्वी सायंकाळनंतर किनारी भागात कायद्याचे राज्य आहे का अशी स्थिती होती. आता रात्रीच्या कुठल्याही प्रहरी लोक निर्धास्तपणे वावरू शकतील अशी स्थिती आहे. भारतीय राखीव बटालीयनचे जवान किनारी भागात म्हणूनच तैनात केले आहेत. पोलिसांनी कुणाच्याही हस्तक्षेपाला बळी पडू नये असे गृहमंत्री या नात्याने मीच बजावले आहे. त्यामुळे बेकायदा गोष्टी नियंत्रणात आल्याने गेल्या आठेक महिन्यात या भागात अनुचित प्रकार घडलेला नाही.

प्रश्‍न- एवढे पुरेसे आहे?
मुख्यमंत्री- ही तर एक सुरवात आहे. आमचे सरकार मार्चमध्ये सत्तेवर आल्यावर अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांना आपले आता काही खरे नाही याचा संदेश गेला होता. त्यामुळे अमली पदार्थांचा व्यवसायासकट अनेक गोष्टी विनासायास करणाऱ्यांनी गोव्यातून आपले बस्तान हलविणे पसंत केले. उर्वरित पोलिसांच्या कारवाईत सापडले आहेत. किनारी भागातील अनियंत्रित अशा जलपर्यटनासाठी नवे धोरण आम्ही आणले. जलक्रीडाप्रकारांसाठी एकत्रित आरक्षण पद्धती सुरू केली. शॅक्‍सच्या आकारांवर व संख्येवर नजर ठेवली. त्यामुळे समाजातील काही जण दुखावले गेले परंतु सरकार कायदे व नियम मोडणे खपवून घेणार नाही हे सर्वांना कळून चुकले. त्यामुळे किनारी भागातील पर्यटन आता स्वच्छ झाले आहे.

प्रश्‍न- म्हणजे सर्व प्रकारचे कार्यक्रम आता बंद?
मुख्यमंत्री- तसे नव्हे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अशा कार्यक्रमांची आवश्‍यकता आहे. फक्त त्यांनी येथील कायदे व नियम यांचे पालन केले पाहिजे. त्यांना यापूर्वी 27 प्रकारचे परवाने घेण्यासाठी विविध सरकारी खात्यांत धाव घ्यावी लागायची. आम्ही एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्यांना अबकारी आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी स्वतंत्रपणे घ्यावी लागेल, उर्वरित सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार आहेत. याचा अर्थ आम्ही अशा कार्यक्रमांच्या विरोधात नाही हे स्पष्ट आहे. मात्र एकदा परवाना घेतला की कोणतेही निर्बंध असता कामा नयेत या काही आयोजकांच्या अपेक्षेनुसार सर्व काही होणार नाही. कायदे व नियम पाळूनच सर्व काही साजरे करा असे आमचे म्हणणे आहे.

प्रश्‍न- यातून असे आयोजक गोव्याबाहेर जाऊ लागले तर?
मुख्यमंत्री- म्हणूनच मी सुरवातीलाच सांगितले की पर्यटनाचे गोवा मॉडेल आम्ही विकसित करणार आहोत. त्यामुळे कोणी आपला सहभाग दिला नाही म्हणून या क्षेत्राच्या विकासाच्या दरावर त्याचा काहीचाही परिणाम होणार नाही. गोव्याचे नाव आता जगभर झाले आहे. त्यामुळे आता शिस्तीत या क्षेत्राच्या विकासावर लक्ष देण्याची वेळ आली आहे असे मी मानतो. गोवा हे केवळ ऑक्‍टोबर ते एप्रिल या हंगामातील पर्यटन स्थळ न राहता 365 दिवसांचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालेले सर्वांना येत्या दोन वर्षात दिसेल.


काय आहे खरेदी यात्रा ?
