भाजपने आज गोव्यातील राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि येत्या काळातही ही पकड अधिक दृढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोव्यातील जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष हा प्रवास म्हणजे एका विचारसरणीचा, नेतृत्वशैलीचा आणि राजकीय संघटन कौशल्याचा वेध घेणारी कहाणी आहे.
गोव्यातील जनता पक्ष ते भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा केवळ पक्षवाढीचा प्रवास नाही, तर तो गोव्याच्या राजकीय मानसिकतेतील परिवर्तनाचा आरसाही आहे. १९७० च्या दशकात सुरू झालेला काँग्रेसविरोधाचा प्रवाह, ८० च्या दशकात भाजपच्या रूपाने आकार घेत गेला. मनोहर पर्रीकरांसारख्या नेतृत्वामुळे हा पक्ष केवळ राजकीय संघटना न राहता, एक विश्वासार्ह पर्याय म्हणून लोकांसमोर उभा राहिला. आज भाजप हा केवळ सत्ताधारी पक्ष नाही, तर भविष्यातील गोव्याच्या राजकारणात दीर्घकाळ टिकणारा एक प्रभावी घटक म्हणून दिसतो आहे.
गोव्यात भाजपाचा प्रवास हा संघर्षातून स्थैर्याकडे गेलेला आहे. १९८० च्या दशकात स्थानिक राजकारणात स्थान मिळवण्यासाठी धडपडणारा पक्ष, आज राज्याचा प्रमुख पक्ष बनला आहे. यामध्ये संघटनशक्ती, नेतृत्वातील सातत्य, स्थानिक प्रश्नांची जाण, आणि वेळोवेळी भूमिका बदलण्याची लवचिकता या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. स्व. मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व, केंद्रातील सत्तेची साथ, संघटनांच्या माध्यमातून समाजाशी जोडलेली नाळ, आणि विरोधकांतील फाटाफूट, साऱ्याचा परिणाम म्हणून गोव्यात भाजपाची सत्तास्थापना यशस्वी झाली आहे.
गोव्याचे राजकारण भारताच्या इतर राज्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे राहिले आहे. भारतात विलीन होण्याआधी पोर्तुगीज सत्तेखाली दीर्घ काळ राहिल्यामुळे गोव्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात पाश्चिमात्य प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मात्र १९६१ नंतर गोव्याने भारताच्या लोकशाही प्रवाहात पाऊल ठेवले आणि त्यानंतर इथले राजकारणही बदलायला लागले.
या राजकीय वाटचालीत १९७७ नंतर उदयास आलेल्या जनता पक्षाचा आणि पुढे त्याच्याच मूळातून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाचा (भाजप) एक वेगळा इतिहास आहे. गोव्यात सुरुवातीला या विचारसरणीला फारसा प्रतिसाद नव्हता. पण वेळोवेळी राजकीय बदल, नेतृत्वाच्या शैलीतील वेगळेपण आणि संघटनेच्या बळावर भाजपाने गोव्यात आपले अस्तित्व निर्माण केले. आज गोवा हा भाजपाचा एक महत्त्वाचा बालेकिल्ला मानला जातो.
भाजपने सध्या गोव्यात आपली मजबूत पकड राखली आहे. पण स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर समाधानकारक कृती न झाल्यास ही पकड सैल होऊ शकते. रोजगारनिर्मिती, पर्यटन नियोजन, जमीन हस्तांतरणाचे कायदे, आणि खाण व्यवसायाचे नियमन या क्षेत्रांत पक्षाकडून ठोस काम अपेक्षित आहे.
१९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी लागू केल्याने लोकशाही मूल्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र आले आणि ‘जनता पक्ष’ हा राष्ट्रीय स्तरावर तयार झाला. १९७७ मध्ये या नव्या पक्षाने केंद्रात काँग्रेसचा पराभव करून सत्ता मिळवली. गोव्यातही या लाटेचा परिणाम दिसून आला. त्यावेळी गोवा केंद्रशासित प्रदेश होता आणि येथील राजकारण प्रामुख्याने ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष’ आणि युनायटेड गोवन्स यांच्या भोवती फिरत होते. १९६३ मध्ये येथे पहिल्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्या काळात ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष’ आणि युनायटेड गोवन्स यांचा प्रमुख प्रभाव होता. मगोने मराठी भाषिक समाजाचा, तर युगोने ख्रिस्ती व शहरी जनतेचा पाठिंबा मिळवला होता.
जनता पक्षाने सुरुवातीला सगळीकडे थेट निवडणूक लढविण्यापेक्षा, काँग्रेसविरोधी भूमिकेतून एक पर्याय तयार करण्याचा प्रयत्न केला. १९७९ मध्ये तीन ठिकाणी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण यश मिळाले नाही. त्यांनी नाउमेद न होता काम सुरु ठेवले आणि गोव्यातील काही बुद्धिजीवी, समाजसुधारक व संघटनांतील कार्यकर्ते जनता पक्षाच्या कार्यप्रणालीकडे आकृष्ट झाले.
