Saturday, October 1, 2011

जिथे सागरा सरिता मिळते..!

पणजी हे गोवा सरकारच्या मालकीचे बंदर. मांडवी नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर उभ्या राहणाऱ्या बोटीत खनिज माल चढविण्याची दृश्‍ये कित्येकदा पणजीतूनही दिसतात. या बंदराला मुरगाव पोर्ट ट्रस्टने हरकत घेतली आहे. पणजी बंदराला धक्का नाही, येथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही. सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना नाही असे म्हणूनएमपीटीने पणजी बंदरालाच आक्षेप घेतला आहे. हे बंदर फक्त कागदावरच अस्तित्वात आहे असेही एमपीटीचे म्हणणे आहे. या नदीच्या मुखाशी जाण्याची संधी भारतीय नौदलाच्या सौजन्याने मला मिळाली होती.
छोट्या नौकेला मीटर अर्धा मीटर वरखाली फेकणाऱ्या लाटा, जवळून जाणाऱ्या मोठाल्या बार्ज, दूरवर दिसणारे राजभवन आणि ठिपक्‍यागत दिसणारे पणजी शहर हे वर्णन आहे मांडवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगम स्थळाचे. दोनापावलच्या राजभवनाला पाण्यात समांतर असे हे ठिकाण आहे. नदीचे मुखही असेही नाव या भागाला आहे. मुंबई ते कोची जलमार्गावरील नौदलाच्या नौकानयन मोहीम पाहण्याच्या निमित्ताने या भागाला मी भेट दिली होती. दुपारी कडक उन्हात नौदलाच्या आयएनएस मांडवी या अकादमीच्या छोट्या नौकेतून वेरे बेती येथील बोट क्‍लबकडून निघताना नदीचे वरवर शांत वाटणारे पात्र एवढे खोड्या काढणारे असेल याची सुतराम कल्पना आली नाही. नौका निघाली तर नदीच्या पलीकडील काठावर पूर्वी नदी परिवहन खात्याचे कार्यालय होते तो परिसर ठळकपणे दिसत होता. हळूहळू नौकेच्या चालकाने वेग वाढविला आणि लाटा व नौका यांचा पाठशिवणीचा खेळच जणू सुरू झाला. लाटांच्या हेलकाव्याने खालीवर होणारी नौका क्षणातच लाटांवर स्वार होत पुढे जात होती. हळूहळू पणजी शहर मागे पडत गेले नि पर्यटकांनी सदा गजबजलेल्या मिरामारचा किनारा नजरेच्या टप्प्यात आला. आपणाला कोणी पाहत नाही अशा स्थितीत मिरामार परिसरात गप्पागोष्टींसाठी बसलेले पाण्यातून कसे दिसतात याचेही दर्शन घडले. दुसऱ्या बाजूला वेरे बेती आणि त्यापुढील नेरुलच्या परिसरात किनारी भागात लोकांच्या चाललेल्या हालचाली दिसत होत्या.नौका पुढे पुढे सरकत गेली आणि दोनापावलच्या राजभवनाच्या इमारतीचे दर्शन घडले. त्याचे लाल छप्पर ठळकपणे नजरेत भरत होते. दुसऱ्या बाजूला आयएनएस मांडवी या नौदल अकादमीतील इमारतीही दिसू लागल्या होत्या. दीक्षांत संचलनासाठी उपस्थित राहण्यासाठी गेल्या दशकभरात अनेकदा अकादमीत जाण्याचा योग आला होता. तेथून परतताना मांडवीतून जा ये करणाऱ्या नौकांचे दर्शनही घडत होते. आता मात्र नदीतून अकादमी कशी दिसते हे पाहण्याची संधी मिळाली. त्याचेही लाल छप्पर राजभवनाच्या छप्पराची आठवण करून देणारे. मांडवी नदी अरबी समुद्रास मिळते ते ठिकाण म्हणजे नदी की सागर याचा थांग लागणे कठीण. त्याच स्थितीत हेलकावे खात नौकेतून चारही दिशेला नजर टाकल्यावर दोन्ही बाजूला दूरवर ठिपक्‍यागत मानवी वस्ती दिसत होती. किनाऱ्यालगत काय हालचाली सुरू आहेत हे स्पष्टपणे दिसत नव्हते. पणजीतील उंच इमारती मात्र दिसत होत्या. मिरामार आणि दोनापावल भागात गेल्या पाच वर्षात उभ्या राहिलेल्या इमारतीही दिसत होत्या. दूरवर अंधूकपणे मुरगाव बंदर दिसत होते. बंदरात नांगरलेल्या नौकांचे आकार तेवढे दिसत होते. बित्रा या युद्धनौकेभोवती आमच्या नौकेचे प्रदक्षिणा घालणे सुरू ठेवले होते. नौका एका जागी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ती लाटांमुळे वरखाली होत होती, वाऱ्यामुळे उडणारे तुषार खाऱ्या पाण्याचे अस्तित्व नको तितके दाखवून देत होते. त्यातच सूर्याच्या तिरप्या किरणांमध्ये इंद्रधनुष्य दिसत असल्याचा शोध कुणीतरी लावला आणि काही वेळ इंद्रधनुष्य शोधण्यात गेला. नौका वर्तुळाकार फिरती ठेवल्याने चारही दिशांचा परिसर डोळ्यासमोर येऊन जात होता. अखेर नौदलाच्या मोहिमेस सुरवात झाली नि परतीचा प्रवास सुरू झाला. काहीवेळातच ठिपक्‍यागत दिसणारी पणजी डोळ्यासमोर मोठी होत गेली आणि वेरे बेतीच्या बोट क्‍लबवर केव्हा नौका नांगरली गेली हेच कळले नाही.

