Tuesday, July 23, 2013

महासागर माझा सखा!

सागराचे सौंदर्य आणि विविधता ही मानवाला मिळालेली देणगीच आहे. निसर्गाचा हा समतोल किती नाजूक आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी. अत्यंत नाजूक अशा पर्यावरण व्यवस्थेवर होणारे प्रतिकूल परिणाम किमान प्रमाणात राहतील अशा पद्धतीने आमच्या जीवन पद्धतीत बदल घडवून आणणे हाच संदेश आम्ही सागराकडून घेतला पाहिजे.
सागरी प्रदूषणाचा मानवी जीवनाशी थेट संबंध आहे. मानवासाठी उपलब्ध जल स्त्रोत्रांपैकी एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणून आज सागरजलाकडे पाहिले जाते. समुद्रजलावर सौरशक्ती प्रक्रिया करून ते पिण्यासाठी उपलब्ध करून एकमेव पर्याय आज जगातील बऱ्याच देशासमोर राहिला आहे. आज सहापैकी एका व्यक्तीला शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. भावी काळात हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नद्या अडवून प्रचंड मोठी धरणे उभारणे हे दिवसेंदिवस खर्चिक होत चालले आहे. त्यात पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याचा धोकाही जास्त असतो. म्हणून समुद्राचे पाणी खेचून प्रक्रियेद्वारे पुरवठा करणे अधिक स्वस्त आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर सागरांचे वाढते प्रदूषण हा कळीचा मुद्दा ठरला आहे. गेल्या तीस वर्षात तर प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येते. प्रमुख्याने तेल, सांडपाणी, कचरा, रसायने किरणोत्सर्गी पदार्थ वगैरे समुद्रात सोडल्यामुळे सागरी प्रदूषण वाढीस लागते. सागरी प्रदूषणामुळे तेथील सागरी जीवसंपत्तीवर विपरीत परिणाम होणे ओघानेच आलेच. हल्ली मृत मासे किनाऱ्यावर थडकण्याचे प्रमाणही वाढले आहे. 1944 पासून अणुशक्तीद्वारे वीजनिर्मिती आणि अण्वस्त्रे यांचे उत्पादन वाढले आहे. यातून निर्माण होणारा किरणोत्सर्गी पदार्थ मिश्रित कचरा समुद्रात फेकला जातो. आता यावर एका सर्वंकष कराराद्वारे बंदी आलेली असली तरी अशा छोट्या छोट्या घटना डोळ्याआड घडतच राहातात.
ते टाळण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी सागरी प्रदूषणाला आळा घालण्याच्या प्रयत्नात सामान्य माणसालाही हातभार लावता येईल. घरगुती पातळीवर रसायनांचा कमीत कमी वापर करावा. कमीत कमी सांडपाणी तयार होईल याची काळजी घ्यावी. कागदाचा वापर शक्‍यतो कमी करावा. रंगाचा वापर अधिक प्रमाणात करू नये. प्लास्टिकचा वापर टाळावा. इंधन वाचेल अशा प्रकारे गाडी चालवावी आदि अन्य प्रदूषण कमी करण्याचे उपाय हे समुद्री प्रदूषण आटोक्‍यात आणण्यास उपयुक्त ठरतात. कारण प्रदूषण कोणतेही असो, परंतु त्याचे दुष्परिणाम सारखेच असतात.
पृथ्वीचा दोन तृतीयांश भाग महासागराने व्यापला आहे. जीवनदायी पावसापासून जीवसंरक्षक औषधांपासून नित्याच्या भोजनात असलेल्या समुद्री अन्नापासून वाहतुकीच्या किफायतशीर सुविधांपासून ते आमच्या जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या प्राणवायूच्या पुरवठ्यापर्यंत मानवी जीवनातल्या सर्वच बाबतीत महासागर एक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. खरे तर मानवाच्या अस्तित्वासाठी महासागर ही निकडीची गरज आहे.
सागर संपत्तीदिनाच्या निमित्ताने सागराच्या जीवनदायी भूमिकेची पुन्हा एकदा जाणीव करून देण्याची ही संधी आहे. 10 वर्षापूर्वी रिओ- द जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वसुंधरा शिखर परिषदेत महासागर दिवस साजरा करण्याची कल्पना पुढे आली आणि त्यातून गेल्या दहा वर्षाच्या काळात सागरी संपत्तीबाबत फार मोठी लोकजागृती घडवून आणणे शक्‍य झाले आहे.
उपाहारगृहात उपलब्ध होणाऱ्या समुद्री अन्नाच्या मूळ स्त्रोताबाबतचा तपशील जाणून घेणे, गाडी धुताना किंवा झाडांना पाणी देताना पाण्याची बचत होईल याकडे लक्ष देणे, घरगुती स्वरूपातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, टाकाऊ पदार्थांचे नीट व्यवस्थापन करणे, त्यांचा पुन्हा पुन्हा उपयोग करणे किंवा त्यांचे कंपोस्ट खतांमध्ये रूपांतर करणे, वाहनांपासून होणारे प्रदूषण आटोक्‍यात ठेवणे, महासागरातील प्राणी जीवनाचे संरक्षण करणे, समुद्री पक्षी, कासवे, आणि त्यांच्या प्रजनन स्थळांचे संरक्षण करणे,किनारा स्वच्छता किंवा अशा प्रकारच्या अन्य सागर स्वच्छतेशी निगडित कार्यक्रमात सहभागी होणे आदी कार्यक्रमातूनही कोणीही सागराशी आपले नाते जोडू शकतो.
किनारा स्वच्छता कार्यक्रम हाती घेणे हा एक आनंददायी उपक्रम. अतिशय सोपा परंतु खूपच परिणामकारक. किनाऱ्यावर फेरफटका मारताना एका माणसाने किनाऱ्यावरची वस्तू उचलून तिची योग्य विल्हेवाट लावण्यापासून संपूर्ण समाजाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विशिष्ट लांबीच्या किनाऱ्याची स्वच्छता करण्यापर्यंत उपक्रम राबवता येईल. किनारा स्वच्छता हा उपक्रम केवळ सागरी किनाऱ्यावरच राबवावा असे मात्र नव्हे. एखाद्या तलावाच्या काठी, नदीच्या किनाऱ्यावर किंवा एखाद्या सामाईक अशा जलस्त्रोतांपासून वाहणारे पाणीच पुढे सागराला मिळत असते आणि म्हणून या स्त्रोतांची स्वच्छता ही देखील सागराच्या स्वच्छतेएवढीच महत्त्वाची आहे. महासागरांचे संरक्षण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. समस्या निर्माण करण्याच्या कामी जर आपण सर्वजण जबाबदार असू तर या समस्येच्या सोडवणुकीसाठी उपाय योजना राबविण्यातही आमच्या सर्वांचे योगदान आवश्‍यक आहे.

No comments:

Post a Comment