AVIT BAGLE
Friday, September 4, 2026
भाजपची धोरणात्मक माघार की केवळ तात्पुरती उसंत?
Friday, August 21, 2026
राजकारणात महिलांचे स्थान काय?
भारतीय न्यायपालिका इतिहास घडवणार आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना सप्टेंबर २०२७ मध्ये भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनतील आणि ५५ व्या सरन्यायाधीश म्हणून त्या शपथ घेतील. त्यांचा कार्यकाळ केवळ छत्तीस दिवसांचा असेल, पण त्या पहिल्या महिला सरन्यायाधीश ठरतील. भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकही महिला या सर्वोच्च पदावर पोहोचलेली नाही.
हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे न्याय देणारी यंत्रणा असलेल्या न्यायपालिकेत या देशाला महिला सरन्यायाधीश मिळण्यासाठी ७९ वर्षे जावी लागली आहेत. यावरूनच महिलांचे या पुरुषसत्ताक पद्धतीत किती गौण स्थान आहे याची कल्पना येऊ शकते. ही सारी व्यवस्था ठरवणारी राजकीय व्यवस्थाही महिलांच्या हाती आलेली नाही. आजही अभावानेच एखादी महिला राजकीय उच्च स्थानावर पोचलेली दिसते.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने शशिकला काकोडकर यांच्या रुपाने राज्याला पहिल्या मुख्यमंत्री दिल्या तरी त्यांची ओळख भाऊंच्या कन्या अशीच होती हे कोणीही नाकारणार नाही. त्यामुळे भाऊंच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद चालून आले. त्यानंतर आजवर कोणीही महिला स्वकर्तृत्वानेही त्या पदापर्यंत पोचू शकलेली नाही. सध्याच्या १२ सदस्यीय मंत्रिमंडळातही एकाही महिलेला स्थान मिळत नाही यावरून महिलांचे नेमके स्थान काय हे समजून येते. नारी वंदनेच्या नावाने कितीही कंठशोष करण्यात येत असला तरी त्याने ही वस्तुस्थिती बदलत नाही.
ताळगावच्या दिवंगत आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे पती बाबूश हे मंत्री आहेत. पर्येच्या आमदार दिव्या राणे यांचे पती विश्वजित हेही मंत्री आहेत. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचे पती मायकल हेही आमदार व माजी मंत्री आहेत. या साऱ्यावरून महिलांची राजकीय वाट कोणाच्यातरी आधारावर अवलंबून आहे असा निष्कर्ष काढण्यास जागा आहे.
राजकारणात महिलांचा वावर आता नवा राहिलेला नाही. सभा असो, मेळावा असो, मोर्चा असो किंवा आंदोलन असो, महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसते. पक्षाच्या कार्यक्रमांना गर्दी जमवायची असेल तर महिलांना आवर्जून सहभागी करून घेतले जाते. घोषणा द्यायच्या असतील, मोर्चा काढायचा असेल किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करायचे असेल, तेथे महिलांची संख्या लक्षणीय असते. मात्र या गर्दीपासून निर्णय घेण्याच्या टेबलापर्यंत पोहोचण्याचा महिलांचा प्रवास अजूनही अपुरा आहे. राजकारणातील महिलांचे हेच वास्तव आजही अस्वस्थ करणारे आहे.
महिलांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते; पण त्यांना निर्णय प्रक्रियेत समान स्थान दिले जाते का, हा खरा प्रश्न आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका, निवडणूक रणनीती ठरविणाऱ्या समित्या, उमेदवार निश्चित करणाऱ्या समित्या किंवा पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किती आहे, याचा विचार केला तर चित्र फारसे समाधानकारक दिसत नाही. महिलांना कार्यक्रमांमध्ये व्यासपीठ मिळते, भाषणे करण्याची संधी मिळते; पण पक्षाच्या भवितव्याचा निर्णय घेणाऱ्या बंद खोलीतील चर्चेत त्यांचा आवाज किती ऐकला जातो, हा प्रश्न कायम आहे.
निवडणुकीच्या काळात तर महिलांच्या राजकीय सहभागाचे वेगळेच चित्र दिसते. मतदारसंघात महिला उमेदवार उभा करण्याची वेळ आली की तिची राजकीय क्षमता, सामाजिक काम किंवा संघटनात्मक अनुभव यापेक्षा तिच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी अधिक महत्त्वाची ठरते. विशेषतः पती राजकारणात प्रभावी असेल, पक्षात वजन असेल किंवा मतदारसंघावर त्याचा प्रभाव असेल तर पत्नीला उमेदवारी देण्याचा मार्ग सहज खुला होतो. अन्यथा राजकारणात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या, पक्षासाठी संघटन उभी करणाऱ्या महिलांकडेही दुर्लक्ष केले जाते. म्हणजेच महिला स्वतंत्र राजकीय शक्ती म्हणून नव्हे, तर एखाद्या प्रभावशाली पुरुषाच्या राजकीय वारशाचा विस्तार म्हणून पाहिली जाते, अशी भावना निर्माण होते.
यामागे केवळ राजकीय पक्षांची मानसिकता जबाबदार आहे असेही म्हणता येणार नाही. समाजाची पुरुषप्रधान मानसिकताही त्याला तेवढीच कारणीभूत आहे. महिला राजकारणात सक्रिय झाली की तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा अधिक होते. एखादा पुरुष रात्री उशिरापर्यंत बैठका घेतो, मतदारसंघात फिरतो किंवा सतत राजकीय दौरे करतो, तेव्हा त्याला समर्पित नेता म्हटले जाते. महिला तेच करते तेव्हा तिच्या कुटुंबाकडे कोण पाहते, असा प्रश्न विचारला जातो. राजकारणात पुरुषांसाठी असलेली कसोटी आणि महिलांसाठी असलेली कसोटी अजूनही वेगळी आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर महिला निवडून आल्या. त्यामुळे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात महिलांचा प्रवेश वाढला, हे नाकारता येणार नाही. मात्र काही ठिकाणी निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींच्या कारभारात त्यांच्या कुटुंबातील पुरुषांचा हस्तक्षेप असल्याच्या तक्रारीही पुढे येतात. महिलांना केवळ पदावर बसविणे पुरेसे नाही; त्या पदाचा अधिकार स्वतंत्रपणे वापरण्याची संधी आणि आत्मविश्वास देणे अधिक महत्त्वाचे आहे.
राजकारणातील महिलांची संख्या वाढविणे हा केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न नाही, तर लोकशाहीच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे. महिलांना शिक्षण, आरोग्य, पाणी, सुरक्षितता, रोजगार, कुटुंबकल्याण यांसारख्या विषयांचा प्रत्यक्ष अनुभव असतो. त्यामुळे धोरणनिर्मितीत त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र महिलांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवून त्यांच्या नावावर महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणे म्हणजे केवळ औपचारिकता ठरते.
आता राजकीय पक्षांनी महिलांना गर्दी जमविण्याचे साधन म्हणून पाहण्याची मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. पक्षाच्या प्रत्येक महत्त्वाच्या समितीत सक्षम महिलांना स्थान मिळाले पाहिजे. उमेदवारी देताना तिच्या पतीचे किंवा कुटुंबाचे राजकीय वजन नव्हे, तर तिची स्वतःची क्षमता, जनसंपर्क, सामाजिक काम आणि नेतृत्वगुण विचारात घेतले पाहिजेत. महिलांनीही राजकारणात आपली जागा मागण्याऐवजी ती निर्माण करण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांच्या प्रवासानंतर देशाने अनेक क्षेत्रांत मोठी प्रगती केली. महिलांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांत स्वतःचे स्थान निर्माण केले. मग राजकारणात मात्र त्यांना समान संधी मिळण्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागणार? महिलांचा राजकीय सहभाग हा केवळ मोर्चातील संख्या किंवा सभेतील गर्दीपुरता मर्यादित राहणार की निर्णय घेणाऱ्या टेबलावरही त्यांना समान जागा मिळणार, याचे उत्तर आता राजकीय पक्षांनी द्यायला हवे. महिलांना टाळ्यांसाठी नव्हे, तर निर्णयासाठी पुढे आणले तरच राजकारण खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी होईल.
Monday, July 20, 2026
तरुणांचा उद्रेक... सत्तेला इशारा!