Sunday, September 11, 2011

पोलिस समाज एक नाते

गोवा पोलिसांनी 11 सप्टेंबरला सिंघम चित्रपट पाहिला. सिंघम चित्रपटातील तडफदार पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका गोव्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी वठवावी अशी अपेक्षा पोलिस दलाचे प्रमुखांची आहे. त्यांची अपेक्षापूर्ती होईल की नाही हे आताच सांगणे अवघड आहे.
गुन्हा घडला की पोलिसांनी काय केले याची मोठी उत्सुकता असते. काही दिवसांनी वर्तमानपत्रातही तपासकाम थंडावल्याची बातमी येते. त्यानिमित्ताने खासगीत का होईना पोलिस अधिकाऱ्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. पोलिसांना आपल्या खबऱ्यांचे जाळे विणण्यात आलेले अपयश याचेच हे निदर्शक आहे.  महानगरात पोलिस बऱ्यापैकी खबऱ्यांवर अवलंबून असतात. बऱ्याचवेळी कुप्रसिद्ध गुंड आणि शार्प शूटर यांच्याशी पोलिसांच्या झालेल्या चकमकी या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित होत्या यावरून खबऱ्यांचे महत्त्व निश्‍चितपणे अधोरेखित होते. गोव्यात पोलिसांना माहिती मिळवताना बराच त्रास होतो वा माहितीच मिळत नाही यावरून खबरे नाहीत वा त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद नाही असा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात ते तसे नाही. एसएस (सिक्रेट सर्विस) नावाने ओळखली जाणारा निधी या दलाकडे असतो. त्याचा प्रभावी वापर कसा करायचा हे त्या त्या स्थानकप्रमुखाचे काम असते. त्यावरच माहिती मिळविण्यासाठीचा स्रोत किती भक्कम की दुबळा हे ठरत असते. आपण पाहतो की अमका एक अधिकारी तपास करतो म्हणजे गुन्हेगारापर्यंत पोलिसांचे हात पोचतील असा सर्वसामान्यांना विश्वास वाटू लागतो. ही सारी खबऱ्यांची किमया. ज्याचे खबरे समर्थ तो यशस्वी पोलिस अधिकारी असे समीकरण आहे. समाजाचा चेहरा बदलत असताना विशेषतः येथे जगभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीत हवी ती नेमकी व्यक्ती शोधण्यासाठी वा एखाद्या पर्यटनस्थळी घडलेल्या गुन्ह्याची तातडीची माहिती मिळविण्यासाठी खबऱ्यांवर अवलंबून राहणे केव्हाही सोयीचे. समाजानेही माहिती देण्यासाठी पुढे यावे यासाठी पोलिस स्थानकातील अधिकारी आणि त्या परिसरातील जनता याचे नाते सौदार्हाचे असावे लागते. (प्रत्यक्षात ते सापा मुंगुसाचेही असू शकते नव्हे थोडेफार तसेच असते) मगच घटनेमागची कारणमीमांसा करणे पोलिसांना सोपे जाते. पोलिसांनी आरोपपत्र ठेवलेल्या बऱ्याचशा संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते. जनता आणि पोलिस यांचे चांगले संबंध असतील तर जबानी देण्यासाठी अनेकजण पुढे येतात. पूरक माहिती आणि पुरावे गोळा करण्यात मदतही करतात. समाजाने हात दुमडून पोलिस काय ते करतील अशी भूमिका घेतली तर पोलिस तपासकामात फारशी प्रगती करू शकणार नाहीत. मागे गोव्यात पोलिसांनी "नेबरहूड पोलिस' ही सिंगापूरी संकल्पना स्वीकारली होती. त्याचे पुढे काय झाले हे पोलिसांनाच माहीत. सर्वसामान्य नको ती पोलिस ठाण्याची पायरी असे का म्हणतो याचा कधीतरी वरिष्ठ पोलिसांनी विचार जरूर करावा. पोलिसांनी पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाकडे संशयाने बघणे सोडले तर बऱ्याचशा समस्या सुटू शकतील. अपघात झाल्यावर पहिली माहिती देणाऱ्याला विविध प्रश्‍न विचारून भंडावून सोडण्याची प्रवृत्ती त्यागली पाहिजे. तरच समाज पोलिसांचे नाक, कान, डोळे बनतील.तपासकामाची पारंपरिक पद्धतही मागे पडल्याची जाणीव पोलिसांना व्हायला हवी. पोलिस कोठडीतील चौकशी दरम्यान काही कारणाने संशयितांने दिलेला जबाब न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही हे लक्षात घेतले पाहिजे. तेथे पुराव्यांची सूत्रबद्ध मांडणी आणि साक्षी विचारात घेतल्या जातात. त्यामुळे गुन्हा दाखल झाला की संशयिताला कर अटक ही संकल्पना मागे पडल्याचे भान आता ठेवायला हवे. तसे न करताही पुरावे गोळा करण्याकडे जास्त लक्ष पुरविल्यास खटला भक्कमपणे न्यायालयात टिकू शकतो. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात जबानीसाठी तयार करण्यावरही लक्ष केंद्रित करून संशयिताला शिक्षा होण्यास पोलिस भाग पाडू शकतात. न्यायालयात एकाला शिक्षा झाली की त्याचा आपोआप संदेश समाजात जातो, त्याजोगे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते. पण पोलिस हे लक्षात कधी घेणार?