जनता पक्षाच्या आंतरिक मतभेदांमुळे त्याचे केंद्रातील सरकार फार काळ टिकले नाही. विविध विचारधारांचे लोक एकत्र येऊन तयार झालेला हा पक्ष फार काळ एकसंध राहू शकला नाही. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या नेत्यांना पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले गेले.
१९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, भैरोंसिंह शेखावत आदी नेत्यांनी मिळून 'भारतीय जनता पक्ष' (भा.ज.प.) स्थापन केला. भाजपाने “गांधीवादी समाजवाद” आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आग्रह धरला. प्रारंभी त्याला फारसा यश लाभले नाही, पण संघटनेचे मजबूत जाळे आणि निष्ठावान कार्यकर्ते यामुळे पक्षाची घडी मजबूत होत गेली.
सामाजिक स्तरावर स्थान!
गोव्यात मात्र भाजपाची सुरुवात अंमळ संथ झाली. काँग्रेस, मगो आणि स्थानिक पक्ष यांच्या वर्चस्वात भाजपाला स्थान निर्माण करणे, हे आव्हान होते. सुरुवातीच्या दशकात भाजपाचे काम मुख्यतः संघाच्या कार्यकर्त्यांवर आधारित होते. १९८० नंतर भाजपाचा गोव्यातील खरा पाया बांधण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका होती. संघाचे कार्यकर्ते ग्रामीण भागात, विशेषतः हिंदू बहुल भागात आपले सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य सुरू ठेवून होते. त्यातूनच पुढे भाजपाला कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळे तयार करता आले. संघाच्या माध्यमातून शिक्षण, सेवाकार्य, धार्मिक उत्सवांचे आयोजन यांचा उपयोग करत भाजपाने हळूहळू सामाजिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले. याला राजकीय रूपांतर देण्याचे काम १९९० नंतर सुरू झाले.
पर्रीकर ः मजबूत चेहरा
१९९० नंतर भाजपाने गोव्यात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात भाजपाच्या राष्ट्रवादी विचारसरणीला चालना मिळाली. त्याच दरम्यान
काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि मगोच्या कमकुवत होत चाललेल्या पकडीतून भाजपाला संधी मिळाली. या दशकात मनोहर पर्रीकर या नेतृत्वाने गोव्यात भाजपाला एक मजबूत चेहरा दिला. आयआयटी ग्रॅज्युएट असलेल्या पर्रीकरांनी संघाच्या कार्यपद्धतीतून आलेली शिस्त, जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, स्वच्छ प्रतिमा आणि प्रशासनातील कल्पकता या गुणांमुळे भाजपाचे अस्तित्व समाजात दृढ केले. त्यांची शैली पारंपरिक नेत्यांपेक्षा वेगळी होती, जी विशेषतः युवा वर्गाला भावली.
भाजपची प्रतिमा...
गोव्यातील ख्रिस्ती समाज पारंपरिकतः काँग्रेसकडे झुकलेला होता. पण मनोहर पर्रीकर यांच्या काळात भाजपने त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न केले. शिक्षण, सुरक्षा आणि ख्रिस्ती समाजाच्या श्रद्धास्थळांप्रती आदर या गोष्टींमुळे भाजपाची प्रतिमा थोडी सुधारली. यंत्रणा भाजपने आधुनिक प्रचारतंत्राचा प्रभावी वापर करून तरुण मतदारांपर्यंत संपर्क प्रस्थापित केला आहे. व्हॉटसॲप गट, फेसबुक पेज, आणि स्थानिक भाषेतील प्रभावी संदेशांमुळे भाजपची पोहोच वाढली. त्याचवेळी तरुण नेत्यांना पुढे आणून त्यांनी ‘नवे गोवा’ या आशयावर काम केले. त्याचे दूरगामी सकारात्मक आजवर दिसून येत आहेत.
स्थानिक प्रश्नांवर लक्ष
१९९४ च्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पहिल्यांदाच चार जागा जिंकल्या. विशेषतः मनोहर पर्रीकर यांचा राजकारणातील प्रवेश हा भाजपासाठी निर्णायक ठरला. आयआयटी ग्रॅज्युएट असलेले पर्रीकर एक वेगळ्या प्रतिमेचे नेते होते. अभ्यासू, सडेतोड, तांत्रिक ज्ञान असलेले आणि संघटनेशी निष्ठावान. त्यांनी आपला मतदारसंघ (पणजी) मजबूत केला आणि भाजपासाठी शहरी, सुशिक्षित वर्गात एक नवा आधार तयार केला. पर्रीकरांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. पाणी, कचरा, शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाची प्रतिमा ‘सामाजिक काम करणारा पक्ष’ म्हणून तयार होऊ लागली.
पर्रीकर मुख्यमंत्री बनले!
२००० मध्ये मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले आणि भाजपासाठी हा एक मैलाचा दगड ठरला. भाजपाच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक घटना होती. ही सत्ता फार काळ टिकली नाही, पण भाजपाला यानंतर निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका मिळत गेली. २००२ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आला. त्यांनी राज्यातील प्रशासनात पारदर्शकता आणली, भ्रष्टाचाराला थोपवले आणि शिक्षण, पायाभूत सुविधा यावर भर दिला. यानंतर भाजपाची राज्यात भरभराट सुरू झाली. काँग्रेसमध्ये अस्थिरता वाढत गेली आणि अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत गेले. पर्रीकरांनी पक्षवाढीसोबतच समाजातील विविध घटकांमध्ये भाजपाच्या विचारसरणीचा प्रसार केला. त्यांनी हिंदुत्वाचा उघड प्रचार न करता, विकासाच्या अजेंड्यावर भर दिला. २०१२ मध्ये भाजपाने बहुमत मिळवले आणि पुन्हा सत्ता मिळवली. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री होऊन गेले तरीही राज्यात भाजपाचे वर्चस्व कायम राहिले.
सर्वसमावेशक पक्ष
२०१२ च्या निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले. यामध्ये एक विशेष गोष्ट घडली. भाजपाने अनेक ख्रिस्ती उमेदवारांना उमेदवारी दिली आणि काही जण विजयीही झाले. यामुळे गोव्यात भाजप केवळ हिंदूंचा पक्ष राहिला नाही, तर सर्वसमावेशक पक्ष म्हणून उभा राहिला. "सर्वांच्या विश्वासाने विकास" हे पर्रीकरांचे धोरण इथे यशस्वी ठरले. या काळात भाजपाची ओळख एक सक्षम आणि शिस्तबद्ध पक्ष अशी झाली. भाजपाचे कार्यकर्ते गावपातळीवर उतरून जनतेशी जोडले गेले. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि राज्यात पर्रीकरांचे नेतृत्व या दुहेरी परिणामामुळे भाजपाची गोव्यातील ताकद बळकट झाली.
अखेर बहुमत सिद्ध!
पर्रीकर यांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक धोरण, गुंतवणूक आकर्षित करणे, पर्यटनाचा विकास यावर भर दिला. त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणली आणि भ्रष्ट्राचारविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे गोव्याच्या जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढू लागला. ते दिल्लीत गेल्यानंतर २०१७ च्या निवडणुकांमध्ये भाजप बहुमतापर्यंत पोहोचला नाही. पण त्यांनी मगो, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. पर्रीकर परत मुख्यमंत्री झाले, पण त्यांचे आरोग्य ढासळले आणि २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर भाजपपुढे नेतृत्वाचं मोठं आव्हान निर्माण झाले. तरीही भाजपाने आपले संघटन मजबूत ठेवले आणि केंद्रातील सत्तेचा प्रभाव वापरून राज्यात पकड घट्ट केली. डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करून भाजपने नेतृत्वात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला. २०२२ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, मगो अशा विविध पक्षांमुळे विरोधकांचे मत विभाजित झाले. भाजपाने २० जागा जिंकून पुन्हा सत्ता स्थापन केली. भाजपाने पुन्हा एकदा अपक्ष आणि मगोला आपल्याकडे वळवले आणि बहुमत सिद्ध केले.
एक मजबूत पक्ष
गोव्यात आज भाजप हा एक मजबूत पक्ष म्हणून उभा आहे. स्थानिक पातळीवर भाजपाने आपली संघटन रचना बळकट केली आहे. हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास याचा समतोल राखून पक्षाने आपली पकड टिकवली आहे. गोवा, आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि समृद्ध संस्कृतीसाठी ओळखले जाणारे राज्य, त्याच्या राजकीय इतिहासातही अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा साक्षीदार राहिले आहे. पोर्तुगीज सत्तेखालून मुक्त झाल्यानंतरच्या काळात, गोव्याच्या राजकारणात विविध पक्षांचे उदय आणि अस्त झाले. भाजपने मात्र आपली घोडदौड कायम राखली आहे. सत्तेवर आल्यानंतर भाजपाने विकास प्रकल्प, पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, तसेच शिक्षण आणि आरोग्य यावर काम सुरू ठेवले. विरोधकांनी भाजपावर “सत्तेसाठी काहीही” अशी टीका केली, पण भाजपाची पकड कायम राहिली आहे. भाजपचा "संघटनात्मक काटेकोरपणा", "नेत्यांची तत्परता", व "सत्तेसाठी आवश्यक आघाड्या उभ्या करण्याची क्षमता" हे मुद्दे आजवरच्या वाटचालीत महत्वाचे ठरले आहेत.