दिल्लीच्या रस्त्यांवर आज उसळलेला संताप हा केवळ एका मागणीचा किंवा एका आंदोलनाचा आवाज नाही; तो देशातील वाढत्या अस्वस्थ तरुणाईचा धगधगता उद्रेक आहे. रोजगाराची अनिश्चितता, भरती प्रक्रियेतील विलंब, परीक्षा व्यवस्थेवरील संशय, वाढती महागाई आणि भविष्याबाबतची असुरक्षितता या सगळ्याचा साचलेला राग आता रस्त्यावर उतरू लागला आहे. आंदोलनाला केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून दडपण्याचा प्रयत्न झाला, तर तो सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दूरदृष्टीच्या अभावाचे लक्षण ठरेल.
Saturday, June 27, 2026
विश्वासाशिवाय शहरीकरण नको !
गोव्यातील ५६ गावांना शहरी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. सहा वर्षांपूर्वी काढलेली अधिसूचना तीव्र विरोधानंतर सरकारने मागे घेतली होती. आता पंचायत संचालनालयाने संबंधित ग्रामपंचायतींकडून पुन्हा अभिप्राय मागविला होता. जनमताच्या रेट्यामुळे तो निर्णय मागे घेतला आहे. हा केवळ प्रशासकीय पत्रव्यवहार नाही; तर गावांचे भवितव्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्व आणि गोव्याच्या विकासाच्या दिशेचा प्रश्न आहे. त्यामुळे या विषयावर सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने आणि पारदर्शकपणे पावले उचलणे आवश्यक आहे.
Monday, June 15, 2026
रस्त्यांवर विकास नव्हे, मृत्यूची शर्यत!
Thursday, November 13, 2025
विश्वासाचे चलन आणि आरोपांची नाटके
राजकारणात व शासनव्यवस्थेत कधी कधी असे प्रसंग येतात की, सत्य व खोटं, प्रामाणिकपणा व बनावटपणा, या दोहोंमध्ये फरक करणे कठीण होते. सध्या गोव्यात पूजा नाईक या नावाने पुन्हा एकदा अशीच गोंधळलेली हवा निर्माण झाली आहे. सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी तब्बल सोळा कोटी रुपये एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला व सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्याला दिल्याचा तिचा दावा आहे. गेल्या वर्षी याच महिलेने मुख्यमंत्र्यांना भेटून हाच विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिला पोलिसांच्या हवाली केलं. आता वर्षभरानंतर ती पुन्हा त्याच आरोपांचा सूर लावू लागली आहे.प्रश्न असा निर्माण होतो की, अशा व्यक्तीवर किती विश्वास ठेवावा? आरोप गंभीर आहेत, पण तेवढेच संशयास्पदही आहेत. कोणत्याही सामान्य नागरिकाला, शासनव्यवस्थेला आणि माध्यमांनाही एखादी व्यक्ती किती प्रमाणात खरे बोलते हे ठरवण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात. पूजा नाईक यांच्या बाबतीत मात्र आरोपांचा गदारोळ जास्त आणि पुराव्यांचा अभाव मोठा आहे.एखादी व्यक्ती इतक्या मोठ्या रकमेत व्यवहार करू शकते, एवढेच नव्हे तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकते, हे स्वतःच अनेक प्रश्न उपस्थित करते. सरकारी नोकरीसाठी ‘खरेदी-विक्री’सारखा व्यवहार होतो, अशी लोकांमध्ये असलेली शंका नक्कीच समाजासाठी धोक्याची घंटा आहे. परंतु प्रत्येक वेळी अशा आरोपांमुळे संपूर्ण व्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात ओढणे योग्य नाही.
मुख्यमंत्र्यांनी तिला पोलिसांच्या हवाली केले, हे स्वतःच सूचक आहे. शासनाने ही बाब निष्पक्षपणे तपासली, परंतु ठोस पुरावे न सापडल्यानेच विषय थंडावला. आता पुन्हा आरोपांचा धूर उडवून स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. माध्यमांसमोर येऊन काही नावे उडवणे सोपे असते, परंतु त्या नावांमागे पुरावे, व्यवहाराची साखळी, दस्तऐवज, बँक व्यवहार, साक्षीदार यांचा आधार नसल्यास ते केवळ लोकांचे लक्ष वेधण्यासाठीचा प्रपंच ठरतो.या प्रकरणाचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे लोकांच्या विश्वासाचा गैरवापर. आजच्या काळात कुणीही सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमांमध्ये येऊन आरोप करतो आणि काही दिवसांपुरता समाज त्यावर चर्चा करतो. नंतर सत्य काहीही असो, पण लोकांच्या मनात प्रशासनाबद्दल संशय निर्माण होतो. शासन, अधिकारी वर्ग आणि राजकारण यांच्याबद्दल अविश्वासाचे बीज पेरले जाते. अशा बिनबुडाच्या दाव्यांमुळे खऱ्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याचेही नुकसान होते.
विश्वास हा समाजाचा अदृश्य पाया आहे. एखाद्याने त्याचा उपयोग वैयक्तिक प्रसिद्धीसाठी केला, तर ती समाजासमोरची सर्वात मोठी फसवणूक ठरते. पूजा नाईक यांच्या आरोपांमागे जर काही तथ्य असेल, तर त्यांनी ठोस पुरावे सादर करावेत; अन्यथा लोकांच्या भावनांशी खेळ केल्याचा त्यांच्यावरच आरोप होईल. शासन व पोलिस यंत्रणेला या प्रकरणात संयम, परंतु ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे — कारण जनतेचा विश्वास परत मिळवणे हेच सगळ्यात कठीण कार्य असते.
आज प्रत्येक नागरिकाचे मन विचारते – कोणावर विश्वास ठेवावा? एकीकडे भ्रष्टाचाराचे सावट आहे, तर दुसरीकडे आरोपांची उधळण. लोकशाहीच्या आरोग्यासाठी दोन्ही टोकांपासून बचाव करणे गरजेचे आहे. कोणत्याही आरोपाला आंधळेपणाने बळी पडू नये आणि पुरावे असतील तरच सत्य उजेडात आणावे, ही जबाबदारी माध्यमांचीही आहे.
सत्य हे संयमाचे मूल आहे. भावनांच्या भरात किंवा प्रसिद्धीच्या मोहात कोणीही आरोपांची फेकाफेक करतो, तेव्हा लोकांचा विश्वास तुटतो. आणि जेव्हा विश्वास हरवतो, तेव्हा समाजाचा गाभाच हादरतो. त्यामुळे अशा प्रत्येक घटनेवर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे हेच सुशिक्षित समाजाचे लक्षण आहे.
पूजा नाईक प्रकरणाकडे म्हणूनच राजकीय नव्हे तर सामाजिक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. आरोप खरे असतील तर कारवाई व्हावीच; पण खोटे असतील तर अफवा पसरवणाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे. कारण, शासनाची प्रतिष्ठा आणि समाजाचा विश्वास या दोन्ही गोष्टी कोणत्याही व्यक्तीच्या नाटकी दाव्यांपेक्षा मोठ्या आहेत.
Saturday, April 5, 2025
भाजपचा प्रवास ः संघर्षातून स्थैर्याकडे!
भाजपने आज गोव्यातील राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि येत्या काळातही ही पकड अधिक दृढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोव्यातील जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष हा प्रवास म्हणजे एका विचारसरणीचा, नेतृत्वशैलीचा आणि राजकीय संघटन कौशल्याचा वेध घेणारी कहाणी आहे.
गोव्यातील जनता पक्ष ते भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा केवळ पक्षवाढीचा प्रवास नाही, तर तो गोव्याच्या राजकीय मानसिकतेतील परिवर्तनाचा आरसाही आहे. १९७० च्या दशकात सुरू झालेला काँग्रेसविरोधाचा प्रवाह, ८० च्या दशकात भाजपच्या रूपाने आकार घेत गेला. मनोहर पर्रीकरांसारख्या नेतृत्वामुळे हा पक्ष केवळ राजकीय संघटना न राहता, एक विश्वासार्ह पर्याय म्हणून लोकांसमोर उभा राहिला. आज भाजप हा केवळ सत्ताधारी पक्ष नाही, तर भविष्यातील गोव्याच्या राजकारणात दीर्घकाळ टिकणारा एक प्रभावी घटक म्हणून दिसतो आहे.