Wednesday, August 3, 2011

मरण दिसले समोर

बातमीदारीच्या व्यवसायात जगात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अलीकडे कमालीची वाढली आहे. त्या तोडीचा अनुभव येथील आम्हा पत्रकारांना येत नसला तरी मरण समोर दिसण्याचे अनेक प्रसंग येतात. कधी तरी त्याची बातमी होते तर कधी ते मनाच्या कप्प्यात राहून जातात. 19 डिसेंबर गोवा मिुक्तदिन. सर्वांसाठी तसा तो सुटीचा दिवस. आम्हा पत्रकारांना त्या दिवशी कुठे सहलीला जाण्याऐवजी काही तरी विधायक करायचे वेध लागतात. मी आणि गोमन्तक टाइम्सचे सहायक संपादक पॉल फर्नांडिस यांनी 19 डिसेंबर 2005 ला खानापूरच्या जंगलात जायचे ठरविले. म्हादईचा उगम याच जंगलात होतो. तेथे बेकायदा खाणकाम सुरू झाल्याची माहिती मिळाल्याने त्या सुटीचा उपयोग याचा पर्दाफाशसाठी करण्याची कल्पना आली. गोमन्तकची गाडी घेऊन आम्ही निघालो. चालक प्रकाश पेडणेकर हेही सोबत होते.बेळगाव येथील पयार्वरणीय संस्थेचे श्रीहरी कुकजी आम्हाला नेमकी ठिकाणे दाखवणार होते. देगावजवळील तळेवाडी येथे खाणकाम आणि वनौषधींसाठी जंगलतोड होत होती. यामुळे जलस्त्रोतांना धोका पोचून म्हादईवर परिणाम होणार असे बातमीचे संभाव्य चित्र आमच्या डोळ्यासमोर होते. कुकजी आम्हाला खानापुरात भेटले. जेमतेम एकच चारचाकी गाडी जाऊ शकेल अशा खडकाळ रस्त्याने आम्ही घनदाट जंगलात विसेक किलोमीटरवरील तळेवाडी येथे पोचलो. तेथील गैरव्यवहारांकडे कुकजी यांनी वनखात्याने लक्ष वेधल्याने स्थानिक त्यांच्याविरोधात होते. त्यामुळे ते गाडीतच दडून बसले होते.आम्ही हळूहळू माहिती गोळा करत होतो. छुपेपणाने खनिजमाल साठवणुकीची छायाचित्रेही मी टिपली. एवढ्यात गाडीत बसलेल्या कुकजी यांच्याकडे लोकांचे लक्ष गेले व त्यांना आम्ही नेमके कशासाठी आलो याचा पत्ता लागला. एव्हाना दुपारचा एक वाजला होता.त्यांनी गाडीला घेराव घातला. गाडीसमोर दगड रचून रस्ता बंद केला. कुकजी याला ताब्यात द्या अशी त्यांची एकमुखी मागणी होती. तसे केल्यास कुकजी याला ते ठार मारतील याविषयी जराही शंका नव्हती. त्यातील काहीजण कंत्राटदाराला बोलावून मारेकरी आणण्यासाठी शेजारील गावात एका दुचाकीवरून गेले. ते परतण्याचा दुपारी चार वाजेपर्यंत पत्ता नव्हता. गाडीसमोर दगड रचल्याने आम्ही पळून जाण्याचा संभव नसल्याने ती गर्दी हळूहळू गाडीपासून दूर गेली. आमच्याशी त्यांच्या गप्पाही सुरू झाल्या. तेवढ्यात संधी साधून कुकजी यांनी जंगलात धूम ठोकली. त्यांच्यामागे अनेकजण लागले. सायंकाळचे साडेपाच वाजू लागले होते आणि जंगलात अंधारूनही येऊ लागले होते. हवा तो कुकजी पळाला आम्ही थांबून तरी काय करू असा युक्तिवाद मी व पॉल यांनी करणे सुरू केले. त्या शिष्टाईला यश आले नि सव्वा सहा वाजता आम्ही निघालो. त्या स्थानबद्धतेत घालविलेल्या क्षणाक्षणाला मरण समोर दिसणाऱ्या पाच तासांनी जीवनात मिळविलेले स्थान कधीही ढळणार नाही.

Thursday, July 28, 2011

आठवणीतले तारकर्ली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचे वारे वाहू लागले आहे. त्या संधीचा फायदा खऱ्या अर्थाने तारकर्ली गावाने घेतला आहे. तारकर्लीत घराघरात लॉजिंग व्यवसाय सुरू झाल्याने जिल्ह्यात तारकर्ली पर्यटनाच्या बाबतीत "मॉडेल व्हिलेज' म्हणून उभे राहिले आहे. मालवणपासून 15 किलोमीटरवर असलेल्या या गावाने जिभेवर घर केले आहे.तेथे रमेश मिठबावकर यांच्या घरगुती खानावळीत एकदा जेवलेला माणूस पुन्हा तेथे जाण्यासाठी केवळ निमित्त शोधत असतो. मी गेल्या चार वर्षांत अनेकदा मालवणला गेलो पण मिठबावकरांकडचे जेवण जेवल्याशिवाय दौरा पूर्ण झाला नाही. तारकर्ली पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर झळकत आहे. तेथे आज घराघरात पर्यटनाचे वारे पोहोचले आहे. तारकर्लीत प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे वायरीपासूनच रस्त्यानजीक प्रत्येक घरात फलक दिसतो, "तो इथे राहण्याची व जेवणाची सोय आहे' असाच. पूर्वी या भागातील लोकांचा व्यवसाय मच्छीमारी हा होता; परंतु लोकांनी आता पर्यटन हा पूरक व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे. पर्यटनामुळे या भागात बऱ्यापैकी रोजगारनिर्मिती झाली आहे. तारकर्लीसारख्या छोट्या गावात असलेली लॉजिंगची सोय पर्यटकांनाही सुखावते. तारकर्लीच्या टोकास एमटीडीसीने तंबू निवास उभारले आहेत. त्याच पद्धतीचे तंबू निवास आता खासगी तत्त्वावरही उभे राहिले आहेत. त्यामुळेच तारकर्लीत अगदी दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतच्या राहण्याच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. एका बाजूने कर्लीची खाडी आणि दुसऱ्या बाजूने अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या देवबाग-तारकर्ली गावावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. नारळी पोफळीच्या बागा, सुरूचे बन आणि त्यात भर टाकणारा स्वच्छ समुद्रकिनारा! येथे येणाऱ्या पर्यटकाला या सगळ्याची भुरळ पडते. मालवण ते देवबाग या पंधरा किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक तंबू निवास आहेत. अगदी कमी पैशांत ते पर्यटकांची राहण्या- जेवण्याची सोय करतात. समुद्रातील स्कूबा डायव्हिंगच्या पर्यटनासाठीच्या वापरापाठोपाठ आता केरळच्या धर्तीवर हाउसबोट पर्यटनालाही सुरुवात झाली आहे. दत्तप्रसन्न कुलकर्णीसोबत या भागात फिरताना मी माहिती संग्रहीत करणे सुरूच ठेवले होते. आजही मला तारकर्ली म्हटली की सारे तपशील त्याचमुळे आठवू शकतात. डॉल्फिन दर्शन, कोकणचा विहंगम किनारा, देवबागचा संगम हे सर्व पाहण्यासाठी खाडीतूनच लज्जतदार मालवणी जेवणाचा आस्वाद घेत पर्यटक जाऊ शकतात. हे असे चित्र असले तरी तारकर्ली नदीचा बहुतांश भाग गाळाने बुजत चालला आहे. पावसाळ्यात तारकर्ली नदीला येणाऱ्या डोंगराकडील पाण्यामुळे नदीचे पात्र रुंदावून किनाऱ्याचा दुतर्फा भाग नदी गिळंकृत करीत आहे. तारकर्ली नदीमध्ये यापूर्वी बारमाही खोल पाणी असायचे, परंतु गेली कित्येक वर्षे या नदीच्या आणि खाडीच्या पात्रामध्ये साचलेल्या गाळामुळे छोट्या होड्यांना ये-जा करणे मुश्‍कील झाले आहे. शिवाय या खाडीपात्रामध्ये मिळणाऱ्या मासळीचे प्रमाणही घटले आहे. नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ भरल्याने तारकर्ली-कोरजाई तारीसाठी प्रवाशांना अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. येथे असलेल्या नैसर्गिक बेटामुळे होडीवाल्यांना या बेटाला वळसा घालून कोरजाईपलीकडे बंदरात जावे लागते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस "किंग्ज गार्डन' येथे रंगीबेरंगी मासे, शेवाळ, शुद्ध पाणी, खडके पाहण्यासारखी आहेत. चिवला बीच या ठिकाणच्या "कोरल गार्डन'चे सौंदर्यही पर्यटकांना निश्‍चितच आनंद देणारे आहे. तारकर्ली येथील "सरग्यासम पॉइंट' येथे प्रवाळे, कोरल, आकर्षक असे मासे या ठिकाणी आहेत. देवबाग येथील "लगून पॉइंट' हे खाडीच्या बाजूने असून, एका बाजूस खडके तर दुसऱ्या बाजूस मासे या ठिकाणी तिन्ही बाजूंनी शुभ्र वाळू आहे. यासाठी तारकर्लीत स्कूबा डायविंगची सोय आहे हे विशेष महत्त्वाचे.

Wednesday, June 8, 2011

आकाशविहार अन्‌ समुद्रावर नजर...!

किनारी भागातील जीवन कमालीचे बदलले आहे. मुळात क्रॉंक्रिटच्या जंगलाच्या दिशेने गोव्याच्या किनाऱ्यांची वाटचाल पूर्णत्वाला गेली आहे, त्याच्या जोडीला काही कारणांनी का होईना किनारे काळंवडत चालले आहेत. नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून परतताना हे दृश्‍य दिसले.सुमारे दीडशे सागरी मैलावर आतवर मासेमारी नौका काडेपेटीगत दिसत होत्या. एकीकडे ट्रॉलरची संख्या वाढल्याचे चर्चा सुरू असतानाच खोल समुद्रात आतवर अभावानेच एखादी नौका दिसे. किनाऱ्यापासून तिसेक मैलावर नौकांची गर्दी दिसली. पुढे आल्यावर माणसांची गर्दी उसळलेला पण काळवंडत जाणारा किनारा दिसला. दूरवर ठिपक्‍यागत वस्तीही दिसू लागली होती. मुंबई या युद्धनौकेच्या डेकवरून दुपारी हेलिकॉप्टरने उड्डाण केले त्यावेळी माझ्यासोबत मुंबईच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न जनसंपर्क अधिकारी आलोक मिश्रा होते. पहाटे जाताना हेलिकॉप्टर प्रवासाचा थरार ढगाळ हवामान आणि अंधाराने हिरावून घेतला होता. त्यामुळे साहजिकच दुपारच्या प्रवासाची मला प्रतीक्षा होती. दुपारी सव्वा दोन वाजता हेलिकॉप्टर उडाले नि आता उडी ठोकून पळ काढावा का असा माझ्या मनात विचार आला. चेतक या हेलिकॉप्टरला एकच इंजिन असते ही माहिती याच नको त्या वेळी मला आठवली. त्यातच हेलिकॉप्टरला दोन्ही बाजूला दरवाजे नाहीत. त्यामुळे कंबरेला बांधलेल्या दोन इंच रुंद पट्ट्याचा काय तो आधार. वर पकडायला काय आहे का याची अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनीच मी पाहणी केली. एका बाजूला पकडण्यासाठी असलेल्या पट्टा पकडण्यासाठी बाजूला सरकणे भाग होते. तसे करणे शक्‍यच नव्हते. एक तर वर जाताना हेलिकॉप्टर धडधडत होते. वाऱ्याचा दाब शरीराला जाणवत होता.त्यातच चारशे फुटावर हेलिकॉप्टर आल्यावर पायलटने ते पुढे दामटले.नजर सरावली असली तरी खोल समुद्रात पडल्यास काय होईल हा विचार मनातून जात नव्हता. गळ्यात लाइफ जॅकेट अडकवलेले होते. त्यातच या प्रवासाआधी निघताना नौदलाने अपघात झाल्यास नौदलाला जबाबदार धरणार नाही असा बॉण्ड लिहून घेतला होता. त्याचे विचारही मनात येत होते. दूरवर निळाशार समुद्र दिसत असताना सरावात सहभागी नौकांची मला पाहणी करता यावी म्हणून नौकांच्या ताफ्याभोवती पायलटने प्रदक्षिणा घातली. प्रत्यक्षात अवाढव्य दिसणाऱ्या नौका चारशे फुटावर कशा किरकोळ दिसतात हे पाहता आले. त्याचबरोबर वरून खालची नेमकी गोष्ट पाहणे कसे कठीण असते याचा प्रत्ययही आला. चालकाने आता निघू अशी हातानेच खूण केली आणि हेलिकॉप्टर दूरवर क्षितिजावर न दिसणाऱ्या किनाऱ्याच्या दिशेने घेतले.वाटेत मासेमारी करणारी मोठी नौका पाहण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर एका जागी स्थिर केल्यागत केले. तो नेमके काय सांगत होता हे वाऱ्यामुळे नेमकेपणाने माझ्यापर्यंत पोचत नव्हते. त्याच्या तोंडाच्या दिशेने कान करण्यासाठी बसल्याजागी काही अंशात हलण्याचीही माझ्या मनाची तयारी नव्हती. पुढे आल्यावर नौकांची गर्दी दिसली. किनाराही दिसू लागला. किनाऱ्यावरचा माणसांचा समुद्र पाहून हे गोवा आहे हे सांगावे लागले नाही. किनाऱ्याच्या एका कोपऱ्यात ट्रॉलर पाण्यातून बाहेर काढणे सुरू असल्याचे दृश्‍य सेकंदभर दिसले. किनाऱ्यालगत उभ्या राहिलेल्या इमारतींनी मोकळी जागाच सोडली नसल्याचे कटू सत्यही पाहता आले, पुढे वास्कोत शहर असे अस्ताव्यस्त पसरले आहे हेही पाहता आले मुख्य म्हणजे हंस या नौदलतळावर उतरण्याआधी विमाने ठेवण्यास जराही जागा नसलेला दाबोळी विमानतळ पाहता आला.