मुख्यमंत्री- गोव्यात सध्या केवळ फिरण्यासाठी लोक येतात. जाताना काही खरेदीही ते करतात. त्यांनी केवळ खरेदीसाठी गोव्यात यावे आणि आल्याच्या निमित्ताने गोव्यात फिरावे अशी ही कल्पना आहे. या कल्पनेंतर्गत पुढील आर्थिक वर्षात सरकार आठवडाभरासाठी करमाफी जाहीर करणार आहे. त्या कालावधीत गोव्यात खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूंवर सरकार कर आकारणार नाही. त्यानिमित्ताने लोक खरेदीसाठी गोव्यात येतील अशी कल्पना आहे. दुसरी कल्पना आहे ती गोव्याबाहेरच्या व्यक्तींनी गोव्यात खरेदी केलेल्या वस्तूंवरील कर त्यांना परत करणे. युरोपमध्ये सध्या ही योजना सुरू आहे. तेथे युरोपबाहेरील व्यक्तींनी खरेदी केलेल्या वस्तूंवरील स्थानिक कर परत केला जातो. त्या धर्तीवर गोव्यात येऊन खरेदी केलेल्या वस्तूंवरील कर सीमेंवर, रेल्वेस्थानकांवर, सीमांवर परत करण्याची योजना आहे. पहिली योजना निश्‍चितपणे पुढील वर्षी मार्गी लागेल. दुसरी योजना अद्याप विचारांच्या पातळीवर आहे.



Sunday, December 16, 2012

गोव्याची नवी ओळख कसिनो

गोवा म्हणजे कसिनो. कुठल्याही निर्बंधाविना सुरू असलेले कसिनो. येथे कोट्यवधीची रक्कम जरी जिंकली तरी याची खबर त्या कानाला लागणार नाही याची हमी. गोव्याची ही ओळख न कळत का होईना. जगभरातील लोकांत रुजली आहे. त्यामुळे कसिनोंत आपले नशिब आजमावण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा एक वर्ग आता तयार झाला आहे. माकाव, बॅंकॉक आणि काठमांडूनंतर आता कसिनो पर्यटनाच्या नकाशावर गोव्याने आपले स्थान निर्माण करून टिकविले आहे.
गोव्यात मटका, जुगाराचे प्रस्थ मद्याबरोबर वाढत असताना मांडवीत समुद्री कसिनो आला. त्यानंतर जवळजवळ सर्व पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेल्समधून स्लॉट मशिन्स आली. गोवा म्हणजे मौजमजेचे ठिकाण (लेजर अँड प्लेजर) अशी प्रसिद्धी आधीच होती. गेमिंगचे स्थळ, रेव्ह पार्ट्यांचे स्थान म्हणून हल्ली गोव्याची ओळख झाली. रात्रीचे बाजार जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत. व्यवहार करणारे बहुतांश बिगर गोमंतकीय परंतु नाव गोव्याचे अशी ही स्थिती आहे.
सुमारे दशकभरापूर्वी कसिनो या शब्दाचा उच्चारही दबकत केला जायचा. त्यावेळी एक दोन पंचतारांकीत हॉटेल्समध्ये कसिनो होते. नंतर पंचतारांकीत हॉटेल्स वाढत केली तसे कसिनो वाढले. आताही कसिनो सुरू करण्यासाठी पंचतारांकीत दर्जा त्या हॉटेलला हवा अशी अट आहे अन्यथा गोव्यातील बारच्या संख्येएवढे कसिनो असते. मांडवी नदीच्या पात्रात 2004 पासून कसिनोवाहू नौका स्थिरावल्या आणि कसिनो लोकांच्या फार जवळ आले. त्यानंतर कसिनो म्हणजे "कायदेशीर जुगार' असा सर्वांनी समज करून घेतला आणि तो दृढ झाला आहे. या नौका समुद्रात पाठविण्याची घोषणा करणाऱ्या सरकारलाही आजतागायत त्या नौकांना हात लावणेही जमलेले नाही यावरून कसिनोंची पकड लक्षात येते.