गोव्यात भाजपाचा प्रवास हा संघर्षातून स्थैर्याकडे गेलेला आहे. १९८० च्या दशकात स्थानिक राजकारणात स्थान मिळवण्यासाठी धडपडणारा पक्ष, आज राज्याचा प्रमुख पक्ष बनला आहे. यामध्ये संघटनशक्ती, नेतृत्वातील सातत्य, स्थानिक प्रश्नांची जाण, आणि वेळोवेळी भूमिका बदलण्याची लवचिकता या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. स्व. मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व, केंद्रातील सत्तेची साथ, संघटनांच्या माध्यमातून समाजाशी जोडलेली नाळ, आणि विरोधकांतील फाटाफूट, साऱ्याचा परिणाम म्हणून गोव्यात भाजपाची सत्तास्थापना यशस्वी झाली आहे.
गोव्याचे राजकारण भारताच्या इतर राज्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे राहिले आहे. भारतात विलीन होण्याआधी पोर्तुगीज सत्तेखाली दीर्घ काळ राहिल्यामुळे गोव्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात पाश्चिमात्य प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मात्र १९६१ नंतर गोव्याने भारताच्या लोकशाही प्रवाहात पाऊल ठेवले आणि त्यानंतर इथले राजकारणही बदलायला लागले.
या राजकीय वाटचालीत १९७७ नंतर उदयास आलेल्या जनता पक्षाचा आणि पुढे त्याच्याच मूळातून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाचा (भाजप) एक वेगळा इतिहास आहे. गोव्यात सुरुवातीला या विचारसरणीला फारसा प्रतिसाद नव्हता. पण वेळोवेळी राजकीय बदल, नेतृत्वाच्या शैलीतील वेगळेपण आणि संघटनेच्या बळावर भाजपाने गोव्यात आपले अस्तित्व निर्माण केले. आज गोवा हा भाजपाचा एक महत्त्वाचा बालेकिल्ला मानला जातो.
भाजपने सध्या गोव्यात आपली मजबूत पकड राखली आहे. पण स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर समाधानकारक कृती न झाल्यास ही पकड सैल होऊ शकते. रोजगारनिर्मिती, पर्यटन नियोजन, जमीन हस्तांतरणाचे कायदे, आणि खाण व्यवसायाचे नियमन या क्षेत्रांत पक्षाकडून ठोस काम अपेक्षित आहे.
१९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी लागू केल्याने लोकशाही मूल्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र आले आणि ‘जनता पक्ष’ हा राष्ट्रीय स्तरावर तयार झाला. १९७७ मध्ये या नव्या पक्षाने केंद्रात काँग्रेसचा पराभव करून सत्ता मिळवली. गोव्यातही या लाटेचा परिणाम दिसून आला. त्यावेळी गोवा केंद्रशासित प्रदेश होता आणि येथील राजकारण प्रामुख्याने ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष’ आणि युनायटेड गोवन्स यांच्या भोवती फिरत होते. १९६३ मध्ये येथे पहिल्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्या काळात ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष’ आणि युनायटेड गोवन्स यांचा प्रमुख प्रभाव होता. मगोने मराठी भाषिक समाजाचा, तर युगोने ख्रिस्ती व शहरी जनतेचा पाठिंबा मिळवला होता.
जनता पक्षाने सुरुवातीला सगळीकडे थेट निवडणूक लढविण्यापेक्षा, काँग्रेसविरोधी भूमिकेतून एक पर्याय तयार करण्याचा प्रयत्न केला. १९७९ मध्ये तीन ठिकाणी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण यश मिळाले नाही. त्यांनी नाउमेद न होता काम सुरु ठेवले आणि गोव्यातील काही बुद्धिजीवी, समाजसुधारक व संघटनांतील कार्यकर्ते जनता पक्षाच्या कार्यप्रणालीकडे आकृष्ट झाले.
जनता पक्षाच्या आंतरिक मतभेदांमुळे त्याचे केंद्रातील सरकार फार काळ टिकले नाही. विविध विचारधारांचे लोक एकत्र येऊन तयार झालेला हा पक्ष फार काळ एकसंध राहू शकला नाही. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या नेत्यांना पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले गेले.
१९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, भैरोंसिंह शेखावत आदी नेत्यांनी मिळून 'भारतीय जनता पक्ष' (भा.ज.प.) स्थापन केला. भाजपाने “गांधीवादी समाजवाद” आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आग्रह धरला. प्रारंभी त्याला फारसा यश लाभले नाही, पण संघटनेचे मजबूत जाळे आणि निष्ठावान कार्यकर्ते यामुळे पक्षाची घडी मजबूत होत गेली.
सामाजिक स्तरावर स्थान!
