Friday, April 1, 2011

बुडालेले मंदिर सापडले

समुद्राचे जमिनीवर आक्रमण होत असल्याचे पुरावे यापूर्वीच शोधण्यात आले आहेत. पण, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांना आता जमिनीचेही समुद्रावर आक्रमण होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर समुद्र मागे हटल्याचे पुरावे हाती आले असून, पिंदारा येथे बुडालेले मंदिर संकुलच सापडले आहे. "एनआयओ'च्या सागरी पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. के. एच. व्होरा यांनी "गोमन्तक'ला ही माहिती दिली. समुद्रात शेकडो तास डायविंगचा अनुभव असलेले ए. एस. गौर व सुंदरेश यांनी पिंदारात सापडलेल्या मंदिर संकुलाचा अभ्यास सुरू केला. हे संकुल पूर्वी समुद्राच्या पोटात गाडले गेले होते, अशी धक्कादायक माहिती प्रयोगशाळांतील चाचण्यांतून पुढे आली. सौराष्ट्र किनाऱ्यावर कच्छच्या आखातापासून 36 किलोमीटरवर पिंदारा आहे. हा भाग म्हणजे दलदल आहे. ती "ओखा रण' नावाने ओळखली जाते. समुद्राचे पाणी ओसरत जाऊन ती जमीन तयार झाल्याची माहिती स्थानिकांनी गौर यांना दिली. त्यानंतर तेथे उत्खननाचा निर्णय घेतला. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर तेथे आता मंदिराचे संकुल च आढळले आहे. पाच मीटर खोल अशी दलदल त्यासाठी हटवावी लागली आहे. त्याखाली असलेल्या पाण्यात हे संकुल आहे. त्या भागात एक ते चार मीटरच्या लाटा येत होत्या, असेही आढळून आले आहे. त्यामुळे कोणे एके काळी हा भाग समुद्राच्या पोटात गडप झाला होता याचा अंदाज घेत बांधकामांवर विविध चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून ही मंदिरे बराच काळ पाण्याखाली होती, असे सिद्ध झाले आहे. सातव्या ते दहाव्या शतकात पिंदाराचे बांधकाम झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.पिंदारा तरकक्षेत्र म्हणून आठव्या शतकात हा भाग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होता, असा पुरावाही शास्त्रज्ञांच्या हाती आला आहे. देवपुरी नावाचे शहर द्वारका अस्तित्वात येण्यापूर्वीच अस्तित्वात होते असे सांगितले जाते. ऋषी दुर्वास, अगस्ती यांचे मठ तेथे होते असेही सांगितले जाते. पिंदारा सापडल्याने त्याच्यातून देवपुरीच्या शोधासाठी काही पुरावे मिळतात याचा शोध शास्त्रज्ञांनी सुरू केला आहे. समुद्राच्या पातळी होणारे बदल, किनाऱ्याची धूप, पाण्याच्या तापमानातील चढ-उतार या घटकांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी सुरू ठेवला आहे. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी समुद्राच्या तळाशी केले जाणारे उत्खनन तर महत्त्वपूर्ण ठरते आहे. आपल्या पूर्व किनाऱ्यावर पंपहार बुडाल्याचा उल्लेख तमीळ वाङ्‌मयात आहे. द्वारकेचाही असाच उल्लेख आढळतो. किनारी भागातील बदलांमुळे असे होत असावे, असा ढोबळ निष्कर्ष काढून पुरातत्त्व तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला असता पंपहार व द्वारका शोधण्यात त्यांना यश आले. महाबलीपूरम हा कित्येक मंदिरांचा समूहच समुद्राच्या उदरात गडप झालेल्या स्थितीत शास्त्रज्ञांना सापडल्याने आजवर समुद्रच भूमीवर आक्रमण करतो असा समज सार्वत्रिकरीत्या रूढ झाला होता. आता तो समज मागे पडून जमिनीचेही समुद्रावर मर्यादित स्वरूपात का होईना आक्रमण होते व समुद्रही मागे हटतो असे म्हणता येण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment