Wednesday, April 13, 2011

कोकणातील खेडे

कोकणात जाणे मला नेहमीच आवडत आले आहे. दाभोळचे अण्णा शिरगावकर, चिपळूणचे प्रकाश देशपांडे, सागरचे संपादक निशिकांत जोशी, सावंतवाडीचे अरविंद शिरसाट, वेंगुर्ल्यातील संजय मालवणकर, वैभववाडीचे प्रकाश काळे, गुहागरचे संकेत गोयथळे, रत्नागिरीचे गिरीश बोंद्रे, मंडणगडचे विकास शेटये यांच्यामुळे कोकण बरेच समजून घेता आले.त्यांच्याकडून मी संकलीत केलेल्या माहितीनुसार कोकणातील प्राचीन खेडी स्वयंपूर्ण होती. मात्र बदलत्या काळानुसार खेड्यातील चांगल्या चालीरीती, परंपरा नष्ट झाल्या आणि खेडी भकास झाली आहेत. चौसोपी कौलारू घर, ओटी, पडवी, माजघर, न्हाणीघर, अंधारात असणारे स्वयंपाकघर, घरापाठीमागे गुरांचा गोठा, नारळी-पोफळीच्या बागा, शेतमळा, पाटाचे पाणी, कौलारू घरातून बाहेर पडणारा धूर, गावातून वाहणारी नदी, प्राचीन इतिहासाची साक्ष देणारी मंदिरे खेड्यात आजही पाहता येतात. स्वयंपूर्ण खेड्यातील लोकजीवन, संस्कृती, बारा बलुतेदारांचे व्यवसाय, एकोपा, चालीरीती, पद्धती तेथे राहून अभ्यासण्यासारख्या आहेत. कोकणातील गावे डोंगराळ भागात वसलेली असतात. दोन गावे किंवा एकाच गावातील दोन वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जायचे झाले, तरी एखादा छोटासा डोंगर पार करावा लागतो. तो कष्टप्रद अनुभव दत्तप्रसन्न कुलकर्णीसोबत मी अनेकदा घेतला आहे. दरीतून जाणाऱ्या पक्‍क्‍या पाऊलवाटांनी जाण्याचा अनुभव घेण्यासाठी चिपळूणजवळील पोफळी परिसरात जायला हवे. लाल चिऱ्याच्या दगडापासून बांधलेल्या या वाटांना बांधघाटी किंवा पाखाडी म्हणतात. रत्नागिरी शहर आणि परिसरात अशा अनेक पाखाड्या आजही सुस्थितीत आहेत. गूळपाणी देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करून घेण्याची मजा फक्त कोकणातच अनुभवता येते.कोकणात फिरताना कुठे तरी डोंगरात भेटते परशुरामाची मूर्ती. कोकणाला परशुरामभूमी म्हणून संबोधले जाते. परशुरामाकडून झालेले निःक्षत्रीयीकरण, समुद्र हटवून कोकणाची निर्मिती आदी कथा चिपळूणच्या निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांच्याकडूनच ऐकायला हव्यात. परशुराम शास्त्रज्ञ कसा होता हे नानांच्या तोंडून ऐकताना समाधीच लागली पाहिजे. कोकणात फिरताना ग्रामदैवत वाघजाईचे मंदिर सापडायचे. हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव असताना कोकणातल्या देवीचे नाव वाघजाईच का, असा प्रश्‍न मला एकदा पडला. वाघ असलेले जंगल पर्यावरणदृष्ट्या समृद्ध समजले जाते. त्याची उपास्य देवता म्हणून वाघजाईची पूजा केली जाते. संपूर्ण गाव याच एका ठिकाणी एकत्र होत असे. येथील निवाडे अंतिम असत, अशी माहिती अनेकांशी या विषयावर चर्चा केल्यावर मिळाली.पूर्वी गावाच्या प्रारंभीच नाभिकाचे दुकान असे. गावाचा प्रमुख असलेला खोत, विविध शस्त्रांसह शेतीची अवजारे तयार करून देणारा लोहार, अल्प वस्त्रात असला तरी गावाचे पोषण करणारा- शेती करणारा कुणबी, कासार, कुंभार, सुतार, चर्मकार, धनगर, कोळी असे बलुतेदार भेटण्यासाठी कोकण दौऱ्याला पर्याय नाही.

No comments:

Post a Comment