गोव्यात मात्र भाजपाची सुरुवात अंमळ संथ झाली. काँग्रेस, मगो आणि स्थानिक पक्ष यांच्या वर्चस्वात भाजपाला स्थान निर्माण करणे, हे आव्हान होते. सुरुवातीच्या दशकात भाजपाचे काम मुख्यतः संघाच्या कार्यकर्त्यांवर आधारित होते. १९८० नंतर भाजपाचा गोव्यातील खरा पाया बांधण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका होती. संघाचे कार्यकर्ते ग्रामीण भागात, विशेषतः हिंदू बहुल भागात आपले सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य सुरू ठेवून होते. त्यातूनच पुढे भाजपाला कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळे तयार करता आले. संघाच्या माध्यमातून शिक्षण, सेवाकार्य, धार्मिक उत्सवांचे आयोजन यांचा उपयोग करत भाजपाने हळूहळू सामाजिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले. याला राजकीय रूपांतर देण्याचे काम १९९० नंतर सुरू झाले.
पर्रीकर ः मजबूत चेहरा
१९९० नंतर भाजपाने गोव्यात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात भाजपाच्या राष्ट्रवादी विचारसरणीला चालना मिळाली. त्याच दरम्यान
काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि मगोच्या कमकुवत होत चाललेल्या पकडीतून भाजपाला संधी मिळाली. या दशकात मनोहर पर्रीकर या नेतृत्वाने गोव्यात भाजपाला एक मजबूत चेहरा दिला. आयआयटी ग्रॅज्युएट असलेल्या पर्रीकरांनी संघाच्या कार्यपद्धतीतून आलेली शिस्त, जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, स्वच्छ प्रतिमा आणि प्रशासनातील कल्पकता या गुणांमुळे भाजपाचे अस्तित्व समाजात दृढ केले. त्यांची शैली पारंपरिक नेत्यांपेक्षा वेगळी होती, जी विशेषतः युवा वर्गाला भावली.
भाजपची प्रतिमा...
गोव्यातील ख्रिस्ती समाज पारंपरिकतः काँग्रेसकडे झुकलेला होता. पण मनोहर पर्रीकर यांच्या काळात भाजपने त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न केले. शिक्षण, सुरक्षा आणि ख्रिस्ती समाजाच्या श्रद्धास्थळांप्रती आदर या गोष्टींमुळे भाजपाची प्रतिमा थोडी सुधारली. यंत्रणा भाजपने आधुनिक प्रचारतंत्राचा प्रभावी वापर करून तरुण मतदारांपर्यंत संपर्क प्रस्थापित केला आहे. व्हॉटसॲप गट, फेसबुक पेज, आणि स्थानिक भाषेतील प्रभावी संदेशांमुळे भाजपची पोहोच वाढली. त्याचवेळी तरुण नेत्यांना पुढे आणून त्यांनी ‘नवे गोवा’ या आशयावर काम केले. त्याचे दूरगामी सकारात्मक आजवर दिसून येत आहेत.
स्थानिक प्रश्नांवर लक्ष
१९९४ च्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पहिल्यांदाच चार जागा जिंकल्या. विशेषतः मनोहर पर्रीकर यांचा राजकारणातील प्रवेश हा भाजपासाठी निर्णायक ठरला. आयआयटी ग्रॅज्युएट असलेले पर्रीकर एक वेगळ्या प्रतिमेचे नेते होते. अभ्यासू, सडेतोड, तांत्रिक ज्ञान असलेले आणि संघटनेशी निष्ठावान. त्यांनी आपला मतदारसंघ (पणजी) मजबूत केला आणि भाजपासाठी शहरी, सुशिक्षित वर्गात एक नवा आधार तयार केला. पर्रीकरांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. पाणी, कचरा, शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाची प्रतिमा ‘सामाजिक काम करणारा पक्ष’ म्हणून तयार होऊ लागली.
पर्रीकर मुख्यमंत्री बनले!
