Sunday, April 17, 2011

देखणे गाव आयी

गोव्यातील साखळीहून दोडामार्गला जाताना आयी हे गाव आहे. बांद्यापासून काही किलोमीटरवर असलेले हे गाव आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे. पोर्तुगीज काळातील गजबजलेली व्यापारी बाजारपेठ अशी ओळखही आयी गावाला आहे. तेथे आजही पोर्तुगीजकालीन इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या कित्येक वास्तूही आहेत.पर्ये येथून परतताना एक दिवस सहज उजवीकडे वळलेला हा रस्ता कुठे जातो असा प्रश्‍न पडला नि मी आयी येथे पोचलो.पोतुर्गिजांची गोव्यावर सत्ता असताना ब्रिटिशांच्या ताब्यातील व नंतर मुक्त भारताच्या हद्दीतून अनेक गोष्टी गोव्यात आणल्या जात. या गोष्टी चोरट्या मार्गाने आणण्यासाठी आयीचा वापर होत असे. चणे, वाटाणे, गूळ, चवळी, छत्र्या, कपडे, अगरबत्ती आणल्या जात असे मला तेथे कळले. दोडामार्गच्या बाजारपेठेतून बैलगाडीतून माल आयी येथे आणला जायचा. दोडामार्गातून एका वेळी 25 ते 50 बैलगाड्या सुटायच्या. दोडामार्ग, तळेखोल, कीटवाडी असा प्रवास करीत रात्री सुटलेल्या गाड्या पहाटेपर्यंत गावात पोचायच्या. तेथे सगळा माल उतरून ठेवला जायचा. उतरलेला माल रात्री सीमापार करून गोव्यात नेला जायचा. रात्रभरात 50 ते 60 कामगार मालाच्या गोणी सीमापार नेऊन द्यायचे. तेथे पुन्हा दुसरे कामगार हजर असायचे. इकडचा माल तिकडे जाऊ नये, यासाठी पोर्तुगिजांनी माटणे गावापासून रावण गावापर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर अंतर भरेल एवढे लोखंडी कुंपणही उभारले होते. त्याचे अवशेषही मला पाहता आले. तारेच्या पलीकडे पोर्तुगिजांचा, तर अलीकडे कस्टमच्या पहारेकऱ्यांचा पहारा असायचा. अशा या वेगळ्या बाजारपेठेच्या खुणा आजही आपले अस्तित्व जोपासत असून काही इमारती पडक्‍या, तर काही दिमाखात उभ्या आहेत. गोव्यातून ब्लेड, लवंग, सुपारी, सुके मासे याच पद्धतीने आणले जायचे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा बाजार बंद झाला, तरी त्याच्या खुणा इतिहास अभ्यासकांसाठी मागे राहिल्या आहेत. दोडामागर्मध्ये एकदा भटकंती करत असताना पारगडविषयी कळले. तेथील गावस नावाचे गृहस्थ मला तेथे नेण्यासही तयार झाले. पारगडाची भौगोलिक रचना अशी की, गोव्यातील पोर्तुगीज, सावंतवाडीचे खेम-सावंत यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग करण्यात आला. चंद्र-सूर्य असेपर्यंत या गडाची राखण करायची, अशी सनद (ताम्रपट) शिवाजी महाराजांनी दिली आणि अखेरपर्यंत हा गड अजिंक्‍य राहिला. 1857 च्या गडकऱ्यांच्या बंडातही हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ शकला नाही. उंच ताशीव कडे, पायथ्याला घनदाट जंगल आणि आकाशाशी स्पर्धा करणारी उंची यामुळे हा गड आपले अभेद्यपण टिकवून आहे.चंदगड-दोडामार्ग-गोवा रस्त्यावर पारगडकडे जाणारा फाटा मिळतो. तेथून पारगडला जाता येते. दोडामार्ग तालुक्‍यातील मोर्ले गावातून मिरवेलमार्गेही पारगडला जाता येते. त्यासाठी काही तास चालत जावे लागते. आम्ही दोन्ही बाजूने गडावर चढाई केली. दाट धुक्‍यात हरवलेली गर्द झाडी, घोंगावणारा गार वारा, आभाळ आणि अरण्य यांची एकमेकांना स्पर्श करण्यासाठी चाललेली स्पर्धा आणि निसर्गाचे अनेक विलोभनीय विभ्रम पारगडावरून पाहायला मिळाले. गडावर शिवरायांच्या वंशजांचे आजही अस्तित्व आहे. त्यांची घरे तीन-साडेतीनशे वर्षे तेथे उभी आहेत. मालुसरे, शेलार, झेंडे, शिंदे, कदम, नाईक, डांगे, जगताप, सूर्यवंशी, चव्हाण, माळवे, कुंडले, थोरात, जाधव, कारखानीस, फडणीस, सबनीस, मणेरकर ही गडावरची मूळ घराणी. गडावर पद्मावती तलाव, अन्य तीन बांधीव दगडाचे तलाव, याशिवाय अठरा विहिरी आहेत. गडाच्या पश्‍चिमेला तीन बुरूज आहेत. फडणीस बुरूज, भालेकर बुरूज आणि शेलार बुरूज अशी त्यांची ओळख आहे. शिवाय भांडे, झेंडे माळवे हे अन्य तीन बुरूज आणि पूर्व-पश्‍चिम-उत्तरेला भक्कम तटबंदी आहे.

No comments:

Post a Comment