Monday, May 2, 2011

गोपुरी आश्रम

1999 मध्ये कणकवलीत असताना एक दिवस अमरसिंह घोरपडे नावाचे माझे सहकारी मला वागदे या तीन किलोमीटरवरील गावी असलेला गोपुरी आश्रम दाखविण्यास घेऊन गेले. तेथे प्रा. राजेंद्र मुंबरकर या तिशीतील तरुणाचा परिचय झाला. मुंबरकर कणकवली महाविद्यालयात ग्रामीण विकास विषय शिकवतात. आता ते पीएचडी मिळवून प्रा. चे डॉ. मुंबरकरही झाले, तरी आमची मैत्री त्याच पातळीवर कायम आहे. मुंबरकर यांनी तेथील गोशाळा, शेती फिरून दाखविली. त्या वेळी या आश्रमाच्या व्यवस्थापनाचा ताबा एक दिवस माझ्याकडे येईल अशी पुसटशी कल्पना देखील माझ्या मनाला शिवली नाही. समाजवादी चळवळीशी असलेली जवळीक त्यासाठी उपयोगी ठरली. जयवंत मठकर, गणपत सावंत, रमाकांत आर्ते, गोविंदराव शिंदे दादा यांना मी कणकवलीत आल्याचे कळले. एकदा मठकरकाका आले नि माझ्या जानवलीतील खोलीतील सर्व साहित्य गोपुरीतील विश्रामगृहात हलविण्याचा जणू आदेशच दिला. त्यानंतर मला व्यवस्थापन समितीवर कायम निमंत्रित असे स्थान देण्यात आले. दैनंदिन व्यवस्थापनात माझा शब्द अखेरचा ठरू लागला. तेथे असताना संस्था फायद्यात आणण्याची किमया सर्वांच्या मदतीने साधली. नर्सरी सुरू केली. नर्सरी प्रशिक्षण वर्ग सुरू केला. खतविरहीत ताजी भाजी मोठ्या प्रमाणावर मिळण्यासाठी प्रयत्न केले. गणपत पाटील यांच्या मदतीने उसाची शेती केली. केळीच्या नव्या जातींची लागवड केली. जुनाट पंप बदलून नवा जादा अश्‍वशक्तीचा पंप बसविला. अप्पासाहेबांच्या या कार्याची साक्ष देत गोपुरी आश्रम आजही कणकवलीनजीक वागदे येथे कार्यरत आहे. कोकण गांधी म्हणून ओळखले जाणारे अप्पासाहेब 1922 मधील द्विपदवीधर. इंग्रजांच्या त्या आमदनीत त्यांना प्रशासनात उच्च अधिकाराची नोकरी करणे सहज शक्‍य होते; पण त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. 1930 ला महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला, तर अप्पासाहेबांनी सिंधुदुर्गातील शिरोडा येथे हा सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या चिरस्थायी विकासाचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पटवर्धन यांनी आपल्या मायभूूमीची वाट धरली. कणकवलीनजीक वागदे गावात त्यांचे सहकारी मित्र प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या सहकार्याने 18 एकर टाकावू जमिनीवर 5 मे 1948 रोजी गोपुरी आश्रम या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. केवळ संकल्पना न मांडता आपले विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. युरोपियन देशातील उच्च राहणीमान अप्पांनी अनुभवले होते. भारतीय लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे हे धोरण त्यांनी अवलंबिले. गोरगरीब लोकांना परवडतील, असे शौचालय बांधण्याचे प्रयोग त्यांनी केले. सोन खतापासून उत्तम खत निर्माण होते हेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी उभारलेली मॉडेल्स आजही गोपुरी येथे पाहायला मिळतात. गोबरगॅस आणि त्यावर जेवण शिजविण्याचा त्यांचा प्रयोग म्हणजे सुरवातीला आक्रीतच वाटले. उत्तम बायोगॅस निर्माण करता येऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी कणकवलीतील छात्रालय येथे "मैला गॅसप्लॅन्ट' उभारला. अप्पांनी ग्रामीण ऊर्जा व स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेक प्रयोग केले. धवल क्रांतीची कोकणात सुरवात व्हावी यासाठी संकरित गायी आणल्या. पुण्याहून चारा आणला. फलोत्पादन, शेतीचे नवे प्रयोग, पेरू, केळी, आंबा, यावर वेगवेगळे प्रयोग, मसाले पिकांची लागवड त्यांनी स्वतः केली व शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. आजही गोपुरीत अनेक प्रयोग सुरू आहेत. काजू सरबताचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. आजही कृषी सहली गोपुरीला आवर्जून भेट देतात. नंदकिशोर परब, सरिता धामापूरकर, जया सदडेकर, उमेश जाधव, प्रसाद आचरेकर यांनी गोपुरी आश्रमात नव्या कल्पना राबविण्यासाठी चांगले सहकार्य केले. त्या आश्रमात असताना कोकण दौऱ्यावर आलेले अण्णा हजारे माझ्या खोलीत एक दिवस मुक्कामाला राहिले ही आठवण मी हृदयात जपून ठेवली आहे.

1 comment:

  1. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कित्येक गोष्टी आहेत ज्याचा थेट संबंध भारताच्या जडणघडणीशी आहे आपल्या स्वातंत्र्य पूर्व इतिहासाशी आहे......तुमच्या लेखणीतून अश्या अनेक विषयांची माहिती मिळते..... धन्यवाद

    ReplyDelete