Wednesday, May 11, 2011

कोझिकोड, अल्वाये, कोची, कोवालम

कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील खुदाईवर लक्ष ठेवणाऱ्या कंपनीतील अभियंता अब्राहम वार्के याच्या लग्नाच्या निमित्ताने केरळमध्ये राहण्याचा व भटकण्याचा योग आला होता. खऱ्या अर्थाने कालीकतला भटकलो ते सॉटर डिसोझासह. जानेवारीत कन्याकुमारीला जाताना सॉटर माझ्यासोबत होता. वाटेत कालिकतला थांबावे असे ठरले. आम्हाला वास्को द गामाने पहिला पाय ठेवला ती जागा बघायची होती. शहरापासून पंचवीस किलोमीटरवरील त्या जागेकडे गेलो तर तेथे पुरुषभर उंचीचा एक स्तंभ दिसला. स्थानिकांनी सांगितले की पूर्वी स्तंभ असलेल्या जागेवर समुद्राने अतिक्रमण केल्याने आजवर तीनदा स्तंभाची उभारणी केल्याचे सांगितले.कालिकतला मिळणारे मासे व उकडा भात आणि जेवणानंतर चघळायला देण्यात येणारा काळा हलवा कधीच विसरला न जाणारा असा होता. पण भावली ती रेल्वे स्थानकावरील स्वच्छता. कट्टर कम्युनिस्ट असलेल्या प्रा. एन. शोबिंद्रन यांच्याशी म्हणूनच मी रेल्वेच्या प्रतीक्षालयात अनेक विषयांवर दोन तास वाद घालू शकलो. तेथे स्वच्छतेची वेळ झाली की स्वच्छतागृहे सर्वांसाठी बंद केली जातात. दर चार तासांनी तसे केले जाते. यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.वार्केचे घर कोट्टायमजवळ एका बेटावर आहे. तेथे जाण्यासाठी फेरीबोट पकडून ये असा त्याचा निरोप. मी गोव्यात जशी फेरीबोट असते तशा फेरीबोटीची प्रतीक्षा कुमन्नम येथे अर्धा दिवस केली. अखेरीस एकाला विचारले त्या वेळी ट्रॉलरवजा बोटीलाच फेरीबोट म्हणतात असा साक्षात्कार झाला. पुढे घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत काळ्या चहाने करतात हाही धक्का बसला. त्याच्या घराभोवती असलेल्या पाण्यातून एकमेकांकडे जाण्यासाठीही छोट्या होड्यांचा वापर कसा केला जातो इथपासून जीप आणण्यासाठी दोन होड्यांच्या मध्ये फळ्या रचून तराफा कसा केला जातो हेही पाहता आले.कोची येथे इंडियन एक्‍सप्रेसमधला माझा मित्र मनु पबी याच्यासह फोर्ट कोची भागात ताजे मासे पकडून ते लगेच तळून कसे दिले जातात याचे प्रात्यक्षिक अनुभवले. पुढे गोमन्तक टाइम्समधील ऍण्ड्य्रू परेरा याच्यासह भटकंती करताना अल्वाये येथे हाउसबोटीच्या व्यवसायाचे अंतरंगही न्याहाळता आले. तीन वर्षांच्या मुलांना नदीत पोहायला शिकविणारे धाडसी लोकही तेथेच पाहता आले. मोठ्या बोटीवरील खोल्या ते वातानुकूलित रेस्टॉरंट व खोल्या असा हाउस बोटीचा प्रवास झाला आहे.गेल्या दशकातील केरळ आणि आजचे केरळ यात बराच बदल झाला आहे. 1994 ते 98 पर्यंत गावागावात कौलारू घरे दिसत. क्वचित एखादा उघडाबंब माणूस फक्त लुंगीवर दिसे. आज लुंगी टिकून असली तरी घरे मात्र बदलू लागली आहे. कॉंक्रिटीकरणाचे वारे पोचले आहे. पूर्वी लुंगीवर कुठेही जाण्यास मुभा होती. ते प्रतिष्ठेचे लक्षणही मानले जात होते. पण गेल्यावर्षी युवा वर्गाने पॅन्टला आणि त्यातील फॅशनलाही पाठिंबा दिल्याचे दिसले. स्वस्तात काजूगर पुरविण्याची किमया केरळने साधली आहे, कष्टाळू अशा केरळी समाजाला त्याला बुद्धीची जोड देत राज्य विकासपथावर नेले आहे. साक्षरतेचे प्रमाण केरळमध्ये जास्त असले तरी स्थानिक मल्याळम वगळता इतर भाषा न येण्याने होणारे तोटे कुठल्या पारड्यात टाकले जाणार?कनार्टकाला लागून असलेल्या अझीमला येथे नौदलाची अकादमी उभी राहत आहे. वेरे बेती येथील नौदल अकादमी तेथे हलविली जाणार असे जाहीर झाल्याने तेथे भेट न देणे शक्‍यच नव्हते. अकादमी दोन डोंगराच्या मधल्या भागात विस्तारली आहे. या दोन डोंगरांचा उल्लेख वास्को द गामाच्या प्रवास वर्णनात आहे. संरक्षणदृष्ट्याही टेहळणीसाठी ती मोक्‍याची जागा असल्याने तेथे अकादमी होणे हा निव्वळ योगायोग नव्हे. सध्या संचलन मैदान, मुख्य प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले असून प्रशिक्षणार्थींच्या वसतीगृहाची इमारत उभी राहत आहे. केरळच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या तिरुअनंतपुरम येथे सुती टॉवेल फार स्वस्त मिळतात. त्याही पुढे असलेल्या कोवालमला तर जगात उपलब्ध असणारे सर्वकाही मिळते. फक्त तिथे सध्या कॉंक्रिटचे जंगल उभे राहिले आहे इतकेच.