२००० मध्ये मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले आणि भाजपासाठी हा एक मैलाचा दगड ठरला. भाजपाच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक घटना होती. ही सत्ता फार काळ टिकली नाही, पण भाजपाला यानंतर निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका मिळत गेली. २००२ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आला. त्यांनी राज्यातील प्रशासनात पारदर्शकता आणली, भ्रष्टाचाराला थोपवले आणि शिक्षण, पायाभूत सुविधा यावर भर दिला. यानंतर भाजपाची राज्यात भरभराट सुरू झाली. काँग्रेसमध्ये अस्थिरता वाढत गेली आणि अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत गेले. पर्रीकरांनी पक्षवाढीसोबतच समाजातील विविध घटकांमध्ये भाजपाच्या विचारसरणीचा प्रसार केला. त्यांनी हिंदुत्वाचा उघड प्रचार न करता, विकासाच्या अजेंड्यावर भर दिला. २०१२ मध्ये भाजपाने बहुमत मिळवले आणि पुन्हा सत्ता मिळवली. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री होऊन गेले तरीही राज्यात भाजपाचे वर्चस्व कायम राहिले.
सर्वसमावेशक पक्ष
२०१२ च्या निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले. यामध्ये एक विशेष गोष्ट घडली. भाजपाने अनेक ख्रिस्ती उमेदवारांना उमेदवारी दिली आणि काही जण विजयीही झाले. यामुळे गोव्यात भाजप केवळ हिंदूंचा पक्ष राहिला नाही, तर सर्वसमावेशक पक्ष म्हणून उभा राहिला. "सर्वांच्या विश्वासाने विकास" हे पर्रीकरांचे धोरण इथे यशस्वी ठरले. या काळात भाजपाची ओळख एक सक्षम आणि शिस्तबद्ध पक्ष अशी झाली. भाजपाचे कार्यकर्ते गावपातळीवर उतरून जनतेशी जोडले गेले. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि राज्यात पर्रीकरांचे नेतृत्व या दुहेरी परिणामामुळे भाजपाची गोव्यातील ताकद बळकट झाली.
अखेर बहुमत सिद्ध!
पर्रीकर यांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक धोरण, गुंतवणूक आकर्षित करणे, पर्यटनाचा विकास यावर भर दिला. त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणली आणि भ्रष्ट्राचारविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे गोव्याच्या जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढू लागला. ते दिल्लीत गेल्यानंतर २०१७ च्या निवडणुकांमध्ये भाजप बहुमतापर्यंत पोहोचला नाही. पण त्यांनी मगो, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. पर्रीकर परत मुख्यमंत्री झाले, पण त्यांचे आरोग्य ढासळले आणि २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर भाजपपुढे नेतृत्वाचं मोठं आव्हान निर्माण झाले. तरीही भाजपाने आपले संघटन मजबूत ठेवले आणि केंद्रातील सत्तेचा प्रभाव वापरून राज्यात पकड घट्ट केली. डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करून भाजपने नेतृत्वात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला. २०२२ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, मगो अशा विविध पक्षांमुळे विरोधकांचे मत विभाजित झाले. भाजपाने २० जागा जिंकून पुन्हा सत्ता स्थापन केली. भाजपाने पुन्हा एकदा अपक्ष आणि मगोला आपल्याकडे वळवले आणि बहुमत सिद्ध केले.
एक मजबूत पक्ष
गोव्यात आज भाजप हा एक मजबूत पक्ष म्हणून उभा आहे. स्थानिक पातळीवर भाजपाने आपली संघटन रचना बळकट केली आहे. हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास याचा समतोल राखून पक्षाने आपली पकड टिकवली आहे. गोवा, आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि समृद्ध संस्कृतीसाठी ओळखले जाणारे राज्य, त्याच्या राजकीय इतिहासातही अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा साक्षीदार राहिले आहे. पोर्तुगीज सत्तेखालून मुक्त झाल्यानंतरच्या काळात, गोव्याच्या राजकारणात विविध पक्षांचे उदय आणि अस्त झाले. भाजपने मात्र आपली घोडदौड कायम राखली आहे. सत्तेवर आल्यानंतर भाजपाने विकास प्रकल्प, पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, तसेच शिक्षण आणि आरोग्य यावर काम सुरू ठेवले. विरोधकांनी भाजपावर “सत्तेसाठी काहीही” अशी टीका केली, पण भाजपाची पकड कायम राहिली आहे. भाजपचा "संघटनात्मक काटेकोरपणा", "नेत्यांची तत्परता", व "सत्तेसाठी आवश्यक आघाड्या उभ्या करण्याची क्षमता" हे मुद्दे आजवरच्या वाटचालीत महत्वाचे ठरले आहेत.