Sunday, March 20, 2011

कैगात अनेक विकासकामे मार्गी

कैगा अणूउर्जा प्रकल्प सामाजिक जबाबदारी म्हणून सभोवतालच्या गावात स्वतःहून अनेक विकासकामे दरवर्षी करतो. किमान चाळीस ते पन्नास लाख रुपये यासाठी खर्च केले जातात असे प्रकल्पाचे अतिरीक्त मुख्य अभियंता तसेच जनकल्याणकारी प्रकल्प समितीचे प्रमुख बी. के. चेन्नकेशव यांनी सांगितले.
ते म्हणाले, कैगा प्रकल्पाने सुरवातीपासूनच समाजाप्रती देय असलेल्या जबाबदारीचे भान ठेवले आहे. त्याचमुळे 2002-03 वर्षात दोन कोटी 40 लाख रुपये, त्यानंतर दोन कोटी 40 लाख, आणि त्यानंतरच्या प्रत्येक वर्षात 40-50 लाख रुपयांची विकासकामे परिसरात केली आहेत. प्रकल्पाने अशी कामे करण्यासाठी प्रत्येक विभागाचे प्रतिनिधीत्व असणारी आमची समिती नेमली आहे. गावकरी या समितीशी पत्रव्यवहार करतात व समितीचे सदस्यही ग्रामस्थांशी अधूनमधून संवाद साधतात. त्यातून नेमकी कशाची गरज आहे हे अधोरेखित होते. ती विकासकामे हाती घेतली जातात.
राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करणे अपेक्षित असलेली रस्ता बांधकाम, पुल बांधकाम, शाळा इमारत बांधणी ही कामेही प्रकल्पाने परिसरात केल्याचे सांगून त्यांनी त्या कामांची जंत्रीच सादर केली. ते म्हणाले, कैगा मल्लापूर या 22 किलोमीटर रस्त्याची देखभाल दुरूस्ती प्रकल्प करतो. कैगाहून यल्लापूरला जाण्यासाठी बारेघाटमार्गे असलेल्या 14 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकामही तीन कोटी रुपये खर्चून प्रकल्पाने केले आहे. अनेक प्राथमिक शाळांच्या इमारतीही बांधल्या आहेत. त्यात विरजे, कुर्नीपेठ, हातुगा, कुचेगार, मल्लापूर येथील शाळा इमारतींचा समावेश आहे. त्याशिवाय मल्लापूरच्या पेयजल पुरवठ्यासाठी एक लाख लीटर क्षमतेची टाकी उभारली आहे. कुर्नीपेठ येथे 75 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी तर शिंगेवाडी कद्रा येथेही पाणी पुरवठ्यासाठी प्रकल्पाने टाकी उभारली आहे. हातुगा, कुचेगार येथे विंधन विहिरी प्रकल्पाने दिल्या आहेत. याशिवाय हातुगा, कुचेगार, मल्लापूर, कद्रा, यल्लापूर येथील शाळांना आवश्‍यक ते फर्निचर तर विरजे, कद्रा,मविनमणे, वज्राली येथील शाळांना संगणकही प्रकल्पाने भेट दिले आहेत. याशिवाय परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या- पुस्तके आणि दप्तरही प्रकल्प पुरवितो.
हरूर या शेजारील गावाला पथदीप प्रकल्पाने बसवून दिले आहेत शिवाय मल्लापूर पुनर्वसन कॉलनी, लक्ष्मीनगर, अणशी, कद्रा,वैलवाडा येथे बहुउद्देशीय सभागृहेही प्रकल्पाने बांधून दिल्याचे सांगून चेन्नकेशव म्हणाले, महिलांना स्वयंरोजारासाठी शिलाई यंत्रेही दिली आहेत, शिवाय त्यांना आवश्‍यक ते कामही पुरविले जाते. हरुर येथील पूलही प्रकल्पाने उभारला आहे.
हातुगा या गावाला राज्य सरकारने प्रत्येक घरामागे एकाच बल्बचे कनेक्‍शन दिले होते. तेथील 80 घरात एक पंखा व ट्यूबलाईट बसविण्याचे काम कैगा प्रकल्पाने केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पहिली शिकणाऱ्या विशेष  चमक दाखविणाऱ्या विद्यार्थ्यास प्रकल्पाच्या केंद्रीय विद्यालयात दाखल करून घेतले जाते. त्या विद्यार्थ्यांचा त्यानंतर बारावीपर्यंतचा शिक्षणाचा व आरोग्याचा पूर्ण खर्च प्रकल्पाकडून केला जातो. याशिवाय विद्यार्थ्यास मासिक तिनशे तर विद्यार्थिनीस मासिक चारशे रुपये प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय उच्च शिक्षणासाठी मदतीचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे धोरण प्रकल्पाने राबविल्याचे चेन्नकेशव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment