Saturday, April 30, 2011

सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी

परमेश्‍वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी असा उल्लेख मला 1998 मध्ये ऐकता आला. 1998 मधील जुलैपासून सलग वर्षभर मी सावंतवाडीत होतो.तलावाच्या काठावर वसलेले हे शहर अलीकडच्या काळात उदयाला आले आहे. गाव मौजे चराठे या गावाची सावंतवाडी ही वाडी अशी माहिती मला सावंतवाडीतील दै. "कोकणसाद'चे संपादक गजानन नाईक यांच्याकडून मिळाली. आजही चराठेभोवती असलेला खंदक पाहता येतो. विजय देसाई यांच्यासोबत त्या खंदकाची पाहणी मी केली होती. तेव्हाही तो सुस्थितीत होता. सावंतवाडीत असताना श्रीराम वाचन मंदिरात जाऊन बसणे हा माझा नित्याचा उद्योग होता. 100 वर्षे होऊन गेलेले हे वाचनालय आजही सुस्थितीत आहे. आता तर नवी इमारत उभी राहिली आहे. ग्रंथपाल दीनानाथ नाईक यांचा हसरा चेहरा आजही नजरेसमोर आहे. या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयानंद मठकर हे नेहमी कुठली पुस्तके वाचनालयात हवीत याविषयीची माझी मते आवर्जून ऐकत. त्यामुळेच की काय अनेक विषयांवरील पुस्तकांचा मोठा संग्रह या वाचनालयात आहे. सावंतवाडीत असताना तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांच्याशी माझा विशेष स्नेह जुळला. विकासाच्या बाबतीत त्यांची मते ऐकून मला कधी कधी थक्क व्हावे असे वाटत असे. त्यांच्याच कारकिर्दीत तळ्याच्या बाजूला संगीताच्या तालावर नृत्य करणारा कारंजा, अद्ययावत उद्यान उभे राहिले. एवढेच कशाला रेस्टॉरंटही सुरू झाले. तळ्याच्या भोवती जॉगिंग करण्यासाठी पदपथ आकाराला आला. मोती तलावात झालेले शेवाळ खाण्यासाठी मासे आणून तलावात सोडण्याचा उपक्रम नगरपालिकेने राबविला होता. मे महिन्याच्या पूर्वी तलावातील पाणी आटू लागते त्याच दरम्यान ते मासे कुणी तरी खाण्यासाठी पळविण्याचा प्रकारही उघडकीस आला होता. अजीज शेख हे मुख्याधिकारी असताना अचानकपणे तळे आटविण्याच्या प्रकाराची मोठी चर्चाही आजही आठवते.सावंतवाडीच्या मोती तलाव ही पूर्वीच्या काळची सिंचन व्यवस्था होती. त्या संदर्भातील जुने कागदपत्र प्रा. जी. ए. बुवा यांच्याकडे मला पाहता आले. त्या काळी सावंतवाडीत पिण्याचे पाणी केसरी या गावातून आणण्यात येत होते. आजही ती व्यवस्था कायम असून गोविंद चित्रमंदिर येथे असलेला सार्वजनिक नळ हा केसरीच्या पाण्यावर चालतो. सावंतवाडीहून बेळगावकडे जाणारा मार्ग फुटतो त्या तिठ्याला गवळी तिठा असे नाव आहे. गेल्या दोन वर्षांत त्या भागात मोठ्या इमारती उभ्या राहून त्या भागाचा चेहरा-मोहराच बदलला आहे. पूर्वी सिनेमाघर होते त्या जागी आता मोठाले कॉम्प्लेक्‍स उभे राहिले आहे. पालिकेजवळ उघड्यावर चालणारा बाजार आता बंदिस्त इमारतीत हलविण्यात आला आहे. सावंतवाडीच्या बाजारातून वरच्या बाजारात जाताना वाटेत विठ्ठल मंदिर लागते. या मंदिरातून पूर्वी शहराच्या सर्व सीमा दृष्टीस पडत. आता इमारती उभ्या राहिल्याने ती मजा हरवली गेली आहे. या वरच्या बाजारातून खाली उतरताना चितार आळी लागते.सावंतवाडी हे शहर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे असा उल्लेख पाठ्यपुस्तकात होता. ही ओळख पटवून घेण्यासाठी चितार आळीशिवाय पर्याय नाही. तेथे अशी खेळणी मिळणारी ओळीने सात दुकाने आहेत.सावंतवाडीत असताना पत्रकार अरविंद शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. गेली 25 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या शिरसाट यांची स्मरणशक्‍ती दांडगी. सावंतवाडीविषयी सर्व संदर्भ त्यांना तोंडपाठ. एकदा मला त्यांनी हंसा वाडकर यांच्या सावंतवाडीत असलेल्या घराविषयी थोडीफार माहिती दिली होती. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे नंदू ऊर्फ नंदकिशोर पेडणेकर यांनीही सावंतवाडीत पूर्वीच्या काळी पथदीप कसे होते, सावंतवाडीत कर व्यवस्था, न्यायदान व्यवस्था कशी होती याची माहिती दिली. सालईवाड्यात शंभर वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचे दृश्‍य आजही डोळ्यासमोर येते.सावंतवाडीच्या राजघराण्यातील समाध्या माठेवाडा भागात आजही पाहायला मिळतात. राजेश नाईक त्या भागात राहतात. त्यांनी मला या माठ्यांविषयी माहिती दिली. सावंतवाडीत जाण्याचे प्रवेशद्वार म्हणजे गोलगावचा दरवाजा. आता ही वास्तू सुस्थितीत असली तरी 1998 मध्ये तिच्या दुरवस्थेबद्दल लिहिल्याबद्दल कोलगाव दरवाज्याचे मालक "सुकी' यांच्याकडून मला थोडे ऐकावे लागले होते.सावंतवाडीत आता शिल्पग्राम उभे राहत आहे. परवाच शिवप्रसाद देसाई यांच्याशी बोलताना ते लवकरच आकाराला येईल, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा सावंतवाडीत जाण्याची संधी मिळाली तर शिल्पग्राम पाहण्याचा मानस आहे.

Friday, April 22, 2011

पार्से गाव नव्हे, नररत्नांची खाण!

मुंबईचा भाऊंचा धक्का फार प्रसिद्ध आहे. साहित्यातही तो अजरामर झाला आहे. या धक्‍क्‍याचे नामकरण ज्यांच्या नावावरून झाले ते भाऊ पार्सेचे. पार्से गाव नव्हे, तर ही नररत्नांची खाणच आहे. देश पातळीवर गाजलेल्या अनेकजणांची जन्मभूमी. सध्या गोव्याच्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सव सुरू आहे.या मुक्तीसाठीच्या लढ्यातील पहिला उठाव याच पार्सेत झाला. त्यानिमित्ताने या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या.कोण कुठला ? तर तो पार्सेचा असे सांगितल्यावर गोवाभर नव्हे, तर कोकणातही आदराने पाहिले जाते. सेतू माधवराव पगडी पार्सेत आले, त्यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर झालेल्या प्रश्‍नोत्तराच्या वेळी गावाची महती अनेकांना कळली. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरवात पार्सेत झाली याचा उल्लेख होतो तेव्हा छाती अभिमानाने भरून येत नसेल असा पार्सेवासीय नाही. इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते, की हा केवळ गाव नव्हे तर अनेक नररत्नांची ही खाणच आहे आणि त्यातून यापुढेही इतिहास घडवणारी रत्ने जन्माला येतील असेच या गावचे वातावरण आहे.26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 19 डिसेंबरला श्री भगवती मंदिराजवळच्या स्मारकाला वंदन केले जाते. त्यावेळी भाषणे होतात. त्यात गावाविषयी फारसे अभावानेच बोलले जाते. नव्या पिढीला या गावाचा वारसा सांगण्याची गरज आज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे. क्रांतिकारकांचा गाव ही ओळख अनेक प्रश्‍नांवर गावाने घेतलेल्या प्रखर भूमिकेमुळे आजही गोव्याला आहे. सध्या नागरी विभागात समावेश झाल्याने दूरध्वनीचे मासिक भाडे वाढले आहे, त्याविरुद्ध पार्सेवासीय एकवटले आहेत.निसगार्ने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या गावातील संपदाही गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक जपली आहे. चारशे वर्षांपूर्वी येथील लोक लढवय्ये होते अशी नोंद इतिहासात आढळते. गावात ताणतणाव असले, तरी जत्रा, गणेश चतुर्थी, दसरा सणांच्यावेळी एकत्र येण्याची परंपरा आजही कायम आहे. जत्रेला गावी न येणारा इथला रहिवासी विरळच. गावाला संगीताचीही मोठी परंपरा आहे. महिलांना आज आरक्षण देण्याची मागणी वाढत चालली आहे. आज कोणालाही खरे न वाटो परंतु 1917 मध्ये बाळा पार्सेकर यांनी स्त्री नाटक मंडळ सुरू केले होते. त्यात नाटकातील सर्व भूमिका महिलाच करायच्या. गोवा, उत्तर कर्नाटक, कोकण ते पार मुंबईपर्यंत या मंडळाने नाट्यप्रयोग सादर केले आहेत. आजही हौशी रंगभूमीवर शिमग्याच्यावेळी रंगमंचावर जाण्यास अनेकजण उत्सुक असतात.पार्से युवक संघाने रंगभूमीवर आणलेली नाटके नाट्यप्रेमी विसरूच शकणार नाहीत. गोव्याचे महाराष्ट्रात आणि दिल्लीत प्रतिनिधित्व करण्याचा मान या संघाने अनेकदा पटकावला आहे. या संघाच्या "अशी पाखरे येती'च्या आठवणी आजही सांगितल्या जातात. अशा अनेक गोष्टी या गावाबद्दल सांगता येतील. पार्सेत चार मार्गे येता येते. शिवोली चोपडे पुलाकडून आगरवाडामार्गे, केरी हरमलहून कोरगावमार्गे, कोलवाळ धारगळहून तुयेमार्गे किंवा सरळ पेडण्यातून किंवा मोरजीहून. पार्से म्हटल,े की स्व. गोविंद मंगेश लाड (अर्थशास्त्र तज्ज्ञ व संपादक), स्व. डॉ. भाऊ दाजी लाड (डॉक्‍टर, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक), स्व. परशुरामबुवा पार्सेकर (गायक), स्व. दामू अण्णा पार्सेकर (तबला वादक), स्व. भालचंद्र पार्सेकर (तबला वादक), स्व. यशवंत बुगडे (स्वातंत्र्यसैनिक), स्व. श्रीधर पार्सेकर (व्हायोलिन वादक) यांची नावे आठवतात. त्यांच्यानंतरच्या पिढ्याही कर्तबगार निघाल्या. शिक्षण संचालक अशोक देसाई, औद्योगिक विकास महामंडळाचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक गोपाळ देसाई, लेखिका सुमेधा कामत देसाई, तियात्रीस मार्सेलीनो दी बेतीम, मुंबईच्या बेस्टचे माजी अध्यक्ष रामानंद लाड, मराठी नाट्यसृष्टीतील भालचंद्र कळंगुटकर, सुरेंद्र देसाई (वकील), अमोल म्हालदार (शल्यविशारद), अरुणा प्रभू (डॉक्‍टर), देवेंद्र आरोलकर (मेकॅनिकल इंजिनिअर), सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक केशव आत्माराम प्रभू, बाळकृष्ण कानोळकर (प्राध्यापक), हनुमंत गवंडी (वकील), दशरथ पेटकर (वकील) यांचीही नावे सहजपणे आठवतात.

कुडाळची घोडेबाव आणि बरेच काही

1998-99 मध्ये सावंतवाडीला असताना मी तेर्सेबांबर्डे येथे राहत होतो. तेथून कुडाळ सहा किलोमीटरवर. कुडाळला पत्रकार अर्जुन राणे यांनी सांगेपर्यंत कुडाळ म्हणजे काय ते मला कळले नव्हते. कुडाळचा पट राणे, देवेंद्र वालावलकर, नरेंद्र खोबरेकर, रवी गावडे यांनी उलगडून दाखविला.अकराव्या शतकापर्यंत कुडाळ प्रांताच्या राजधानीचे हे ठिकाण होते. सध्या येथे असलेली न्यायालयाची इमारत म्हणजे भुईकोट किल्ला होय. शिवाजी महाराजांनी बांधलेली ऐतिहासिक घोडबाव विहीर शहरात बसस्थानकासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर आहे. तेथेही मी अनेकदा राहिलो. तेथे आबा शिरसाट यांच्याशीही अनेकदा माझी कुडाळ व अनेक विषयांवर अनेकदा चर्चा होत असे.कुडाळपासून 20 कि.मी. अंतरावर नारूर गाव आहे. तेथून रांगणागडावर जाण्यासाठी दीड ते दोन तास पायी जावे लागते. तेथेही जाण्यासाठी पाय दुखेपर्यंत (आठवडाभरपर्यंत) मी चाललो. वाडोस, पांग्रड या ठिकाणाहूनही गडावर जाता येते. कुडाळ हायस्कूलपासून जरा पुढे आल्यावर शहरापेक्षा थोडे उंचीवर एका उंच सपाट टेकडीवर वसलेले जागृत देवस्थान म्हणजे श्री गवळदेव. वेंगुर्ला रोडवर आज कुडाळच्या एमआयडीसी विभागाची जेथून सुरवात होते ती टेकडीच या दैवताचे तीर्थक्षेत्र झाली आहे. कुडाळची पर्वती म्हणून या टेकडीचा मोठ्या अभिमानाने कुडाळवासीय गौरव करतात. तसेच आणखी पुढे आल्यावर राऊळ महाराजांच्या समाधीमुळे प्रसिद्ध पावलेला पिंगुळी गाव आहे. तेथे ठाकर समाजाने लोककलांचे जतन केले आहे. "कळसूत्री बाहुली' या कलेबरोबरच गोंधळ, पांगुळ, चर्म बाहुल्या, पोवाडा, पिंगळी, राधानृत्य, शॅडोपपेट आदी लोककला मला तेथे पाहता आल्या.कुडाळच्या दुसऱ्या बाजूला हळदीचे नेरूर येथे स्वयंभू जटाशंकर मंदिर आणि गणपती मंदिर ही पुरातन मंदिरे आहेत. मंदिराच्या एका बाजूला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याची हद्द असलेला हणमंते घाटाचा पहाडासारखा कडा, पश्‍चिमेला गावावर टेहळणी करण्यासाठी पुढे सरसावलेले रांगणागडाचे टोक, गडावरून खाली उतरत आलेली सह्याद्री पर्वताची विशाल रांग, अशा इंग्रजी "यू' आकाराच्या खोबणीत विसावलेला हा परिसर बाळा मेस्त्रींसोबत मी अनुभवला आहे. मंदिर परिसरात बारमाही वाहणारे छोटे-छोटे पाण्याचे प्रवाह आहेत. तेथेही मनसोक्त भटकंती मला करता आली. राहत होतो त्या तेर्सेबांबर्डे गावालगत झाराप हे गाव. राष्ट्रीय महामार्गावरच्या या गावाचे नाव मी गोव्यात असतानाही मूर्तींच्या संदर्भात ऐकले होते. कांता बाणे यांच्यासमवेत मी तो गाव पाहिला. गावात दीडशे ते दोनशे विविध आकाराचे मोठ-मोठे दगड पाहावयास मिळतात. झाराप गाव दगड-धोंड्यांचा, चिकण मातीचा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी मातीची मजबूत, टिकाऊ व नक्षीदार भांडी बनविली जायची. ही भांडी बैलगाडीने चिपळूणमार्गे वसई-मुंबई, दक्षिणेस गोव्यापर्यंत नेली जात. कुंभारवाडीत म्हारकटेश्‍वर मंदिराजवळ एकावर एक नैसर्गिकरीत्या रचलेले मोठ-मोठे दगड लक्षवेधी आहेत. वरचीवाडीत "चाळोबा' देवस्थान आहे. छोटीशी देवीची घुमटी भल्या मोठ्या दगडाच्या खालीच आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे मोठे दगड एकावर एक रचून वर्षानुवर्षे ठेवले आहेत. तो परिसर त्यामुळेच मनात कायमचा घर करून गेला आहे.

Thursday, April 21, 2011

असा आहे आडिवरेचा परिसर

जैतापूर येथे झालेल्या गोळीबारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे परिसर चर्चेत आला आहे. तो गाव आणि परिसर मी कित्येकदा हिंडलो आहे. राजापूरपासून विसेक किलोमीटरवरील आडिवरे येथील सदानंद पुंडपाळ यांच्याशी माझा विशेष स्नेह. रत्नागिरीहून मोटारसायकलने सावंतवाडी येथे जाताना मी मुद्दामहून आडिवरेमार्गे जात असे.पुंडपाळ यांच्यासोबत त्या परिसरात फिरताना सध्या भग्नावस्थेत असलेल्या पण एकेकाळी समृद्ध असलेल्या आडिवरेचे दृश्‍य डोळ्यासमोर तरळून जायचे. त्या परिसरात कातळ फोडून केलेली हापूस आंब्याची लागवड हे आणखीन एक वैशिष्ट्य. त्या आंब्याची चवच वेगळी. ती चाखण्यासाठीही मेमध्ये भर उन्हात घामाच्या धारा लागत असतानाही मोटारसायकलचे चाक आडिवरेकडे वळायचे. या आडिवरेजवळ नाटे आहे. तेथे असलेल्या यशवंत गडावरही आम्ही गेलो होतो. हा गड शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजारामाने बांधला, असे सांगितले जात असले, तरी तो शिवाजी महाराजांनीच बांधला आहे. त्याबाबतची माहिती आपण फार पूर्वी पत्की घराण्याच्या मोडी कागदपत्रांमध्ये वाचल्याचे गडाचे सध्याचे वारसदार विश्‍वनाथ रघुनाथ पत्की यांनी एकदा सांगितले होते. हा गड बांधत असताना शिवाजी महाराजांना इतरत्रही यश प्राप्ती झाली आणि म्हणूनच या गडाचे नाव यशवंतगड असे ठेवण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. स्वतःचे सुसज्ज आरमार उभारणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते. त्यामुळेच हा गड शिवाजी महाराजांनीच बांधला असावा या जाणकारांच्या मताला पुष्टी मिळते. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज इथे व्यापारासाठी आले आणि त्यांनी इथल्या राजकारणात ढवळाढवळ करण्यास सुरवात केली. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला असताना त्याला राजापूरच्या टोपीकरांनी तोफा पुरवल्या होत्या. त्याचा राजांना राग होताच. त्याची त्यांनी नंतर सव्याज फेड केली हा भाग वेगळा. राजापूर ही मोठी व्यापारी पेठ होती. राजापूर या ब्रॅंडखाली मोठी उलाढाल होत होती. त्यांचा सर्व माल गलबतातून जैतापूर खाडीतून येत-जात होता. या खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी बंदरानजीकच यशवंतगड असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते. पूर्णगडचा छोटेखानी किल्ला जिंकण्यासाठी महाराज यामार्गे गेल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. याच दरम्यान मार्च 1661 मध्ये त्यांनी कशेळीच्या कनकादित्य मंदिराला भेट दिल्याची नोंद उपलब्ध आहे. जैतापूर खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी या जुन्या व सुरक्षित बंदराजवळ सात एकर जागेवर गडाची उभारणी करण्यात आली असून सभोवती उंच व सुमारे दहा फूट रुंदीची अभेद्य तटबंदी आहे. तटबंदीतच आठ बुरूज असून एक बुरूज समुद्रालगत आहे, तर हनुमान बुरूज सर्वांत भक्कम असून तिथून पश्‍चिमेला आंबोळगड व अरबी समुद्र, तर दक्षिणेला विजयदुर्ग व उत्तरेला पूर्णगडपर्यंतचा मुलूख दिसतो. त्यावर टेहळणी करण्यासाठी व संदेश वहनासाठीही त्याचा वापर करण्यात येत होता. तटबंदीला पायऱ्यांचा रस्ता आहे. तटबंदीच्या आत बालेकिल्ला असून त्याला तिन्ही बाजूंनी खंदक आहे. जवळच सुमारे 80 फूट खोल विहीर आहे. प्रवेशद्वारे कमानीच्या आकाराची असून संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडातील आहे. हा स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुनाच मानावा लागेल. याच गावचे सुपुत्र आणि सर्जन (कै.) डॉ. रघुनाथ सीताराम पत्की हे पहिल्या महायुद्धाच्या वेळी लष्करात डॉक्‍टर होते. युद्धातील कामगिरी आणि पंचम जॉर्ज यांच्यावर उपचार करण्यासाठी भारतातून पाठवलेल्या डॉक्‍टरांच्या पथकातही ते होते. हे विचारात घेऊन पंचम जॉर्जने 1921 मध्ये हा किल्ला आणि विजयदुर्ग, पूर्णगड, जैतापूर, प्रभानवल्ली आदी 17 ठिकाणी त्यांना इनामी जमिनी दिल्या. त्या वेळी भेट मिळालेली तलवार त्यांच्या प्रभानवल्ली येथील घरात आहे, असे त्यांचे दत्तक पुत्र विश्‍वनाथ पत्की यांनी सांगितले. आता बऱ्याच जमिनी कुळकायद्याने गेल्या. पण गडावर आजही सुमारे 100 आंब्याची कलमे आणि सागाची हजारो झाडे आहेत. काळ बदलला. विश्‍वनाथ पत्कीही नोकरीनिमित्त मुंबईला गेले. त्यांचा मुलगा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. विश्‍वनाथ पत्कींचे शालेय शिक्षण जैतापूर हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यांचे बालपण या किल्ल्यात गेले. त्यामुळे ते इथे वास्तूच्या ओढीने येतात. काही काळ राहतात आणि भूतकाळात हरवतात. आडिवरेला पूर्वीच्या काळी संपन्न बाजारपेठ होती. त्याचे पुरावेही जागोजागी विखुरलेले आढळतात. पूर्वी शेती हाच या भागाचा मुख्य व्यवसाय होता. सरकारने फलोत्पादनाला शंभर टक्के अनुदानाची योजना राबविली आणि कातळावर आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. त्या आंब्यालाही वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरी, देवगड हापूस मागोमाग आडिवरे हापूस प्रसिद्ध झाला तर आश्‍चर्य वाटायला नको.

Monday, April 18, 2011

पीर भद्रेश्वर

पीर भद्रेश्वर नाव ऐकून काहीच बोध होत नाही. हिंदूंचे मंदिर की आणखी काही असा प्रश्‍न डोळ्यांसमोर येतो. सर्वसामान्य भाविकांना सरसकट तेथे जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे गूढतेचे वलय या वास्तूभोवती आहे. मलाही या वास्तूचे आणि त्या परिसराचे कुतूहल वाटत आले आहे. काही प्रमाणात का होईना गेल्या महिन्यात ते कुतूहल शमले. याचे कारण म्हणजे पीर भद्रेश्वरला भेट देता आली, तीही कॅमेऱ्यासकट. एरवी पीर भद्रेश्वरपासून वीस किलोमीटर अलीकडेच लष्कराच्या नाक्‍यावर कॅमेरा जमा करावा लागतो व येताना तो परत घ्यावा लागतो. फक्त मनातच आठवणी साठवाव्या लागतात. तेथे मला लष्कराच्या बसने जाता आले. डोंगराच्या माथ्यावर पोचल्यावर छोटेखानी असे मंदिर दृष्टीस पडले. एका वेळी गाभाऱ्यात सहा माणसे कशीबशी दाटीवाटीने राहू शकतील असे ते सुबक मंदिर मनाला भावल्यावाचून राहिले नाही. त्यावर कोरलेला शिलालेख वाचताना आपल्या जवानांनी प्राणाची बाजू लावून हा परिसर पाकिस्तानकडून कसा जिंकून घेतला आणि मंदिराची पुनर्उभारणी कशी केली याची माहिती मिळाली. भारतीय लष्कराच्या दृष्टीने हे तसे महत्त्वाचे ठाणे. कारण शंभर मीटरवर दरीत पाकव्याप्त काश्‍मीर सुरू. त्यामुळे इन्सास व एके 47 रायफली घेतलेल्या जवांनाचा खडा पहारा तेथे आहे.सहज म्हणून मी दुर्बीण घेऊन दरीत पाहिले असता समोरा समोर दोन चौक्‍या दिसल्या. त्या मला पाकिस्तानी चौक्‍या वाटल्या. मी कुतूहलाने विचारणा केल्यावर एक आपली व एक त्यांची चौकी. दोन्हींत केवळ नव्वद मीटरचे अंतर अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानने आता जाणीवपूर्वक सीमावर्ती भागात लोकवस्ती वाढविण्यावर भर दिल्याचे दिसून आले. नवी घरे त्यांच्या बाजूने उभी राहत आहेत. या वस्तीमागून भारताच्या बाजूने मारा करायचा आणि भारताने प्रत्युत्तर दिले की नागरी वस्तीवर हल्ला केल्याचा कांगावा करायचा असा सरळ हेतू यामागे आहे.या भद्रेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत तुरळक वस्ती दिसते. शेळ्या चरायला घेऊन जाणारे गावकरी दृष्टीस पडतात. लष्करी वाहने पाहण्याची सवय असलेले हे लोक एखादे निराळे वाहन दिसले की पाहतच राहतात. कधी तरी हात उंचावून प्रतिसादही देतात. वाटेत प्रत्येक दहा मीटरवर खडा पहारा आहे.चौक्‍यांची तर गणतीच नाही. घुसखोर दहशतवादी सीमावर्ती भागातून मुख्य भागात पोचू नये यासाठी जंगलातील प्रत्येक इंचावर नजर असण्याची खास व्यवस्थाही आहे.दक्ष राजावर शिवपुत्र भद्रेश्वराने विजय मिळविल्याच्या स्मरणार्थ कनिष्क राजाने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख इतिहासात आहे. शिवाने जटा दगडावर आपटून या भद्रेश्वराची निर्मिती केली अशी श्रद्धा आहे. दक्षावर विजय मिळविल्यानंतर हिमालयात परत जाताना भद्रेश्वराने या मंदिराच्या ठिकाणीच विश्रांती घेतली होती असेही शिलालेखावर म्हटले आहे.1947-48 मध्ये पाकिस्तानने मारा करून मंदिर उद्‌ध्वस्त केले होते. या भागावरही पाकिस्तानने कब्जा केला होता. त्या वेळीच वीर भद्रेश्वराचे पीर भद्रेश्वर असे नामकरणही झाले. 20 ऑक्‍टोबर 1948 ला भारताने हा प्रदेश पाकिस्तानकडून जिंकून घेतला. कर्नल प्रेम प्रताप क्षत्रिय व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मंदिराची उभारणी केली. अलीकडेच मंदिरात शिवलिंगाची पुनर्स्थापनाही करण्यात आली आहे. सुमारे चार हजार फुटावरील हा परिसर मनात घर केल्याशिवाय राहत नाही.या भद्रेश्वराच्या मंदिराच्या परिसरात घंटांच्या माळा आहेत. या मंदिरात घंटा बांधून केलेला नवस पुरा होतो अशी श्रद्धा आहे. त्यासाठी मंदिरातच घंटा विकत मिळण्याची व्यवस्था आहे. फक्त मंदिरापर्यंत पोचण्यासाठी लष्कराची खास परवानगी तेवढी हवी.

Sunday, April 17, 2011

देखणे गाव आयी

गोव्यातील साखळीहून दोडामार्गला जाताना आयी हे गाव आहे. बांद्यापासून काही किलोमीटरवर असलेले हे गाव आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे. पोर्तुगीज काळातील गजबजलेली व्यापारी बाजारपेठ अशी ओळखही आयी गावाला आहे. तेथे आजही पोर्तुगीजकालीन इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या कित्येक वास्तूही आहेत.पर्ये येथून परतताना एक दिवस सहज उजवीकडे वळलेला हा रस्ता कुठे जातो असा प्रश्‍न पडला नि मी आयी येथे पोचलो.पोतुर्गिजांची गोव्यावर सत्ता असताना ब्रिटिशांच्या ताब्यातील व नंतर मुक्त भारताच्या हद्दीतून अनेक गोष्टी गोव्यात आणल्या जात. या गोष्टी चोरट्या मार्गाने आणण्यासाठी आयीचा वापर होत असे. चणे, वाटाणे, गूळ, चवळी, छत्र्या, कपडे, अगरबत्ती आणल्या जात असे मला तेथे कळले. दोडामार्गच्या बाजारपेठेतून बैलगाडीतून माल आयी येथे आणला जायचा. दोडामार्गातून एका वेळी 25 ते 50 बैलगाड्या सुटायच्या. दोडामार्ग, तळेखोल, कीटवाडी असा प्रवास करीत रात्री सुटलेल्या गाड्या पहाटेपर्यंत गावात पोचायच्या. तेथे सगळा माल उतरून ठेवला जायचा. उतरलेला माल रात्री सीमापार करून गोव्यात नेला जायचा. रात्रभरात 50 ते 60 कामगार मालाच्या गोणी सीमापार नेऊन द्यायचे. तेथे पुन्हा दुसरे कामगार हजर असायचे. इकडचा माल तिकडे जाऊ नये, यासाठी पोर्तुगिजांनी माटणे गावापासून रावण गावापर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर अंतर भरेल एवढे लोखंडी कुंपणही उभारले होते. त्याचे अवशेषही मला पाहता आले. तारेच्या पलीकडे पोर्तुगिजांचा, तर अलीकडे कस्टमच्या पहारेकऱ्यांचा पहारा असायचा. अशा या वेगळ्या बाजारपेठेच्या खुणा आजही आपले अस्तित्व जोपासत असून काही इमारती पडक्‍या, तर काही दिमाखात उभ्या आहेत. गोव्यातून ब्लेड, लवंग, सुपारी, सुके मासे याच पद्धतीने आणले जायचे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा बाजार बंद झाला, तरी त्याच्या खुणा इतिहास अभ्यासकांसाठी मागे राहिल्या आहेत. दोडामागर्मध्ये एकदा भटकंती करत असताना पारगडविषयी कळले. तेथील गावस नावाचे गृहस्थ मला तेथे नेण्यासही तयार झाले. पारगडाची भौगोलिक रचना अशी की, गोव्यातील पोर्तुगीज, सावंतवाडीचे खेम-सावंत यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग करण्यात आला. चंद्र-सूर्य असेपर्यंत या गडाची राखण करायची, अशी सनद (ताम्रपट) शिवाजी महाराजांनी दिली आणि अखेरपर्यंत हा गड अजिंक्‍य राहिला. 1857 च्या गडकऱ्यांच्या बंडातही हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ शकला नाही. उंच ताशीव कडे, पायथ्याला घनदाट जंगल आणि आकाशाशी स्पर्धा करणारी उंची यामुळे हा गड आपले अभेद्यपण टिकवून आहे.चंदगड-दोडामार्ग-गोवा रस्त्यावर पारगडकडे जाणारा फाटा मिळतो. तेथून पारगडला जाता येते. दोडामार्ग तालुक्‍यातील मोर्ले गावातून मिरवेलमार्गेही पारगडला जाता येते. त्यासाठी काही तास चालत जावे लागते. आम्ही दोन्ही बाजूने गडावर चढाई केली. दाट धुक्‍यात हरवलेली गर्द झाडी, घोंगावणारा गार वारा, आभाळ आणि अरण्य यांची एकमेकांना स्पर्श करण्यासाठी चाललेली स्पर्धा आणि निसर्गाचे अनेक विलोभनीय विभ्रम पारगडावरून पाहायला मिळाले. गडावर शिवरायांच्या वंशजांचे आजही अस्तित्व आहे. त्यांची घरे तीन-साडेतीनशे वर्षे तेथे उभी आहेत. मालुसरे, शेलार, झेंडे, शिंदे, कदम, नाईक, डांगे, जगताप, सूर्यवंशी, चव्हाण, माळवे, कुंडले, थोरात, जाधव, कारखानीस, फडणीस, सबनीस, मणेरकर ही गडावरची मूळ घराणी. गडावर पद्मावती तलाव, अन्य तीन बांधीव दगडाचे तलाव, याशिवाय अठरा विहिरी आहेत. गडाच्या पश्‍चिमेला तीन बुरूज आहेत. फडणीस बुरूज, भालेकर बुरूज आणि शेलार बुरूज अशी त्यांची ओळख आहे. शिवाय भांडे, झेंडे माळवे हे अन्य तीन बुरूज आणि पूर्व-पश्‍चिम-उत्तरेला भक्कम तटबंदी आहे.

Saturday, April 16, 2011

एक पणती त्यांच्यासाठी...

समाजाचा एक दखलपात्र घटक निराधार आहे ही जाणीवच मन बधीर करणारी आहे. बाजारपेठेत पैसे मोडताना अशांचा चेहरा डोळ्यासमोर निश्‍चितपणे आणायला हवा. या वर्षाच्या बजेटमधील काही वाटा त्यांच्यासाठी, याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. दान फक्त धनिकांनीच करावे हे मनातून काढून टाका. ....
काय काय घेतले या गुढी पाडव्याला?..नवे कपडे, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज की नवी गाडी? वर्षातून एकदा येणारा हा उत्सव झगमगाटात साजरा करायचाच असतो. सर्वदूर लखलखाट, मिणमिणत्या पणतीच्या प्रकाशात आपल्या आप्तस्वकीयांच्या आरोग्याची शुभकामना करायची. त्यांना लक्ष्मीप्रसाद मिळावा, म्हणून शुभेच्छा द्यायच्या... हे सारे आपण आपल्यासाठी करणार, नाही का? पण... पण आपल्यातीलच काही दुर्दैवी जीव, ज्यांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळणे कठीण असते, त्यांनाही आपल्यासारख्याच भावना आहेत. त्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नसले तरी समाजबांधव म्हणून त्यांच्या भावना जपणे हे आपलेच कर्तव्य नाही का? मग त्यांची दिवाळी आपल्यासारखीच व्हावी म्हणून प्रयत्नही आपणच करायला हवेत ना? आपल्या भरलेल्या फराळाच्या ताटातील अर्धी करंजी, लाडू, चकली, अनारसे आपण त्यांच्यासाठी दिले तर आपण नक्कीच उपाशी राहणार नाही. उलट भुकेल्या जीवाला दोन घास भरविल्याचा निखळ आनंद प्रत्यक्ष अनुभवता येईल. पाडव्यानिमित्त बाजारपेठेत झगमगाट होता. खरेदीसाठी ठिकठिकाणी झुंबड होती. एकीकडे प्रकाशपर्वाचा उत्साह ओसंडून वाहत असताना समाजातील काही उपेक्षित घटकांच्या मनामध्ये मात्र अंधार कोपरा कायम आहे. अशा कोपऱ्यातील अंधार दूर करून विश्‍वासाची दिवाळी निर्माण करण्याचे नियोजन आपण नाही तर कोणी करायचे? अनाथ मुले, भिकाऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुले अशा उपेक्षित घटकांसाठी नियमित काम करणाऱ्या अनेक संस्था शहरात आहेत. त्यांच्यातर्फे दिवाळीच्या दिवसांत राज्यात विविध उपक्रम राबविले जातीलही. त्यात साऱ्यांनीच खारीचा वाटा उचलणे ही खरी दिवाळी ठरणार आहे.गोव्यात गरीबी नाही, सगळीकडे आनंद मौजमजा आहे असे गोंडस पण फसवे चित्र रंगविले जाते. अन्य राज्यात गोवा म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्ग असाच समज आहे. हे खोटे आहे हे आपणास ठाऊक असल्याने समाजातील उपेक्षित घटकांना सणांच्या निमित्ताने आनंद देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. येथील काही टक्के लोकांचेच राहणीमान सुखवस्तू आहे. सरकारच्या दयानंद निराधार योजनेतील लाभार्थ्यांची यादी व आकडेवारी पाहिली तरी समाजाचे नेमके चित्र काय याचा प्रत्यय येऊ शकतो. ही मदत मिळविण्यासाठी कित्येकजण प्रतीक्षा यादीवर आहेत ही सांगूनही खरी न वाटणारी गोष्ट. तरीही समाजाचा एक दखलपात्र घटक निराधार आहे ही जाणीवच मन बधीर करणारी आहे. बाजारपेठेत पैसे मोडताना अशांचा चेहरा डोळ्यासमोर निश्‍चितपणे आणायला हवा. या दिवाळीच्या बजेटमधील काही वाटा त्यांच्यासाठी, याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. दान फक्त धनिकांनीच करावे हे मनातून यानिमित्ताने काढून टाका. प्रगतीकडे झेपावणाऱ्या या राज्यातील दुःख आणि दारिद्य्र मिटविण्यासाठी खारीचा का होईना वाटा उचलला पाहिजे.याच संदर्भात आणखी एक धक्‍कादायक बाब म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साडेचार टक्के लोक दारिद्य्र रेषेखालील जीवन जगतात. त्यांच्यासाठी सरकाराच्या अनेक सुविधा सोयी आणि सवलतीही आहेत. त्याने त्यांची आसवे पुसली जातील काहा खरा प्रश्‍न आहे.

Friday, April 15, 2011

बारबाला आल्या गोव्यात

मुंबईतील डान्स बारवरील बंदीच्या घोषणेचे एकीकडे लोकांमधून स्वागत होत असले, तरी त्या बारबालांनी आता गोव्याची वाट चालणे सुरू केले आहे. अगदी चाळिशी उलटलेले "तरुण'ही येथे मनसोक्त ऐष करताना पाहायला मिळाले. ओळखणारे फार कोणी नसल्याने हवा तसा धिंगाणा घालता येतो, हे खरे यातील "युनिक सेलिंग प्रेपोझिशन' आहे. चाळिशी उलटलेल्यांची पावलेही किनाऱ्यालगत अशी सेवा पुरविणाऱ्या ठिकाणांचे उंबरठे झिजवताना दिसताहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत डान्स बारचे हे पीक मुंबईबाहेरही फोफावायला सुरवात झाली. गोव्याचे किनारे तर जगप्रसिद्ध. मुक्त वातावरणामुळे या जागा तर या दृष्टीने मोक्‍याच्या आहेत. शहराजवळ असूनही, शहराबाहेर असल्याने ओळखणारे फार कोणी नसते आणि त्यामुळे निःसंकोच "ऐष' करता येते, हे खरे यातील "युनिक सेलिंग प्रेपोझिशन' आहे, असे येथे जाणारेच सांगतात. येथे येणारे लोक कोण आहेत, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या विधानाची सत्यता पटते. साध्या शीतपेयांचीच किंमत 120 रुपये असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तुमचा खिसा "गरम'च असावा लागतो. बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारी आतमध्ये कोणत्या दर्जाचे लोक असतील, याची कल्पना देतात.बक्कळ पगारावर नोकरी करणारे तरुण, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी अशी मोठी "रेंज' येथे पाहायला मिळाली. आश्‍चर्याची बाब म्हणजे युवकांपेक्षाही मध्यमवयीन (साधारण चाळिशीचे) लोकांचा येथे मोठ्या प्रमाणावर राबता आहे. खऱ्या अर्थाने "चार पावसाळे' पाहिलेल्यांचा हा नवा षौक असल्याचे येथे प्रत्यक्ष गेल्यावर लक्षात येते. "आयटेम गर्ल'चे चित्रपटातील नृत्य पडद्यावर पाहणे वेगळे आणि "याचि देही, याचि डोळा' प्रत्यक्ष तो अनुभव घेणे वेगळे,' असे समर्थन करीत तेथे जाणारे लोकही काही कमी नाहीत! पबमध्ये बारबालांचे नृत्य नसते. सर्वसाधारणपणे येथे केवळ "कपल'नाच प्रवेश असतो. तेथे येणाऱ्या ग्राहकांसाठीच "डान्स फ्लोअर' केलेला असतो. ज्या कोणाला नृत्य करायचे, तो तेथे नृत्य करू शकतो. पण ग्राहकासोबत बारबाला आल्या तर त्यांना अडविण्यासाठी कुठलीही कायदेशीर तरतूद नसल्याने त्याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे दिसून येते. नृत्याची नशा केवळ पैशाची उधळपट्टी करून थांबत नाही. त्यापुढील अनेक गोष्टी घडतात. काळ्या पैशाचे मोठे व्यवहारही येथे चालतात, असे जाणकार सांगतात. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच एका "कर्तव्यदक्ष' पहारेकऱ्याने सलाम ठोकून स्वागत केले. प्रत्यक्ष अशा ठिकाणी आत जाईपर्यंत तेथील "माहोल'ची काहीसुद्धा कल्पना येत नाही. आत गेल्यावर मात्र कर्कश संगीतानेच स्वागत होते. येथेही "रिमिक्‍स'चा प्रभाव जाणवतो! आतिथ्यशील वेटर तुम्हाला जागा सुचवतात. नेहमी येणारे "शौकीन' गिऱ्हाईक असेल, तर "डान्स फ्लोअर'च्या अगदी शेजारचे टेबल राखीव असते. प्रत्यक्ष "डान्स फ्लोअर'वर दिव्यांचा झगमगाट होता. संगीताच्या ठेक्‍यानुसार, प्रकाशयोजना बदलत असल्याचे दृश्‍य सध्या किनारी भागात पाहाता येते. अनेक मुली स्वखुशीने यामध्ये आल्याचीही माहिती मिळाली, तर काहीजणी गरजेपोटी करारावर (करार अर्थात तोंडीच असतो) येतात. ती मुलगी बारमालकाला अमुक एक रक्कम मिळवून देईपर्यंत संबंधित बारमध्ये काम करील, अशा प्रकारचा करार केला जातो. मात्र, थोड्या कष्टात मिळणारे बरेच पैसे हेच त्यांचे या व्यवसायाकडे वळण्याचे मुख्य आकर्षण आहे. येथील पैशाच्या उधळपट्टीची तर मोजदादच होऊ शकत नाही. ही धुंदी रात्र चढेल तशी उत्तरोत्तर रंगतच जाते आणि गिऱ्हाईकांचे खिसे रिकामे होतच राहतात.

Thursday, April 14, 2011

शिरोडा एकदा तरी भेट देण्याजोगे

वेंगुर्लेहून मोचेमाड ओलांडली की लागते आरवली. जयवंत दळवी यांचे गाव. तेथील परिसरावर आधारित अनेक कादंबऱ्या, कथा दळवींनी लिहिल्या, त्यांच्या नाटकाची बिजेही याच परिसरात अंकुरली असे सांगितले जाते. माझे मित्र अरुण नाईक यांच्यासोबत मी एकदा आरवलीला गेलो. तेथील भिके डोंगरी अरुणच्या श्रद्धेचा विषय. वि. स. खांडेकर शिरोड्यात असताना त्या डोंगरीवर जात म्हणून आम्हीही गेलो. शिरोड्यात रामपुरूष मंदिरासमोर विठ्ठल परब यांचे घर. रेडी येथे बंदर पूर्ण क्षमतेने सुरू असताना तेथील कॅन्टीन हे गृहस्थ चालवत. त्यांनी मला शिरोडा म्हणजे काय ते पायी फिरून दाखवले.नाबरवाडीत खांडेकर राहत ती वास्तू मला त्यांच्यामुळेच पाहता आली. रेडीला जाण्यापूर्वी मिठाचे आगर आहेत. त्या आगराच्या काठावर एक मोठा वृक्ष आहे. 1930 मध्ये दांडी येथे महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला त्याचवेळी शिरोड्यातही मिठाचा सत्याग्रह झाला होता. त्या वेळी लावलेल्या वृक्षाचे आज अजस्त्र वृक्षात रूपांतर झाले आहे. आज आगरात मीठ काढण्याऐवजी मत्स्यपालन करणे परवडत असल्याने मिठागरे काळाच्या उदरात गडप होण्याचाही धोका शिरोड्यासमोर आहे.शिरोडयात मी रमलो कारण तेथील खटखटे ग्रंथालय. सुटीच्या दिवसात 10-15 दिवस शिरोड्यात राहून या ग्रंथालयात असलेली विविध विषयांवरची पुस्तके वाचणे महाविद्यालयीन जीवनात आनंदाचे वाटे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयाखालोखाल या ग्रंथालयात ग्रंथसंपदा आहे असे मला वाटते. या ग्रंथालयाकडून मुख्य बाजाराकडे येताना समोरच माउलीचे मंदिर आहे.या मंदिरावरून न्यायालयीन लढा सुरू होता त्या वेळी जत्रोत्सव बंद होता तो काळही मी तेथे अनुभवला आहे. शिरोडा परिसरातील जत्रोत्सवाला दारूकामाची आतषबाजी एक खास आकर्षण असते. हे दारूकाम आरवली येथील मधुकर कुडव बंधू आणि आजगाव येथील राधाकृष्ण नार्वेकर यांनी बनविलेले असते. जत्रोत्सव म्हटला की भाविकांची अलोट गर्दी, पाहुण्यांची रेलचेल आणि दशावतारी नाटक (दहिकाला) अशी अनेकविध वैशिष्ट्ये असतात; परंतु शिरोडा परिसरातील जत्रोत्सवांचे वेगळे खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या भागात बनविलेल्या शोभेच्या दारूकामाची आतषबाजी. डोळ्याचे पारणे फेडणारी ही आतषबाजी असते. शिंगात भरलेल्या शोभेच्या दारूच्या जोरावर गोल फिरणारी "घिरट' न विझता फिरतच राहावी, असे वाटणारी आतषबाजी. आकाशात उंच उडल्यावर त्या ठिकाणी पुन्हा फुटणाऱ्या दारूकामातील वेगवेगळ्या प्रकारच्या चांदण्या या शिवकाशीमधील रेडिमेड नरसाळ्यारूपी दारूकामामुळे स्थानिक शोभेच्या दारूकाम वापराचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले आहे; मात्र शिरोडा येथील देवी माउली पंचायतन देवस्थान, आजगाव येथील देव रवळनाथ, रेडी येथील देवी माउली, आरवली येथील देव वेतोबा, देवी सातेरी, कंदवाडा देवी माउली आदी देवस्थानच्या जत्रोत्सवाला स्थानिक शोभेच्या दारूकामाची आतषबाजी पाहण्यास भाविकांची, रसिकांची बरीच गर्दी असते. ती अनुभवण्यासाठी डिसेंबरध्ये शिरोड्यात जायलाच हवे.

Wednesday, April 13, 2011

कोकणातील खेडे

कोकणात जाणे मला नेहमीच आवडत आले आहे. दाभोळचे अण्णा शिरगावकर, चिपळूणचे प्रकाश देशपांडे, सागरचे संपादक निशिकांत जोशी, सावंतवाडीचे अरविंद शिरसाट, वेंगुर्ल्यातील संजय मालवणकर, वैभववाडीचे प्रकाश काळे, गुहागरचे संकेत गोयथळे, रत्नागिरीचे गिरीश बोंद्रे, मंडणगडचे विकास शेटये यांच्यामुळे कोकण बरेच समजून घेता आले.त्यांच्याकडून मी संकलीत केलेल्या माहितीनुसार कोकणातील प्राचीन खेडी स्वयंपूर्ण होती. मात्र बदलत्या काळानुसार खेड्यातील चांगल्या चालीरीती, परंपरा नष्ट झाल्या आणि खेडी भकास झाली आहेत. चौसोपी कौलारू घर, ओटी, पडवी, माजघर, न्हाणीघर, अंधारात असणारे स्वयंपाकघर, घरापाठीमागे गुरांचा गोठा, नारळी-पोफळीच्या बागा, शेतमळा, पाटाचे पाणी, कौलारू घरातून बाहेर पडणारा धूर, गावातून वाहणारी नदी, प्राचीन इतिहासाची साक्ष देणारी मंदिरे खेड्यात आजही पाहता येतात. स्वयंपूर्ण खेड्यातील लोकजीवन, संस्कृती, बारा बलुतेदारांचे व्यवसाय, एकोपा, चालीरीती, पद्धती तेथे राहून अभ्यासण्यासारख्या आहेत. कोकणातील गावे डोंगराळ भागात वसलेली असतात. दोन गावे किंवा एकाच गावातील दोन वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जायचे झाले, तरी एखादा छोटासा डोंगर पार करावा लागतो. तो कष्टप्रद अनुभव दत्तप्रसन्न कुलकर्णीसोबत मी अनेकदा घेतला आहे. दरीतून जाणाऱ्या पक्‍क्‍या पाऊलवाटांनी जाण्याचा अनुभव घेण्यासाठी चिपळूणजवळील पोफळी परिसरात जायला हवे. लाल चिऱ्याच्या दगडापासून बांधलेल्या या वाटांना बांधघाटी किंवा पाखाडी म्हणतात. रत्नागिरी शहर आणि परिसरात अशा अनेक पाखाड्या आजही सुस्थितीत आहेत. गूळपाणी देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करून घेण्याची मजा फक्त कोकणातच अनुभवता येते.कोकणात फिरताना कुठे तरी डोंगरात भेटते परशुरामाची मूर्ती. कोकणाला परशुरामभूमी म्हणून संबोधले जाते. परशुरामाकडून झालेले निःक्षत्रीयीकरण, समुद्र हटवून कोकणाची निर्मिती आदी कथा चिपळूणच्या निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांच्याकडूनच ऐकायला हव्यात. परशुराम शास्त्रज्ञ कसा होता हे नानांच्या तोंडून ऐकताना समाधीच लागली पाहिजे. कोकणात फिरताना ग्रामदैवत वाघजाईचे मंदिर सापडायचे. हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव असताना कोकणातल्या देवीचे नाव वाघजाईच का, असा प्रश्‍न मला एकदा पडला. वाघ असलेले जंगल पर्यावरणदृष्ट्या समृद्ध समजले जाते. त्याची उपास्य देवता म्हणून वाघजाईची पूजा केली जाते. संपूर्ण गाव याच एका ठिकाणी एकत्र होत असे. येथील निवाडे अंतिम असत, अशी माहिती अनेकांशी या विषयावर चर्चा केल्यावर मिळाली.पूर्वी गावाच्या प्रारंभीच नाभिकाचे दुकान असे. गावाचा प्रमुख असलेला खोत, विविध शस्त्रांसह शेतीची अवजारे तयार करून देणारा लोहार, अल्प वस्त्रात असला तरी गावाचे पोषण करणारा- शेती करणारा कुणबी, कासार, कुंभार, सुतार, चर्मकार, धनगर, कोळी असे बलुतेदार भेटण्यासाठी कोकण दौऱ्याला पर्याय नाही.

Tuesday, April 12, 2011

वेंगुर्ले मी पाहिलेले

गेल्या आठवडयात नातेवाईकांकडे जाण्याच्या निमित्ताने कोकणातील वेंगुर्लेत गेलो होतो. वेंगुर्ले सागर किनाऱ्यावर वसलेले एक देखणे गाव. वेंगुर्ल्यात संजय मालवणकर यांच्याबरोबर अनेकदा मी फिरलो. एक दोनदा शिरोड्याच्या अनिल निखार्गे यांच्याकडूनही वेंगुर्लेबाबत माहिती घेतली.वेंगुर्लेच्या मार्केटबाबत मला त्या वेळी नेहमीच कुतूहल वाटत असे. हे मार्केट कुठे तरी पाहिल्याचे राहून राहून वाटत असे. गुरुनाथ कदम यांच्याबरोबर एकदा भल्या पहाटे वेंगुर्ल्याला जाताना वाटेत सहज गप्पा मारताना त्यांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट बांधण्यापूर्वी क्रॉफर्ड वेंगुर्ल्यात होते त्यांनीच वेंगुर्ल्यातील मार्केट बांधल्याची माहिती दिली. म्हणजेच मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे वेंगुर्ल्यातील मार्केटची मोठी प्रतिकृती होय. त्या मार्केटची नंतर तपशीलवार पाहणी मी केली. छायाचित्रेही टिपली. 60-70 च्या दशकात वाहतुकीचा प्रमुख मार्ग समुद्र होता. त्यामुळे जहाजे, गलबते ही मालवाहतुकीची साधने होती. त्यामुळे अगदी कोल्हापूर-बेळगावपर्यंतचाही माल वेंगुर्ले बंदरातून जात होता. त्यामुळे दुकानांच्या संख्येएवढीच किंबहुना जास्त संख्येने येथे मालाचा "क्‍लिअरन्स' करणाऱ्या पेढ्या होत्या. आज शहरातील स्टेट बॅंक, सिंडिकेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया अशा बॅंका पूर्वीच्या व्यापारी पेढ्यांच्या इमारतीत स्थानापन्न झाल्या आहेत. यावरूनच या पेढ्यांच्या व्यवसायाचा आवाका लक्षात येईल.विदेशींनी व्यापारासाठी बांधलेली वखारही वेंगुर्लेत भग्नावस्थेत आहे. तत्कालीन लष्करी तळ असलेला परिसरही आज कॅम्प या नावानेच ओळखला जातो. वेंगुर्लेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे. तेथे विकसित करण्यात आलेले वेंगुर्ले जातीची काजूची कलमे आता सर्वमान्य झाली आहेत. तेथेही अनेकदा मी गेलो.  समुद्राच्या कुशीत विसावलेल्या वेंगुर्ले येथे सेंट लुक्‍स हॉस्पिटल गेली शंभरेक वर्षे आरोग्यदानाच्या सेवेचे कार्य करीत आहे. सेंट लुक्‍स हॉस्पिटल मिशनरी लोकांनी सुरू केले. आजपर्यंत लाखो रुग्णांना जीवदान देणारे हे हॉस्पिटल आहे. सिंधुदुर्गातील सर्वांत जुन्या हॉस्पिटलमध्ये याचा समावेश होतो. बॅ. खर्डेकर विद्यालय, वेंगुर्ले हायस्कूल, सेंट लुक्‍स हॉस्पिटल आदी संस्था वेंगुर्ले तालुक्‍याबाहेरील लोकांनी येथे सुरू केल्या. त्या व्यक्ती आज जिवंत नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र आजही जिवंत आहेत. 1915 मध्ये स्थापन झालेल्या या हॉस्पिटलमध्ये त्या काळी गोव्यातूनही रुग्ण येत अशी माहिती मला तेथे मिळाली. आज मात्र उलटी स्थिती आहे. आज लोक मासे आणण्यासाठी वेंगुर्लेत जातात आणि तेथील रुग्ण बांबोळीला येतात.

Sunday, April 10, 2011

मुंबापुरीच्या सागरी पर्यावरणालाही घरघर

सागराच्या पोटात साठणाऱ्या शेवाळामुळे जन्माला येणाऱ्या बॅक्‍टेरियांमुळे समुद्राच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने हे अत्यंत धोकेदायक असून, कोट्यवधींची लोकसंख्या सहन करीत कशीबशी उभी असणारी महानगरी मुंबई आता या धोक्‍याच्या कड्यावर पोहोचली आहे... पणजीजवळच्या दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांनी मुंबईतील बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे गेल्या 40 वर्षांत सागरी पर्यावरणावर पडलेल्या ताणाचे विश्‍लेषण करून काढलेल्या अहवालात वरील निष्कर्ष नोंदविणयात आला आहे."एनआयओ'चे एस. एस. सावंत, लीना प्रभुदेसाई, के. व्यंकट हे शास्त्रज्ञ जहाजातून सोडण्यात येणाऱ्या बलास्ट वॉटरचा अभ्यास करताना (जहाज समतोल राहावे म्हणून जहाजाच्या वेगवेगळ्या कप्प्यांत गरजेनुसार पाणी भरण्यात येते. गरजेनुसार पाणी जहाजाबाहेर फेकलेही जाते. या पाण्यातून त्या त्या ठिकाणचे जीवजंतू नव्या ठिकाणी येतात. या पाण्याला बलास्ट वॉटर म्हणतात) मुंबई बंदर आणि परिसरातील पाण्यात बॅक्‍टेरियांचा वाढलेला वावर या संशोधकांना अस्वस्थ करून गेला. समुद्रातील पाण्याच्या अभ्यासासाठी निर्माण केलेल्या वीस केंद्रांवर नियमितपणे या पाण्याचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करणे सुरू होते. मुख्य कामाबरोबर समांतर असे हे काम सुरू होते. वर्ष दोन वर्षाने लक्षात आले, की या मुंबईलगतच्या पाण्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण फार आहे. असे असले तर सागराच्या पोटातील पूर्ण विकसित अशी जीवसृष्टी तेथे असायला हवी होती. पण तसे काही चित्र दिसत नव्हते. परिसरातील कंपन्या, हॉटेलांचे सांडपाणी आणि शहरातील गटारे यांतून अन्नद्रव्ये समुद्राच्या पाण्यात मिसळत असतात. मुंबईलगतच्या समुद्रात शास्त्रज्ञांना हेच नेमके आढळले. तेथे बॅक्‍टेरियांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. बॅक्‍टेरियांना पाण्यात मिसळलेला प्राणवायू मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने तेथे अन्य जीवजंतू जगू शकत नाहीत. त्यामुळे अन्नद्रव्याने श्रीमंत अशा मुंबईलगतच्या समुद्रातल्या जीवसृष्टीला ओहोटी लागल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी तसा शोधनिबंधही सादर केला आहे.ंबईची लोकसंख्या 1060 मध्ये चार दशलक्ष होती, तर 2001 मध्ये ती 18.3 दशलक्षवर पोचली व 2011 मध्ये ती 22.4 दशलक्षवर पोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यातील संबंधित अन्नद्रव्यांच्या घटकांच्या उपस्थितीची 1960 पासूनची उपलब्ध माहिती या शास्त्रज्ञांनी अभ्यासणे सुरू केले. त्यातून हा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला. त्यांनी 2001-02 मध्ये प्रत्यक्षपणे अनेक नमुनेही गोळा केले त्यांचे विश्‍लेषणही त्यांच्या निष्कर्षाचीच पुष्टी करते. "नायट्रेट'चे वाढते प्रमाण सागरी पर्यावरणाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार असा प्रश्‍न शास्त्रज्ञांना आता पडला आहे.

एडनच्या आखातातील पाण्याचे अंतरंग उलगडले

एडनच्या आखातातील वरून एकच दिसणाऱ्या; पण प्रत्यक्षात तसे नसलेल्या पाण्याचे अंतरंग उलगडण्यात एका संशोधकाला यश आले आहे. विशेष म्हणजे, हा संशोधक गोवा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. येमेनच्या साना विद्यापीठातील महम्मद अली अल साफानी यांनी गोवा विद्यापीठात "पीएचडी'साठी संशोधन सुरू केले आहे. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत (एनआयओ) डॉ. सतीश शेणॉय यांच्यासोबत संशोधन करताना साफानींनी हा शोध लावला आहे. त्यांनी या पाण्याबाबत 1920 पासून आजवर उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचे विश्‍लेषण केले. त्यातून, क्षारतेनुसार एडनच्या आखातात चार प्रकारचे पाणी अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले आहे. या आखातात तांबड्या समुद्रातून येणाऱ्या पाण्याचे प्राबल्य असून, ते एकूण पाण्याच्या 37 टक्के असल्याचे साफानी यांनी आपल्या संशोधनपर निबंधात म्हटले आहे. आखाताच्या पृष्ठभागावरील पाणी हे तीन टक्‍क्‍यांहून कमी आहे आणि पश्‍चिमेकडील अरबी समुद्र व स्थानिक पातळीवर जमा झालेले पाणी, यातून ते बनलेले आहे. उन्हाळ्यात तांबड्या समुद्रातून आलेले पाणीही यात मिसळते. या पाण्याचे प्रमाण नऊ टक्के आहे, तर त्याची क्षारता सर्वांत कमी म्हणजे प्रत्येक घनमीटरला 26.50 किलो असल्याचेही आढळले आहे. आखाताच्या तळाचे पाणी तांबडा समुद्र आणि दक्षिणेकडून येणाऱ्या पाण्याने बनले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आखातातील पाणी एकच दिसत असले, तरी शास्त्रीय तपासणी केल्यावर त्याचे चार प्रकार स्पष्ट झाले आहेत.साफानी 2003 मध्ये "एनआयओ'मध्ये रुजू झाले. त्यापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातून सागरी विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. याविषयी डॉ. शेणॉय यांनी सांगितले, की यासाठी किमान वीस ठिकाणच्या पाण्याचे नमुने गोळा करावे लागले आणि ते सर्व वेगवेगळ्या ऋतूतील होते. एडनच्या आखातातील पाणी एकसारखे नाही, असा शास्त्रज्ञांचा या पूर्वीही समज होता; पण नेमकी पाण्याची विभागणी कशी आहे, यापर्यंत कोणाला पोचता आले नव्हते. क्षारता हा मुद्दा महत्त्वाचा मानून आम्ही पाण्याच्या पृथःकरणासाठी काही प्रमेये स्थापित केली. त्यानुसार विश्‍लेषण केल्यावर हाती आलेली माहिती थक्क करणारी असून, तिच्या आधारे जैवचक्रात होणारे बदल, घटते मत्स्योत्पादन आदींविषयी पुढील संशोधन शक्‍य होणार आहे.

Tuesday, April 5, 2011

खाणींच्या दुष्परिणामांचा अभ्यास आता कसला?

खाणींमुळे होणाऱ्या पर्यावरण हानीच्या अभ्यासार्थ प्रा. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय योग्य असला तरी त्याला फार उशीर झाला आहे. खाणपट्ट्यातील जनजीवनावर खाणकामाचा किती परिणाम झाला आहे याचा व्यापक शोध घेऊन सरकारने खरेतर याविषयी श्‍वेतपत्रिकाच काढण्याची गरज आहे. खाणकामामुळे पाण्याचे स्त्रोत आटण्यासह आरोग्याची झालेली धूळदाण पाहण्यासाठी समिती कशाला हवी? खनिज उद्योगाने आर्थिकदृष्ट्या उभारी दिली असली तरी पर्यावरणाची झालेली अपरिमित हानी कधीही भरून न येणारी आहे.
खाणकाम म्हणजे खुदाई हे ठरून गेलेलेच आहे. मध्यंतरी चीन, जपानसह सर्वत्र खनिजांची मागणी वाढल्याचे पाहून खाणकामाचे वाढलेले प्रमाण केवळ चिंता करण्यास लावणारेच नव्हे तर गोव्याच्या निसर्गावर घाला घालणारे ठरले आहे. गाडगीळ यांची समिती दोन वर्षांनी अहवाल देणार आहे. येत्या वर्षभरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. नव्याने सत्तेवर येणाऱ्या सरकारपुढे हा अहवाल येईल. सत्तेवर कुणी असला तरी त्याच्यावर मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक असते हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्षात केवळ सरकारच नव्हे तर खात्याचा मंत्री बदलला तरी होणारे दृश्‍य बदल इतके असतात की नवे सरकार या अहवालाकडे कसे पाहिल आणि त्यातील शिफारशींची अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे करेल याची कल्पना आता करता येणार नाही.
खाणपट्ट्यात ट्रकांची वाहतूक हा एक स्वतंत्र विषय. मध्यंतरी ट्रकाच्या धडकेत मृत्यू पावलेल्याच्या कुटूंबियांस अमूक लाख रुपये देण्याची आणि त्यानंतर असे प्रकार घडल्यास अशीच भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यातून खाण व्यवसायात गुंतलेल्यांचे निर्ढावलेपण ठळकपणे समोर आले होते. विधानसभेतही खाणपट्ट्यातील रहदारीचा विषय अनेकदा चर्चेला आला. खाणपट्ट्यातील ट्रकांची भीती वाटल्याने आपण सरकारकडून उंच गाडी घेतल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही म्हटले आहे. सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी वाहतूक कोंडीमुळे आपण अडकून पडल्यानंतर पोलिसांना कसे बोलवावे लागले याचाही किस्सा सांगितला आहे.
सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही. त्याला प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यावाचून गत्यंतर नसते. खाण क्षेत्रातील विद्यार्थी जीव मुठीत धरून कसे शाळेत जातात याची कल्पना शहरात बसून येणार नाही. या बालमनावर आपण काय बिंबवतो आहोत याचे भान कुणालाही नाही. सतत धूळ फुफुस्सात गेल्याने आरोग्यावर होणारे परिणाम आयुष्यभर सोबत करणारे असतात. अशा पिढ्याच्या पिढ्या उध्वस्त होणे आणि दुसऱ्या बाजूने खाणकामातून मिळणारी रॉयल्टी वाढली आणि त्यातून आम्ही जनतेसाठी चार योजना राबविणार असे सरकार कोणत्या तोंडातून सांगू शकते? सारेजण असंवेदनशील होत चालल्याचेच हे लक्षण आहे.
खाणीमुळे काहींचे भलेही झाले असेल पण अशा व्यक्ती अगदी कमी संख्येने आहेत. खाणींचा चटका बसणारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. कावरे येथे हा समाज एकत्र झाला, खाण संचालकांना रात्री उशिरापर्यंत थांबण्यास भाग पाडून त्यांनी खाण बंदचा आदेशही मिळविला. रस्त्यावर आल्याने प्रश्‍न सुटतो असे उदाहरण या घटनेने घालून दिले आहे. आजवर खाणकामाच्या विरोधात समाज एकत्र आल्याचे तसे ठळक उदाहरण नव्हते. आता कावरेवासींयाप्रमाणे इतरत्र लोकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला तर खाणकाम चालूच शकणार नाही. खाणी सुरू करण्यापूर्वी होणाऱ्या जनसुनावणीत लोक उपस्थित राहून विरोध करू लागले आहेत. खाणींमुळे समाजाचे भले होत नसल्याने गोवा मुक्‍तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तरी लोकांच्या लक्षात येऊ लागले हेही नसे थोडके.
एकेकाळी खाणकाम प्रतिष्ठेचे मानले जात होते. मात्र तसे चित्र आज राहिलेले नाही. मध्यंतरी बेकायदा खाणकामाने उरली सुरली प्रतिष्ठा धुळीस मिळविल्याने खाणकामाने कमावलेले नाव गमावण्याची वेळ आली आहे.
या साऱ्यामुळे झालेल्या ऱ्हासाचा अभ्यास माधव गाडगीळ यांची समिती करणार आहे पण दोन वर्षे खाणकाम सुरू तर राहिले पाहिजे. सध्याचा खुदाईचा वेग पाहिल्यास कदाचित ही समिती अहवाल सादर करून त्यावर विचार होईपर्यंत खाणकाम करण्यासाठी खनिजच शिल्लक राहणार नाही अशी आजची स्थिती आहे. त्याचमुळे आता समिती नेमण्याचे प्रयोजनच संशयात आले आहे.

Monday, April 4, 2011

सेतुसमुद्रमचा अभ्यास "एनआयओ'कडे

केंद्रीय जहाज उद्योग मंत्रालयाने गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडे (एनआयओ) सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या अभ्यासाचे काम सोपविले आहे. सेतुसमुद्रमच्या नव्या मार्गाच्या आखणीचे काम सध्या सुरू आहे. त्याचा समुद्रीय पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास ही संस्था करणार आहे.भारताचे दक्षिणेकडील टोक आणि श्रीलंकेचे उत्तर टोक या कालव्याद्वारे जोडण्यात येणार आहे. या कालव्याच्या मार्गाबाबत सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. या समितीनेच "एनआयओ'च्या नावाची शिफारस केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. आर. के. पचौरी आहेत. "एनआयओ' या अभ्यासात आणखी दोन संस्थांचीही मदत घेत आहे. त्यासाठी नऊ कोटी 45 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी (निरी) व बेंगळुरु येथील भारतीय व्यवस्थापनशास्त्र संस्था याकामी "एनआयओ'ला मदत करणार आहे. कोची येथे असलेल्या "एनआयओ'च्या केंद्रामार्फत हे काम मार्गी लावले जाणार आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. सनीलकुमार हे काम पाहणार आहेत.न्नारच्या आखातातील, पाल्कच्या समुद्रधुनीतील पर्यावरणीय माहितीचे संकलन व विश्‍लेषण याअंतर्गत केले जाणार आहे. सेतुसमुद्रम प्रकल्पाची उपयुक्तता यावरही अभ्यासात भर देण्यात येणार आहे.

Friday, April 1, 2011

बुडालेले मंदिर सापडले

समुद्राचे जमिनीवर आक्रमण होत असल्याचे पुरावे यापूर्वीच शोधण्यात आले आहेत. पण, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांना आता जमिनीचेही समुद्रावर आक्रमण होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर समुद्र मागे हटल्याचे पुरावे हाती आले असून, पिंदारा येथे बुडालेले मंदिर संकुलच सापडले आहे. "एनआयओ'च्या सागरी पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. के. एच. व्होरा यांनी "गोमन्तक'ला ही माहिती दिली. समुद्रात शेकडो तास डायविंगचा अनुभव असलेले ए. एस. गौर व सुंदरेश यांनी पिंदारात सापडलेल्या मंदिर संकुलाचा अभ्यास सुरू केला. हे संकुल पूर्वी समुद्राच्या पोटात गाडले गेले होते, अशी धक्कादायक माहिती प्रयोगशाळांतील चाचण्यांतून पुढे आली. सौराष्ट्र किनाऱ्यावर कच्छच्या आखातापासून 36 किलोमीटरवर पिंदारा आहे. हा भाग म्हणजे दलदल आहे. ती "ओखा रण' नावाने ओळखली जाते. समुद्राचे पाणी ओसरत जाऊन ती जमीन तयार झाल्याची माहिती स्थानिकांनी गौर यांना दिली. त्यानंतर तेथे उत्खननाचा निर्णय घेतला. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर तेथे आता मंदिराचे संकुल च आढळले आहे. पाच मीटर खोल अशी दलदल त्यासाठी हटवावी लागली आहे. त्याखाली असलेल्या पाण्यात हे संकुल आहे. त्या भागात एक ते चार मीटरच्या लाटा येत होत्या, असेही आढळून आले आहे. त्यामुळे कोणे एके काळी हा भाग समुद्राच्या पोटात गडप झाला होता याचा अंदाज घेत बांधकामांवर विविध चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून ही मंदिरे बराच काळ पाण्याखाली होती, असे सिद्ध झाले आहे. सातव्या ते दहाव्या शतकात पिंदाराचे बांधकाम झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.पिंदारा तरकक्षेत्र म्हणून आठव्या शतकात हा भाग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होता, असा पुरावाही शास्त्रज्ञांच्या हाती आला आहे. देवपुरी नावाचे शहर द्वारका अस्तित्वात येण्यापूर्वीच अस्तित्वात होते असे सांगितले जाते. ऋषी दुर्वास, अगस्ती यांचे मठ तेथे होते असेही सांगितले जाते. पिंदारा सापडल्याने त्याच्यातून देवपुरीच्या शोधासाठी काही पुरावे मिळतात याचा शोध शास्त्रज्ञांनी सुरू केला आहे. समुद्राच्या पातळी होणारे बदल, किनाऱ्याची धूप, पाण्याच्या तापमानातील चढ-उतार या घटकांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी सुरू ठेवला आहे. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी समुद्राच्या तळाशी केले जाणारे उत्खनन तर महत्त्वपूर्ण ठरते आहे. आपल्या पूर्व किनाऱ्यावर पंपहार बुडाल्याचा उल्लेख तमीळ वाङ्‌मयात आहे. द्वारकेचाही असाच उल्लेख आढळतो. किनारी भागातील बदलांमुळे असे होत असावे, असा ढोबळ निष्कर्ष काढून पुरातत्त्व तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला असता पंपहार व द्वारका शोधण्यात त्यांना यश आले. महाबलीपूरम हा कित्येक मंदिरांचा समूहच समुद्राच्या उदरात गडप झालेल्या स्थितीत शास्त्रज्ञांना सापडल्याने आजवर समुद्रच भूमीवर आक्रमण करतो असा समज सार्वत्रिकरीत्या रूढ झाला होता. आता तो समज मागे पडून जमिनीचेही समुद्रावर मर्यादित स्वरूपात का होईना आक्रमण होते व समुद्रही मागे हटतो असे म्हणता येण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.