Wednesday, May 16, 2018

भन्नाट "आयरीश रॉड्रिग्ज'

हा किस्सा आहे मुख्य नगर रचनाकार यांच्या दालनातील. एका व्यक्तीने मे महिन्यात एक भूखंड खरेदी केला होता. त्याने त्या भूखंडाच्या रूपांतरासाठी अर्ज केला होता. त्याला तालुका पातळीवरील नगररचनाकारांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी सप्टेंबरमध्ये सरकारने एक अधिसूचना जारी करून 225 चौरस मीटरखालील भूखंड हे अवैध भूखंड म्हणून जाहीर केले होते. त्या व्यक्तीचे म्हणणे होते की, मे मध्ये मी 200 चौरस मीटरचा भूखंड घेताना मला सरकार पुढे असा निर्णय घेणार याची कल्पना नव्हती. नंतर घेतलेला निर्णय माझ्या पूर्वी झालेल्या व्यवहाराला लागू करून भू रूपांतरापासून मला वंचित ठेवू नका. कारण, भूखंडाशेजारी विकत घ्यायची म्हटली तरी इंचभरही जमीन शिल्लक नाही.
योगायोगाने त्याची गाठ ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांच्याशी पडली. रॉड्रिग्ज यांनी एका परिच्छेदाचा एक अर्ज तिथल्या तिथे त्या व्यक्तीला लिहून दिला आणि त्या व्यक्तीने तो मुख्य नगररचनाकारांच्या पुढ्यात ठेवला. तो अर्ज पाहिल्यावर नाकारलेले भू-रूपांतर मंजूर झाले. ती व्यक्ती आयरीश यांचे आभार मानत परत गेली.
कायद्याचे खाचखळगे पुरेपूर कोणाला ठाऊक असतील तर आयरीश यांनाच. त्यांच्या कामाचा उरक दांडगा आहे. तसाच त्यांचा जनसंपर्क. रात्रीबेरात्री कधीही फोनवर उपलब्ध असणारा कार्यकर्ता असे त्यांचे वर्णन करता येऊ शकते. त्यांची व्यवस्थेशी टक्कर देण्याची जिद्द वाणाखण्याजोगी आहे. त्यामुळे अनेकजण दुखावलेही गेले आहेत. त्यामुळे आयरीश यांना शारीरिक हल्ल्यालाही सामोरे जावे लागले आहे. त्याची बोटे जायबंदी होऊन त्यांना किंमतही चुकवली आहे. एकाच व्यक्‍तीचे लष्कर ही उपाधी त्यांना चपखल ठरते. विषय कोणताही असो, तेथे सरकारविरोधात काही दिसले तरी त्या वादात आयरीश यांनी उडी घेतलीच म्हणून समजा. उगाच वाईटपणा कशाला म्हणून बरेचजण सार्वजनिक जीवनात वावरताना पंगा घेणे टाळतात. मात्र त्याच्या नेमके उलट आयरीश यांचे वागणे आहे. त्यांना वाद आवडतात. भल्या भल्यांशी पंगा घेणे आवडते. एक दिवस कधी कोणाशी वाद ओढवून घेतला नाही तर त्यांना जेवण गोड लागत नसावे की काय अशी शंका यावी एवढे ते वादाच्या आहारी गेले आहेत.
गेल्या काही वर्षात सोशल मिडीयाचा मोठा बोलबाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअप अशी नवीन माध्यमे समोर येत गेली आहेत. पूर्वी मुद्रित व दृकश्राव्य माध्यमावर जनतेपर्यंत पोचण्यासाठी अवलंबून रहाव्या लागणाऱ्या आयरीश यांच्यासाठी या माध्यमांचे आगमन हे वरदानच ठरले. सकाळी लोक गुड मॉर्निंगचे चांगले संदेश शोधून पाठविण्याच्या तयारीत असतानाच आयरीश यांचा भलामोठ संदेश येऊन आदळतो. त्याचे टंकलेखन कधी पहाटे केलेले असते त्यांनाच ठाऊक. त्यावेळी त्यांचा जो दिवस सुरू होतो तो कधी मावळतो हे कळतच नाही. मिळेल ती माहिती रात्री उशिरापर्यंत ते देतच राहतात.
माहिती हक्क कार्यकर्ता ही त्यांची आणखीन एक ओळख. आयरीश यांनी माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागितली ही त्यांना ती विनासायास आणि लगेच मिळते. आयरीश आपली आणखी कोणती गोष्ट बाहेर काढतील ही भीती अनेकांना वाटते. त्यामुळे आयरीश यांना शक्‍यतो दुखावू नये, अशी सोईस्कर भूमिका सरकारी कार्यालयात घेतली जाते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणालाही माहिती अधिकारात माहिती हवी असली तरी त्या अर्जाखाली आयरीश यांची स्वाक्षरी घेतली की झाले.
आयरीश अनेक गोष्टी प्रकाशात आणत असतात. त्या गोष्टींचा त्यांना पूर्वी शोध घ्यावा लागत असते. त्यासाठी मोठा पाठपुरावा करावा लागत असे. मात्र ते निर्भीडपणे विषय हाती घेतात याची खात्री लोकांना पटल्यापासून लोक आपसूकपणे त्यांना विषय पुरवतात. त्यांना पूरक कागदपत्रेही देतात. पूरक माहिती कुठे मिळेल तेही सांगतात. फक्त व्यक्तिगत विषय ते हाताळतात असे नव्हे. पोलिसांना दुपारी वेळच्या वेळी आणि उत्कृष्ट जेवण मिळणे हा त्यांचा अधिकार त्यांना मिळावा यासाठीही आयरीश यांनी प्रयत्न केले. ब्रिक्‍स परिषदेवेळी पोलिसांना दिलेल्या जेवणात काळेबेरे झाल्याच्या संशयावरून त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. स्व. सतीश सोनक बऱ्याचदा मानवाधिकार आयोगासमोर पीडितांचे खटले विनामोबदला लढायचे. सोनक यांच्या मृत्यूनंतर ते अर्धवट राहिलेले खटले विनामोबदला लढवून आयरीश यांनी आपले मूळ रूप दाखवून दिले होते. आयरीश यांचे जीवनातील अनेक पैलू आहेत, विद्यार्थी दशेपासून लढवय्या ही त्यांची ओळख आजतागायत कायम आहे. 

No comments:

Post a Comment