Sunday, March 20, 2011

जैतापूरमुळे मच्छीमारांवर निर्बंध नाहीत

जैतापूर येथील अणू ऊर्जा प्रकल्प झाल्यानंतर साखरीनाटे व जैतापूर येथील बंदरातील मच्छीमारांच्या हालचालीवर कोणतेही निर्बंध येणार नाहीत. त्यांच्या व्यवसायाला कोणताही फटका बसणार नाही, असे जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाचे विशेषाधिकारी जुगल किशोर सिंह यांनी मला सांगितले.
ते म्हणाले, या प्रकल्पापासून जनतेला कोणताच धोका नाही. उलट फायदाच आहे. कैगा येथे प्रकल्प सुरवात होण्यापूर्वीपासून मी कैगात आहे. तेव्हाचे कैगा आणि आताचे कैगा यावर त्याचमुळे मी अधिकाराने बोलू शकतो. त्याहीपेक्षा मल्लापूर येथील अधिकृत निवास संकुलापेक्षाही प्रकल्पाच्या अगदी जवळ माझे घर आहे, तेथे माझे कुटूंब आहे त्यामुळे प्रकल्प सुरक्षित आहे हे सांगण्याचा अधिकारही मला त्याचमुळे पोचतो.
कैगा हे गावाचे नावही प्रकल्प येण्याअगोदर कोणाला माहित नव्हते आज कैगाला जागतिक नकाशावर स्थान आहे, असे नमूद करून ते म्हणाले, प्रकल्पात नोकरी मिळाल्याने जंगलाच्या एका कोपऱ्यात मर्यादीत साधनसुविधांच्या आधारे जगणाऱ्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली. एरव्ही फारतर माध्यमिक शिक्षणापर्यंत मजल मारणाऱ्या इथल्यांची मुले आज वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. त्या पुढची पिढी त्याही पुढे मजल मारेल. त्यामुळे मानवी विकासाला चालना देण्याचे काम प्रकल्पाने केले असे म्हणता येईल. मनुष्यबळ विकास असे आम्ही म्हणतो ते यापेक्षा काही वेगळे असते? या परिसरात प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला गती आली. गेले दशकभर बांधकामाच्यानिमित्ताने हजारो लोक या परिसरात होते. त्यांच्या निवासापासून इतर गरजांही याच परिसरातने भागविल्या. तो पैसा स्थानिकांच्याच हातात गेला. साधनसुविधा या परिसरात विकसित झाल्या आहेत. त्याचाही फायदा स्थानिकांनाच होत आहे व होत राहील.
जीवनाकडे एका वेगळ्या नजरेतून बघण्याचे भान प्रकल्पाने या परिसरातील जनतेला दिले असे त्यांच्याशी बोलताना जाणवल्यावाचून राहणार नाही असा दावा करून सिंह म्हणाले, विकासाला पूरक अशी दृष्टी कैगाच्या लोकांकडे होती व आहे. अणू ऊर्जेबाबत तत्कालीन अखरेचा शब्द असलेले राजा रामण्णा तर कर्नाटकचे भूमीपूत्र. त्यांनी कैगा येथे हा प्रकल्प आणताना सुरक्षिततेविषयी विचार केलाच असणार. हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने चार डोंगराच्या मध्ये हा प्रकल्प साकारला आहे. त्याने निसर्गाला कोणताही उपसर्ग पोचला नसल्याचे सिद्ध झाले आहे.
 
 
पाषणयुगात मानवाने दगडापासून पहिल्यांदा हत्यार तयार केले नंतर तो इमारती बांधण्यास शिकला. अणूबॉंब तयार झाल्यानंतर आता अणूपासून ऊर्जा म्हणजेच वीज मिळविणेही त्याच धर्तीवर विकसित झाले आहे.
जुगल किशोर सिंह विशेषाधिकारी जैतापूर प्रकल्प

No comments:

Post a Comment