किनारी पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाच्या जोडीला कसिनो पर्यटनाने गोव्यात आपले बस्तान बऱ्यापैकी बसविलेले आहे. कसिनोंच्या ओढीने गोव्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नेमके किती जण या कसिनोंपोटी गोव्यात येतात याची निश्‍चित आकडेवारी सरकारी पातळीवर उपलब्ध नसली तरी मध्यंतरी मांडवी नदीत नांगरलेल्या सहा कसिनोमध्ये गोमंतकीय नागरिक दिवसाकाठी तीन कोटींचा जुगार खेळतात, असे एका पाहणीत स्पष्ट झाल्याचे आम आदमी, औरत अगेन्स्ट गॅम्ब्लिंग या संघटनेने जाहीर केले होते. पूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या काळात कसिनोवर जाण्यासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते, ते भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आघाडी सरकारने पाचशे रुपये केले. ग्राहकांसाठी शुल्क कमी करण्यात आले असले, तरी कसिनोवाल्यांच्या परवान्यात भाजप सरकारने भरघोस वाढ केली आहे. त्यातच एकवीस वर्षांखालील युवकांना कसिनोवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कसिनोवर जायचे असल्यास पर्यटकांना एखाद्या हॉटेलवर उतरावे लागते आणि तेथूनच मग हॉटेलची प्रवेशिका घेऊन कसिनोवर जायला मिळते. या व्यवस्थेचा बरेच गोमंतकीय ग्राहक फायदा उठवून सरळ हॉटेलचालकांशी संधान बांधून प्रवेशिका घेतात व कसिनोवर प्रवेश मिळवतात असेही आता उघडकीस आले आहे. त्याशिवाय आता कसिनोंच्या चालकांकडेही वाणिज्य कर खात्याने दिलेल्या प्रवेशिका माणशी दोन हजार रुपये दरानेही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
ब्रिटिश, रशियन, इस्रायली, नायजेरियन व कॅनियन यांसारख्या "बॅकपॅकर' पर्यटकांनंतर "काठमांडू पर्यटन' गोव्याकडे आकृष्ट करण्यासाठी कसिनोचालकांकडून महत्त्वांकाक्षी योजना आखण्यात आल्या आहेत. दक्षिण आशियातील सर्वांत मोठा असा हा "प्लेविन लॉटरी'चा "नो लिमिट्‌स टेबल्स' तरंगता कसिनो मांडवी नदीत आहे. आतापर्यंत गोव्याकडे न फिरकणारा वेगळ्या प्रकारचा देशी-विदेशी पर्यटक येथे त्यामुळे येऊ लागला आहे. "महाराजा कसिनो' असे या कसिनोचे नामकरण करण्यात आले आहे.
25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्चाचा हा "क्रिएटिव्ह गॅम्बलिंग सोल्युशन' या मुंबईस्थित कंपनीचा हा कसिनो 70 मीटर लांबीचा आहे. मांडवीच्या तिरापासून 20 मीटर अंतरावर तो तरंगत. तिरावरून "गॅम्बलर्सना' कसिनोत ने-आण करण्यासाठी दोन छोट्या बोटी आहेत. या कसिनोतील 22 हजार चौरस फूट क्षेत्रफळात 35 टेबले आहेत. "अमेरिकन रॉलेट', "ब्लॅक जॅक' आदी गेम्स, "बार ऍण्ड रेस्टॉरंट' व करमणूक सुविधा, तसेच कोणत्याही क्षणी 40 ते 50 लाखांच्या रोख रकमेची व्यवस्था तेथे आहे. अशा जुगारासाठी आजपर्यंत काठमांडूकडे जाणारा देशी-विदेशी पर्यटक यामुळे गोव्याकडे वळू लागल्याचे सांगण्यात येते.
गेली काही वर्षे कसिनो गोव्यात असले तरी त्यांच्यासाठी म्हणून वेगळे नियम कायदे नसल्याने कसिनोवाल्यांवर तसे कोणतेही निर्बंध नव्हते. आताही नाहीत. सरकारने कसिनोतील गेमिंगवर (जुगारावर) नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी गेमिंग कमिशनरची नियुक्ती करण्याची तयारी चालविली आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोवा पब्लिक गॅम्बलिंग दुरुस्ती विधेयक संमतही करण्यात आले आहे. यामुळे नागरी न्यायालय व प्रशासकीय लवादाला आता कसिनोंतील फसवणूकीची प्रकरणेही हाताळता येत नाहीत. गेमिंग कमिश्‍नर नियुक्त होईपर्यंत गोव्यातील कसिनो निर्बंधमुक्त आहेत असेच म्हणावे लागेल.
