Tuesday, May 7, 2019

बदलणारे कारवारी नाटक

गोव्यात शिमगोत्सवात वा देवस्थानच्या सणावेळी गावच्याच लोकांनी नाट्यप्रयोग सादर करण्याची पद्धत आहे. गोव्याला लागून असलेल्या कारवार भागातही ही पद्धती रुढ आहे. एकेकाळी या भागातील ग्रामपंचायतींनी कारवार, भालकी, बिदरसह बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट झाले पाहिजे यासाठी आंदोलने केली होती. कारवारच्या जनतेने पुण्यातील येरवडा तुरुंगाची हवाही या आंदोलनावेळी अनुभवली आहे. असे असले तरी गोव्याचा मोठा प्रभाव या भागावर सध्या आहे.
याला एक प्रमुख कारण म्हणजे या भागातील लोक रोजगारासाठी गोव्यावर अवलंबून आहेत. गोवा मुक्तीनंतर पोलिस खात्यात कारवारचे लोक मोठ्या प्रमाणावर रुजू झाले. त्यानंतर आता गोव्यातील खासगी उद्योगांत कष्टाळू मनुष्यबळाची उणीव कारवारच्या युवक युवतींनी जाणवू दिली नाही. गोव्यातील समाजात काय चालते ते हा युवा वर्ग पाहत आला आहे. आपल्याही गावात तसे झाले पाहिजे यासाठी तो फार आग्रही आहे. कारवार परिसरातील गावागावात असलेल्या मंदिरांचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करणे आणि त्या मंदिरात दिवजोत्सव साजरा करणे या गोष्टी कारवार परिसरात निश्चितपणे गोव्यातून आल्या आहेत.
गोव्याची अशी छाप कारवारवर असली तरी कारवारमधील अस्मितेलाही हुंकार फुटू लागले आहेत. कारवारच्या गावागावात पू्र्वीपासून जत्रोत्सवात मराठी नाटके सादर केली जात होती. त्यासाठी लागणारे नेपथ्यही गोव्यातून आणले जात होते. कारवारच्या गावागावात तेव्हा सातवीपर्यंतच्या मराठी शाळा शिल्लक होत्या. मराठीविषयी जनतेच्या हृदयात प्रेम होते. हळूहळू कानटीकरणाचा वरवंटा बेळगावनंतर कारवार परिसरावर फिरू लागला. गावागावातील मराठी शाळा बंद पडू लागल्या. कानडी शाळांकडे मुले वळली. पुढे सरकारी नोकरीसाठी कानडी भाषा आवश्यक झाल्याने कानडीची कास या भागातील जनतेने धरली. उच्च शिक्षणासाठी उपलब्ध नसलेले मराठी माध्यम हेही याला कारण ठरले.
कारवारमध्ये आता कारवारी कोकणीत नाटके लिहिणारे अनेकजण लेखक होऊ लागले आहेत. जनतेलाही ही नाटके आपलीशी वाटू लागली आहेत. नेपथ्य साहित्य पुरवणारे अनेक व्यवसाय उदयाला आले आहेत.  नाट्यप्रयोग म्हटला की हार्मोनियम व तबला ही आवश्यक वाद्ये ठरून गेलेली असतात. कारवारमधील गेल्या पाच वर्षात कारवारमधील नाटक आपली कूस बदलू लागले आहे.
हार्मोनियमची जागा कि बोर्डने घेतली आहे. तबला आहे पण तबलजीच्या मनगटावर घुंगरू आले आहेत, ऑक्टोपॅड वाद्यवृंदाचा भाग झाला आहे. त्याशिवाय नाट्यगीतांच्या पारंपरिक चाली आणि संगीत या नाटकांनी आता झुगारून दिले आहे. त्याऐवजी उडच्या चालीच्या  हिंदी, मराठी चित्रपट संगीताला पसंती दिली आहे. त्यांची धून गावागावातील नाट्यरसिकांना परिचित असल्याने या गाण्यांना विशेष पसंती मिळू लागली आहे. क्वचितप्रसंगी शिट्टीही ऐकू येऊ लागली आहे. नाट्यपदे नाट्यकलाकारांनी म्हणण्याऐवजी त्यासाठी गायक, गायिकांना जागा कि बोर्ड वादकाशेजारी जागा आरक्षित झाली आहे. नाटकातील कलाकरांच्या वाट्याला केवळ ओठांची हालचाल करणेच हाती राहिले आहे.
कोल्हापूर परिसरात ऑर्केस्ट्राचे रुपांतर नाटकात होते. तसे काही कारवार परिसरात आता होऊ लागले आहे. नाटकांत वाद्यवृंदाचा शिरकाव होऊ लागला आहे. कारवारच्या जनतेच्या बदलच्या अभिरुचीचे हे लक्षण आहे. याचा प्रवास अंतिमतः कुठवर होईल हे आताच सांगता येणार नाही.
पण बेळगाव, भालकी, बिदर आणि कारवारसह महाराष्ट्र झालाच पाहिजे, याचे काय होणार हा त्याहून मोठा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment