Friday, April 22, 2011

पार्से गाव नव्हे, नररत्नांची खाण!

मुंबईचा भाऊंचा धक्का फार प्रसिद्ध आहे. साहित्यातही तो अजरामर झाला आहे. या धक्‍क्‍याचे नामकरण ज्यांच्या नावावरून झाले ते भाऊ पार्सेचे. पार्से गाव नव्हे, तर ही नररत्नांची खाणच आहे. देश पातळीवर गाजलेल्या अनेकजणांची जन्मभूमी. सध्या गोव्याच्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सव सुरू आहे.या मुक्तीसाठीच्या लढ्यातील पहिला उठाव याच पार्सेत झाला. त्यानिमित्ताने या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या.कोण कुठला ? तर तो पार्सेचा असे सांगितल्यावर गोवाभर नव्हे, तर कोकणातही आदराने पाहिले जाते. सेतू माधवराव पगडी पार्सेत आले, त्यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर झालेल्या प्रश्‍नोत्तराच्या वेळी गावाची महती अनेकांना कळली. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरवात पार्सेत झाली याचा उल्लेख होतो तेव्हा छाती अभिमानाने भरून येत नसेल असा पार्सेवासीय नाही. इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते, की हा केवळ गाव नव्हे तर अनेक नररत्नांची ही खाणच आहे आणि त्यातून यापुढेही इतिहास घडवणारी रत्ने जन्माला येतील असेच या गावचे वातावरण आहे.26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 19 डिसेंबरला श्री भगवती मंदिराजवळच्या स्मारकाला वंदन केले जाते. त्यावेळी भाषणे होतात. त्यात गावाविषयी फारसे अभावानेच बोलले जाते. नव्या पिढीला या गावाचा वारसा सांगण्याची गरज आज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे. क्रांतिकारकांचा गाव ही ओळख अनेक प्रश्‍नांवर गावाने घेतलेल्या प्रखर भूमिकेमुळे आजही गोव्याला आहे. सध्या नागरी विभागात समावेश झाल्याने दूरध्वनीचे मासिक भाडे वाढले आहे, त्याविरुद्ध पार्सेवासीय एकवटले आहेत.निसगार्ने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या गावातील संपदाही गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक जपली आहे. चारशे वर्षांपूर्वी येथील लोक लढवय्ये होते अशी नोंद इतिहासात आढळते. गावात ताणतणाव असले, तरी जत्रा, गणेश चतुर्थी, दसरा सणांच्यावेळी एकत्र येण्याची परंपरा आजही कायम आहे. जत्रेला गावी न येणारा इथला रहिवासी विरळच. गावाला संगीताचीही मोठी परंपरा आहे. महिलांना आज आरक्षण देण्याची मागणी वाढत चालली आहे. आज कोणालाही खरे न वाटो परंतु 1917 मध्ये बाळा पार्सेकर यांनी स्त्री नाटक मंडळ सुरू केले होते. त्यात नाटकातील सर्व भूमिका महिलाच करायच्या. गोवा, उत्तर कर्नाटक, कोकण ते पार मुंबईपर्यंत या मंडळाने नाट्यप्रयोग सादर केले आहेत. आजही हौशी रंगभूमीवर शिमग्याच्यावेळी रंगमंचावर जाण्यास अनेकजण उत्सुक असतात.पार्से युवक संघाने रंगभूमीवर आणलेली नाटके नाट्यप्रेमी विसरूच शकणार नाहीत. गोव्याचे महाराष्ट्रात आणि दिल्लीत प्रतिनिधित्व करण्याचा मान या संघाने अनेकदा पटकावला आहे. या संघाच्या "अशी पाखरे येती'च्या आठवणी आजही सांगितल्या जातात. अशा अनेक गोष्टी या गावाबद्दल सांगता येतील. पार्सेत चार मार्गे येता येते. शिवोली चोपडे पुलाकडून आगरवाडामार्गे, केरी हरमलहून कोरगावमार्गे, कोलवाळ धारगळहून तुयेमार्गे किंवा सरळ पेडण्यातून किंवा मोरजीहून. पार्से म्हटल,े की स्व. गोविंद मंगेश लाड (अर्थशास्त्र तज्ज्ञ व संपादक), स्व. डॉ. भाऊ दाजी लाड (डॉक्‍टर, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक), स्व. परशुरामबुवा पार्सेकर (गायक), स्व. दामू अण्णा पार्सेकर (तबला वादक), स्व. भालचंद्र पार्सेकर (तबला वादक), स्व. यशवंत बुगडे (स्वातंत्र्यसैनिक), स्व. श्रीधर पार्सेकर (व्हायोलिन वादक) यांची नावे आठवतात. त्यांच्यानंतरच्या पिढ्याही कर्तबगार निघाल्या. शिक्षण संचालक अशोक देसाई, औद्योगिक विकास महामंडळाचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक गोपाळ देसाई, लेखिका सुमेधा कामत देसाई, तियात्रीस मार्सेलीनो दी बेतीम, मुंबईच्या बेस्टचे माजी अध्यक्ष रामानंद लाड, मराठी नाट्यसृष्टीतील भालचंद्र कळंगुटकर, सुरेंद्र देसाई (वकील), अमोल म्हालदार (शल्यविशारद), अरुणा प्रभू (डॉक्‍टर), देवेंद्र आरोलकर (मेकॅनिकल इंजिनिअर), सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक केशव आत्माराम प्रभू, बाळकृष्ण कानोळकर (प्राध्यापक), हनुमंत गवंडी (वकील), दशरथ पेटकर (वकील) यांचीही नावे सहजपणे आठवतात.

No comments:

Post a Comment