कसिनोच्या मयसभेत एकीकडे गेम्स खेळताना (पत्त्यांच्या जुगाराचे व अन्य प्रकार) दुसरीकडे डान्स बार, डिस्कोथेक, फिल्म्स बघण्याचीही सोय आहे. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाल्यास आराम करायचा असेल तर "सोबत'ही उपलब्ध होते व ऐषआरामी खोलीही, फक्त पैसे मोजा म्हणजे बस्स. जुगार खेळण्यासाठी असलेले छोट्याशा बोटीतील सभागृह म्हणजे खेळाच्या क्‍लृप्त्या शिकवण्यापासून विदेशी जुगाराची माहिती, पत्ते पिसण्यापासूनचे धडे देणारा अड्डा. जोडीला सुरापान, सुंदरी आहेत (जगभरातील युवती गोव्यात सेवेला असतात). आज कसिनोवर जाण्यासाठी पणजीतील रस्त्यावर प्रामुख्याने शुक्रवार, शनिवार, रविवारी उभी राहणारी वाहने पाहिल्यास देशवासियांसाठी कसिनोंनी घातलेली भूरळ लक्षात येते. पैशाची दादत नसणाऱ्यांच्या गोव्यात विकएंडला त्यांच्या फेऱ्या असतात, त्यांत मुलींची संख्या मुलांएवढीच असते. रात्री दोन वाजल्यानंतर गोव्याचे रात्ररंग युवक युवतींसाठी आकर्षित करू लागले आहेत व येणाऱ्या काही वर्षात गोवा म्हणजे कसिनो ही ओळख आणखी घट्ट होत जाणार असे दिसते.


किनारी गोवाची निर्मिती कोणाच्या पथ्यावर?

किनारी भागातील चेहऱ्यावर या अगोदर अनेकदा लिहून झाले आहे. लोकांनाही ते पटले होते, पण पूर्ण राज्याचे नाव जगभर बदनाम होईपर्यंत सरकारला या चेहऱ्याची दखल घ्यावीशी वाटली नाही असेच दिसून येते. पर्यटकांवर उटसूठ कारवाई करता येत नाही. त्याच्या आड आंतरराष्ट्रीय राजकारण, परराष्ट्रीय धोरण नि वकिलातींच्यामार्फत येणारा दबाव अशा गोष्टी येत असतात. सरकार उघडपणे या गोष्टी जनतेला सांगूही शकत नाही, पण पर्यटकांचे वर्तन नियंत्रणात ठेवण्यासाठी कायद्याचे पालन व रक्षण करण्यासाठी असलेल्या यंत्रणांचा धाक किनारी भागात ठेवणे सरकारचे कर्तव्य होते तसे न झाल्यानेच आज किनारी भाग अनियंत्रित व असुरक्षित असल्याचे चित्र रंगविण्याची संधी सरकारने सर्वांनाच दिली आहे.
पर्यटनावर राज्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे की नाही अशा चर्चांना आजच्या घडीला अर्थ नाही. कारण पर्यटनाने एक भयावह चेहरा धारण केला आहे. एकेकाळी नितांत सुंदर असलेले किनारे आता कॉंक्रिटच्या जंगलांनी भरून गेले, जात आहेत. दुसरीकडे किनाऱ्यांची धूप होऊ लागली आहे. त्यातच पर्यटकांची दादागिरी वाढली तर पर्यटन व्यवसाय कोलमडण्यास वेळ लागणार नाही. शेजारील सिंधुदुर्ग व कारवार जिल्ह्याने पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे येथील शांत सुंदर पर्यटन टिकविण्याचे आव्हान सरकारपुढे आहे व ते त्यांना पेलावेही लागणार आहे.
किनारी भागात सारेकाही आलबेल आहे असे पणजीत बसून सांगणे सहजसोपे आहे. किनारी भागात यापूर्वी पोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार घडले आहे. पर्यटकांच्या दोन गटांत मारामारी ते आता स्थानिकांना मारहाण असा या किनारी भागातील परिस्थितीचा प्रवास झाला आहे. तो रोखला न गेल्यास किनारी गोवा असा वेगळी संस्कृती असणारा प्रदेश उदयाला आला तर आश्‍चर्य वाटायला नको.
ब्रिटिश पर्यटक युवती स्कार्लेट किलिंगच्या खुनानंतर किनारी भागातील अमली पदार्थ आणि त्यात गुंतलेले सारे काही यावर मोठी चर्चा झाली. आता तर विदेशी वारांगनांना पोलिसांनी पकडल्याने साऱ्या चर्चेला एक वेगळे वळण मिळणार आहे. गोवा या मार्गावर जाणार याची कल्पना राज्यकर्त्यांना फार पूर्वीच यायला हवी होती. कुठलेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्र अशा प्रवृत्ती आणि अपप्रवृत्तींपासून मुक्त राहू शकत नाही. बाली असू दे वा पटाया त्यांनी या क्षेत्राच्या विकासाची वाटचाल कुठवर घसरू शकते हे यापूर्वीच सिद्ध केल्याने त्यापासून गोव्याने विशेषतः सत्ताधाऱ्यांनी धडा घेणे आवश्‍यक होते. पण या क्षेत्राची वाढ निकोप होईल, असा भाबडा आशावाद बाळगत क्षेत्र विकासावर भर दिला गेला व त्याची कटू फळे आज आकाराला आली आहेत. राज्याची अर्थव्यवस्था पर्यटन या एकमेव उद्योगावर अवलंबून आहे, सर्वसामान्य त्यावर अवलंबून आहेत असे फसवे आणि चुकीचे चित्र गेली काही वर्षे जाणूनबुजून रंगविले गेले. एका बाजूने खाणीवर गोवा अवलंबून तर दुसरीकडे पर्यटनावर या द्वंद्वात गोव्याचे काय झाले याचे विदारक चित्र सर्वांसमोर आहे. किनारी भागात सायंकाळनंतर सत्ता कुणाची चालते असा प्रश्‍न पडावा इतपत पर्यटकरूपी विदेशींची दादागिरी चालते. पोलिस या विदेशींसमोर गपगार का पडतात याचे उत्तर कधी तरी शोधले गेले पाहिजे. किनारी भागातील जनता आणि तेथे चालणारे बरेवाईट व्यवसाय याचे सख्य तर जगजाहीर आहे. त्यातून निर्माण होणारा पैसा देशाबाहेर जात असल्यास तो कसा जातो याचा शोध घेतला गेला पाहिजे. छोटे राज्य म्हणून दुर्लक्ष न करता या भागाकडे केंद्रीय यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे.
फक्त विदेशींना भाड्याने देण्यासाठी अशा पाट्या या भागात लागतात आणि त्यावर काही कारवाई होत नाही यातच सारे काही आले. आता या गोष्टींना निर्बंध घालणे फार कठीण बाब. एक तर किनारी भागातील साऱ्या पारंपरिक व्यवसायांची वाट लावत पर्यटनाने आपला कब्जा तेथे बसवला आहे. अनेकांच्या रोजीरोटीचे ते साधनच बनले आहे. केवळ दुकाने, गाड्या, जागा भाड्याने देऊन लक्षावधी रुपये कमावणारे अनेक जण या भागात सापडतील. त्यामुळे कुठलाही सत्ताधारी पक्ष या भागातील या प्रवृत्ती उखडू शकणार नाही. कारण त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे या व्यावसायिकांशी पंगा न परवडणारा आहे. किनारी गोवा, मध्यभागातील गोवा आणि डोंगराळ भागातील गोवा ( सत्तरी, सांगे, केपे आदी) असे तीन भाग निर्माण झाले हे सत्य आहे आणि ते नाकारलेही जाऊ शकत नाही. किनारी भागात राहणाऱ्यांनी घराच्या काही खोल्या या पर्यटकांना भाड्याने देण्यापासून या व्यवसायात पदार्पण केले. एक विदेशी तेथे राहिला की परत जाताना तो दुसऱ्या विदेशीला काकणभर जास्तच भाड्याने ती खोली मिळवून देतो, घरमालकाशी त्याची ओळख करून देतो. त्यापुढे वाहन भाड्याने देण्याचा व्यवसायही युवा वर्गात चांगला फोफावला आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी डोकेफोड करून अर्थार्जन करण्यापेक्षा सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या संधीचा लाभ घेण्याकडे युवावर्गाचा कल राहिल्याचे दिसते. त्यातून वारंवार येणाऱ्या विदेशींची ओळख वाढून, विदेशींबरोबर भागीदारीत व्यवसाय करण्यापर्यंतचा प्रवास केला गेला आहे. सॅटर्डे नाईट बाजाराच्या निमित्ताने अशा प्रकारांची मोठी चर्चा झाली होती, पण नंतर सारे विस्मृतीत गेले. तसेच याही प्रकारांबाबत घडणार आहे. वर्षभराने आणखी कुठले प्रकरण घडेल आणि गोमंतकीय समाजमन जागृत होऊन गोव्याच्या अस्मितेला तडा जाणारे हे प्रकार थांबवावेत अशी मागणी करेल. बैठका होतील , निवेदने देण्यात येतील पण पुढे काय याचे उत्तर मिळणार नाही. पर्यटन क्षेत्राची झालेली वाढ पुरेशी आहे, त्याचा विस्तार न पेलवणारा आहे हे कटू सत्य गळी उतरविणे कठीण काम आहे. पण राज्याच्या हितासाठी ते केलेच पाहिजे. पूर्वी कुटुंबासोबत किनाऱ्यांवर आठवड्यातून एकदा जाण्याची सोय होती. आता नग्न, अर्धनग्न अवस्थेत पहुडणाऱ्या पर्यटकांमुळे ती सोयही हिरावून घेण्यात आली आहे. विदेशींच्या या वागण्याची नक्कल अलीकडे देशी पर्यटकही करू लागल्याने साराच नंगानाच असे दृश्‍य किनारी भागात वर्षातील कुठल्याही दिवशी पाहता येते. या व्यवसायाला शिस्त घालू असे सरकार म्हणत असेल तर ती निव्वळ धूळफेक आहे. विदेशींना जोवर त्यांच्या चलनात दंड ठोठावला जात नाही तोवर येथील कायद्यांची जरब त्यांना वाटणार नाही. गाडी चालवताना हेल्मेट घातले नाही म्हणून होणारा शंभर रुपयांचा दंड ते अशा तुच्छतेने भरतात की तो घेतानाही पोलिसांना शरम वाटावी. पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने देशभरातील नागरिकांची येथे गुंतवणूक आहे. त्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्याचा प्रश्‍न आहे. आज कळंगुटसारख्या भागात तेथे सरकारी कामानिमित्त असणारेही खोली भाड्याने घेऊन राहू शकत नाहीत, एवढी भाडी वाढली आहेत. त्यामुळे किनारी भागाचे चित्र डोळ्यासमोर येऊ शकते. हळूहळू आता तुलनेने स्वस्त असणारे मोरजीसारख्या किनारी भागातील जीवन महागडे होत जाईल. त्यातून सर्वसामान्य माणसाला किनाऱ्यावर जाणे ही चैन न परवडणारी ठरू शकते. खरेच असे व्हावे असे सर्वांना वाटते का?

Sunday, December 9, 2012

सारेच गॅसवर

केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानावर एकदम 50 टक्के कपात जाहीर केली आणि अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या घोषणेचा फटका गोव्यालाच अधिक बसणार आहे. कारण 70 टक्के नागरीकरण झालेले हे एकमेव राज्य आहे. 80 च्या दशकापर्यंत ग्रामीण भागात फुंकली जाणारी चूल आता दुर्मिळ झाली आहे. गॅसवर भांडी काळी होत नाहीत, हे एक कारण पुढे करण्यात येत असले, तरी अलीकडच्या काळात गॅस वापरण्याशिवाय जनसामान्यापुढे पर्याय उरला नव्हता, हेही तितकेच खरे आहे. सुरवातीला सरपण आणि रॉकेल मिळणे दुर्लभ होत गेल्याने हळूहळू चुलीची जागा भुशाच्या शेगडीने घेतली. लाकूडतोडीवर निर्बंध आले नि लाकूड गिरणीही थंडावल्या, तशा या भुशाच्या शेगड्याही इतिहासाच्या सांदीकोपऱ्यात जमा झाल्या आणि मग प्रत्येकाला गॅसची गरज भासू लागली.
या साऱ्यांची जागा एका अनोख्या वस्तूने घेतली. गॅसचा सिलिंडर असे त्याचे नाव. पूर्वी शहरात मोजक्‍याच लोकांकडे असे सिलिंडर असत. सिलिंडरवरच्या स्वयंपाकाला वास येतो अशा तक्रारी ग्रामीण भागातील महिला वर्गाकडून पूर्वी ऐकू येत. गॅसवर फक्‍त चहाच करून एक सिलिंडर सहा सहा महिने वापरणारी कुटुंबेही त्या काळात पहावयास मिळत असत. वर दिलेल्या कारणांमुळे गॅसची निकड सर्वांना जाणवू लागली आणि 10 वर्षांपूर्वी गॅस विक्रेत्यांनी शहरालगतच्या भागात प्रवेश केला. पेडणे तालुक्‍यात गेल्या पाच वर्षात गॅस एजन्सी सुरू झाली, यावरून गॅसचा प्रसार किती अलीकडचा आहे हे लक्षात येते.
गॅस सिलिंडर आला नि स्वयंपाकाची शैली बदलली. गॅसच्या जोडीला कुकर आले. कुकरमधील भात खाल्ल्याने पोटात गॅस होतो हा समज कुठल्या कुठे पळाला. गॅसने स्वयंपाकघरात महत्त्वाची जागा पटकावली. सणाच्याआधी गॅस संपू नये म्हणून आणखी एक सिलिंडर घरात आणून ठेवण्यासाठी कुटुंबप्रमुखाची होणारी धावाधाव दिसून येऊ लागली. लोक सहलीला जातानाही स्वयंपाक करण्यासाठी सिलिंडर घेऊन जाताना दिसू लागले. गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याच्या बातम्या अधूनमधून वाचनात येऊनही गृहिणींना गॅसशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गॅस बुकिंग आणि गॅस सिलिंडर कधी मिळणार या विषयाला कौटुंबिक चर्चेत महत्त्वाची जागा मिळाली. गॅस सिलिंडर वेळेवर भरून मिळाला नाही तर शेजाऱ्याकडून सिलिंडरची उसनवारी सुरू झाली. या रूपाने उसनवारी करण्याच्या यादीत नवी वस्तू जमा झाली. घेतलेला गॅस सिलिंडर वेळेवर दिला नाही वा सिलिंडर उसनवारीवर घेऊन तो अर्धा वापरून वापरलाच नाही, अशा आविर्भावात परत केल्यानेही शेजाऱ्यांमुळे कटुता येण्यासही हा सिलिंडर कारणीभूत ठरलेला आहे.
असे किस्से अनेक सांगता येतील... परंतु सध्या हा गॅस सिलिंडर सर्वांना खलनायक भासत आहे. मुळात असे का झाले, याला कारण कोण याचा सरसकट विचार कोणीही केलेला नाही. पाच वर्षांपूर्वी मागेल त्याला गॅस ही योजना राबवण्यात आली. त्यामुळे एकाच कुटुंबातील अनेकांनी गॅसजोड घेतले. त्यापूर्वी गॅस जोडासाठी खासदारांची शिफारस आणावी लागायची, हे आजच्या काळात सांगूनही पटणारे नाही. गॅस सिलिंडर मोठ्यासंख्येने घरात आले तशी त्यांना स्वयंपाकघरातील जागा अपुरी पडू लागली. त्यांना पाय फुटले. मागणी तसा पुरवठा हा सर्वसामान्य न्याय येथे धावून आला. स्वयंपाकासाठीचा गॅस आणि व्यावसायिक कारणांसाठीचा गॅस यांच्या दरातील तफावत येथे कामी आली.
गॅस सिलिंडर हॉटेलममध्ये पोचले, काही केटररच्या मदतीला गेले, काही सिलिंडर गाडीत गॅस भरण्यासाठी पोचले, वेल्डिंगचा अनुभव घेण्याचेही अनेकांनी ठरवले. यामुळे सरकार कुटुंब चालवताना महागाईचा चटका जाणवू नये म्हणून केंद्र सरकार देत असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील प्रती सिलिंडर पाचशे रुपयांच्या अनुदानाच्या उद्देशच बासनात गुंडाळला गेला. गेली काही वर्षे हे प्रकार बिनभोबाट सुरू होते. मध्यंतरी गाड्यांत बसवण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने (रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात अलीकडे असा अपघात झाला होता) सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. त्यामुळे सिलिंडरचा गैरवापर होतो असा सरकारचा समज झाला. त्यांनी अनुदानात कपातीचा निर्णय घेतला. कंपन्यांनी आपले ग्राहक नेमके कोण हे जाणून घेण्याचेही याचवेळी ठरवले. आधीच महागाईच्या माराने त्रस्त झालेल्या गॅस ग्राहकाला मिळालेला हा दुसरा धक्का सध्या सहन करण्यापलीकडे पोचला आहे. कामधंदा सोडून केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज भरून देण्यासाठी रांगेत राहावे लागत आहे. गॅस जोड घेताना कागदपत्रे दिली, त्याची पडताळणीही करून घेतली मग आता पुन्हा का कागदपत्रे हवीत असा ग्राहकांचा संतप्त सवाल आहे.
आता गॅसच्या आहारी सारेजण एवढे गेले आहेत आणि अन्य कोणताही पर्याय नसल्याने मुकाटपणे कंपन्यांचे म्हणणे सहन करण्याशिवाय ग्राहकाच्या हाती काही राहिलेले नाही.
एका आर्थिक वर्षात अनुदानावरील केवळ सहाच सिलिंडर देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी गॅस विक्रेत्यांनी सुरू केली आहे. 13 सप्टेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या सहा महिन्यांसाठी अनुदानावरचे केवळ तीनच सिलिंडर देण्यात येणार असल्याचे विक्रेते सांगत असल्याने दसरा दिवाळीच्या तोंडावर गॅसधारकांची धावाधाव सुरू झाली आहे. त्यातच गॅस कंपन्यांनी सुरू केलेल्या केवायसीमुळे ग्राहकांची कोंडी झाली आहे. गोव्यात इंडियन ऑइल कंपनी, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आदी कंपन्यांचे विक्रेते आहेत. यात अनेकांनी एकाच कंपन्यांकडून अनेक जोडण्या (कनेक्‍शन) तर काहींनी वेगवेगळ्या कंपन्यांकडून जोडण्या घेतल्या आहेत. काही ग्राहकांकडील जोडण्या एका सिलिंडरच्या, तर काहींच्या दोन सिलिंडरच्या आहेत.
गॅस सिलिंडरची जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारकाला महिन्याला तीन लिटर रॉकेल मिळते. गॅस जोडणी असलेल्यांना रॉकेल मिळत नाही. यासाठी नागरी पुरवठा खात्याने शिधापत्रिकेवरच गॅस आहे की नाही याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र ती थंडावली आहे. त्यामुळे स्वतःच्या नावावर अनेक जोडण्या आणि दोन सिलिंडर असूनही शिधापत्रिकाधारक गॅस व रॉकेलसाठीही पात्र ठरले. आता वर्षातून सहाच सिलिंडर मिळणार असल्याने अनेकांना हा डबलगेम संपणार आहे.
केंद्र सरकारने सहा सिलिंडरची घोषणा करताच गॅस विक्रेत्यांनी आपल्या ग्राहकांना सहा महिन्यांसाठी तीनच सिलिंडर अनुदानित दरात मिळणार असल्याचे सांगण्यास सुरवात केली आहे. सध्या अनुदानावरील गॅस सिलिंडरचा दर 418 रुपये असून बाजारभावानुसार 918 रुपये आहे. यामुळे ग्राहकांची दसरा दिवाळी अनुदानावरील गॅसवर जाणार असली, तरी त्यानंतरचा संसार बाजारभावावरील गॅसवर करावा लागणार आहे. अनुदानावरील गॅस सिलिंडरसाठी मर्यादा घालतानाच कंपन्यांनी ग्राहकांची संख्या निश्‍चित करण्याची सुरवात केली आहे. यातूनच तुमचा ग्राहक ओळखा (केवायसी) उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात गॅसधारकांकडून रहिवासी व ओळखीचा पुरावा घेण्यात येत आहे. यामुळे एकाच नावावर असलेल्या अनेक जोडण्या बंद पडण्याची भीती ग्राहकांना असून निनावी जोडण्या आपोआप बंद होण्याची आशा कंपन्यांना आहे. सध्या रहिवासी व ओळखीचा पुरावा घेऊनच कंपन्यांकडून ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत आहे.
एका गॅसजोडणीधारकाला वर्षातून अनुदानावरचे सहा सिलिंडर देण्यात येणार असल्याने काही कुटुंबांनी शिधापत्रिकेची (रेशनकार्ड) फोड करून कुटुंबांची विभागणी सुरू केली आहे. त्यावरून नवीन गॅस जोडण्या घेण्यासाठी ग्राहक पुढे येत आहेत. यात एकाच नावावर असलेल्या अनेक जोडण्या अडचणीच्या ठरत आहेत. गॅस जोडणी दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करता येत नसल्यानेही मोठी अडचण झाली आहे. या स्थितीत एक जोडणी सोडून अन्य जोडण्यांवर पाणी सोडण्याची वेळ येण्याची भीती ग्राहकांना आहे.
मुळात गॅस सिलिंडरचा गैरवापर रोखणे ही नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. त्यांनी स्वयंपाकासाठीचे गॅस सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरताना जप्त करावयास हवे होते. त्यांनी तसे न केल्याने आता सर्व ग्राहकांना रांगेत राहण्याची वेळ आली आहे. एकाबाजूने नागरी पुरवठा खाते पुरेसे रॉकेल शिधापत्रिकेवर देऊ शकत नाही तर दुसऱ्या बाजूने गॅसचा गैरवापर रोखण्याची भूमिकाही बजावत नाही असा दुहेरी अपयशातून हा प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातही राज्य सरकार किती सिलिंडरवर व कसे अनुदान देणार हे अद्याप स्पष्ट न झाल्याने तोवर सर्वांनाच "गॅसवर' राहण्याची वेळ आली आहे!