Sunday, February 17, 2013

माऊलीची महती

 संत मुक्ताबाई नसत्या तर संत ज्ञानेश्‍वर घडलेच नसते. पूर्वी स्त्री-पुरुषांमध्ये भेद व्हायचा. तो भेद दूर करण्यासाठी संतांनी त्या काळापासून प्रयत्न केल्याचे दिसून येते. स्त्रियांना मिळालेले अधिकार हे कोणत्याही आंदोलनातून मिळालेले नाहीत. स्त्रीने आपल्या बुद्धीच्या बळावर हे अधिकार मिळविले आहेत. त्यामुळे संतांच्या काळापासून स्त्रियांना महत्त्व दिले गेले आहे. आर्थिक स्थैर्य नव्हते म्हणून पूर्वी स्त्रिया चूल आणि मूल यामध्ये अडकल्या होत्या. आजची स्त्री प्रगल्भ बनली आहे. निर्णय घेण्याची क्षमता स्त्रियांमध्ये आली आहे. आज समाजात स्त्रियांना मानाचे स्थान मिळत आहे; परंतु इतिहास पाहिला तर संतांनी स्त्रियांना पुरुषांबरोबरचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्रिया पूर्वीपासूनच सक्षम आहेत, हे सिद्ध होते. सातशे वर्षांपूर्वी संतांच्या संमेलनाची सूत्रे एका स्त्रीकडे देण्यात आली होती. संतांच्या पहिल्या संमेलनात संत ज्ञानेश्‍वरांनी दासी असलेल्या जनाबाईंकडे संमेलनाची सूत्रे सोपविली होती. महिला संतांचे श्रेष्ठत्व कुणालाही कळले नव्हते. ते त्या काळी संत ज्ञानेश्‍वरांना कळले होते. त्यामुळे स्त्रियांना कमी लेखणे चुकीचे ठरेल. स्त्री संतांच्या साहित्याचाही प्रचार व्हायला हवा. पूर्वी स्त्रियांना जो सन्मान होता तो आज राहिलेला नाही. स्त्रियांकडे वासनेच्या नजरेने पाहिले जाते. पुरुषांची ही दृष्टी बदलली पाहिजे. स्त्रियांकडे माऊलीच्या दृष्टीने पाहिले जायचे. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. सोयरा आणि निर्मळा, मुक्ताबाई, जनाबाई आदींनी आपल्या बुद्धीच्या बळावर आपले स्थान निर्माण केले होते. त्यांनी जी उंची गाठली ती कुणालाही शक्‍य होणार नाही. महिला संतांच्या साहित्याचा अभ्यास करून महिलांना स्वावलंबी बनण्याची प्रेरणा मिळू शकेल. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री संतांची शिकवण आणि विचार महत्त्वाचे ठरतात.