परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी असा उल्लेख मला 1998 मध्ये ऐकता आला. 1998 मधील जुलैपासून सलग वर्षभर मी सावंतवाडीत होतो.तलावाच्या काठावर वसलेले हे शहर अलीकडच्या काळात उदयाला आले आहे. गाव मौजे चराठे या गावाची सावंतवाडी ही वाडी अशी माहिती मला सावंतवाडीतील दै. "कोकणसाद'चे संपादक गजानन नाईक यांच्याकडून मिळाली. आजही चराठेभोवती असलेला खंदक पाहता येतो. विजय देसाई यांच्यासोबत त्या खंदकाची पाहणी मी केली होती. तेव्हाही तो सुस्थितीत होता. सावंतवाडीत असताना श्रीराम वाचन मंदिरात जाऊन बसणे हा माझा नित्याचा उद्योग होता. 100 वर्षे होऊन गेलेले हे वाचनालय आजही सुस्थितीत आहे. आता तर नवी इमारत उभी राहिली आहे. ग्रंथपाल दीनानाथ नाईक यांचा हसरा चेहरा आजही नजरेसमोर आहे. या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयानंद मठकर हे नेहमी कुठली पुस्तके वाचनालयात हवीत याविषयीची माझी मते आवर्जून ऐकत. त्यामुळेच की काय अनेक विषयांवरील पुस्तकांचा मोठा संग्रह या वाचनालयात आहे. सावंतवाडीत असताना तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांच्याशी माझा विशेष स्नेह जुळला. विकासाच्या बाबतीत त्यांची मते ऐकून मला कधी कधी थक्क व्हावे असे वाटत असे. त्यांच्याच कारकिर्दीत तळ्याच्या बाजूला संगीताच्या तालावर नृत्य करणारा कारंजा, अद्ययावत उद्यान उभे राहिले. एवढेच कशाला रेस्टॉरंटही सुरू झाले. तळ्याच्या भोवती जॉगिंग करण्यासाठी पदपथ आकाराला आला. मोती तलावात झालेले शेवाळ खाण्यासाठी मासे आणून तलावात सोडण्याचा उपक्रम नगरपालिकेने राबविला होता. मे महिन्याच्या पूर्वी तलावातील पाणी आटू लागते त्याच दरम्यान ते मासे कुणी तरी खाण्यासाठी पळविण्याचा प्रकारही उघडकीस आला होता. अजीज शेख हे मुख्याधिकारी असताना अचानकपणे तळे आटविण्याच्या प्रकाराची मोठी चर्चाही आजही आठवते.सावंतवाडीच्या मोती तलाव ही पूर्वीच्या काळची सिंचन व्यवस्था होती. त्या संदर्भातील जुने कागदपत्र प्रा. जी. ए. बुवा यांच्याकडे मला पाहता आले. त्या काळी सावंतवाडीत पिण्याचे पाणी केसरी या गावातून आणण्यात येत होते. आजही ती व्यवस्था कायम असून गोविंद चित्रमंदिर येथे असलेला सार्वजनिक नळ हा केसरीच्या पाण्यावर चालतो. सावंतवाडीहून बेळगावकडे जाणारा मार्ग फुटतो त्या तिठ्याला गवळी तिठा असे नाव आहे. गेल्या दोन वर्षांत त्या भागात मोठ्या इमारती उभ्या राहून त्या भागाचा चेहरा-मोहराच बदलला आहे. पूर्वी सिनेमाघर होते त्या जागी आता मोठाले कॉम्प्लेक्स उभे राहिले आहे. पालिकेजवळ उघड्यावर चालणारा बाजार आता बंदिस्त इमारतीत हलविण्यात आला आहे. सावंतवाडीच्या बाजारातून वरच्या बाजारात जाताना वाटेत विठ्ठल मंदिर लागते. या मंदिरातून पूर्वी शहराच्या सर्व सीमा दृष्टीस पडत. आता इमारती उभ्या राहिल्याने ती मजा हरवली गेली आहे. या वरच्या बाजारातून खाली उतरताना चितार आळी लागते.सावंतवाडी हे शहर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे असा उल्लेख पाठ्यपुस्तकात होता. ही ओळख पटवून घेण्यासाठी चितार आळीशिवाय पर्याय नाही. तेथे अशी खेळणी मिळणारी ओळीने सात दुकाने आहेत.सावंतवाडीत असताना पत्रकार अरविंद शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. गेली 25 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या शिरसाट यांची स्मरणशक्ती दांडगी. सावंतवाडीविषयी सर्व संदर्भ त्यांना तोंडपाठ. एकदा मला त्यांनी हंसा वाडकर यांच्या सावंतवाडीत असलेल्या घराविषयी थोडीफार माहिती दिली होती. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे नंदू ऊर्फ नंदकिशोर पेडणेकर यांनीही सावंतवाडीत पूर्वीच्या काळी पथदीप कसे होते, सावंतवाडीत कर व्यवस्था, न्यायदान व्यवस्था कशी होती याची माहिती दिली. सालईवाड्यात शंभर वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचे दृश्य आजही डोळ्यासमोर येते.सावंतवाडीच्या राजघराण्यातील समाध्या माठेवाडा भागात आजही पाहायला मिळतात. राजेश नाईक त्या भागात राहतात. त्यांनी मला या माठ्यांविषयी माहिती दिली. सावंतवाडीत जाण्याचे प्रवेशद्वार म्हणजे गोलगावचा दरवाजा. आता ही वास्तू सुस्थितीत असली तरी 1998 मध्ये तिच्या दुरवस्थेबद्दल लिहिल्याबद्दल कोलगाव दरवाज्याचे मालक "सुकी' यांच्याकडून मला थोडे ऐकावे लागले होते.सावंतवाडीत आता शिल्पग्राम उभे राहत आहे. परवाच शिवप्रसाद देसाई यांच्याशी बोलताना ते लवकरच आकाराला येईल, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा सावंतवाडीत जाण्याची संधी मिळाली तर शिल्पग्राम पाहण्याचा मानस आहे.
http://vimeo.com/68515185
ReplyDeleteटिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625
ReplyDeleteटिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625
ReplyDelete