Monday, May 2, 2011

गोपुरी आश्रम

1999 मध्ये कणकवलीत असताना एक दिवस अमरसिंह घोरपडे नावाचे माझे सहकारी मला वागदे या तीन किलोमीटरवरील गावी असलेला गोपुरी आश्रम दाखविण्यास घेऊन गेले. तेथे प्रा. राजेंद्र मुंबरकर या तिशीतील तरुणाचा परिचय झाला. मुंबरकर कणकवली महाविद्यालयात ग्रामीण विकास विषय शिकवतात. आता ते पीएचडी मिळवून प्रा. चे डॉ. मुंबरकरही झाले, तरी आमची मैत्री त्याच पातळीवर कायम आहे. मुंबरकर यांनी तेथील गोशाळा, शेती फिरून दाखविली. त्या वेळी या आश्रमाच्या व्यवस्थापनाचा ताबा एक दिवस माझ्याकडे येईल अशी पुसटशी कल्पना देखील माझ्या मनाला शिवली नाही. समाजवादी चळवळीशी असलेली जवळीक त्यासाठी उपयोगी ठरली. जयवंत मठकर, गणपत सावंत, रमाकांत आर्ते, गोविंदराव शिंदे दादा यांना मी कणकवलीत आल्याचे कळले. एकदा मठकरकाका आले नि माझ्या जानवलीतील खोलीतील सर्व साहित्य गोपुरीतील विश्रामगृहात हलविण्याचा जणू आदेशच दिला. त्यानंतर मला व्यवस्थापन समितीवर कायम निमंत्रित असे स्थान देण्यात आले. दैनंदिन व्यवस्थापनात माझा शब्द अखेरचा ठरू लागला. तेथे असताना संस्था फायद्यात आणण्याची किमया सर्वांच्या मदतीने साधली. नर्सरी सुरू केली. नर्सरी प्रशिक्षण वर्ग सुरू केला. खतविरहीत ताजी भाजी मोठ्या प्रमाणावर मिळण्यासाठी प्रयत्न केले. गणपत पाटील यांच्या मदतीने उसाची शेती केली. केळीच्या नव्या जातींची लागवड केली. जुनाट पंप बदलून नवा जादा अश्‍वशक्तीचा पंप बसविला. अप्पासाहेबांच्या या कार्याची साक्ष देत गोपुरी आश्रम आजही कणकवलीनजीक वागदे येथे कार्यरत आहे. कोकण गांधी म्हणून ओळखले जाणारे अप्पासाहेब 1922 मधील द्विपदवीधर. इंग्रजांच्या त्या आमदनीत त्यांना प्रशासनात उच्च अधिकाराची नोकरी करणे सहज शक्‍य होते; पण त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. 1930 ला महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला, तर अप्पासाहेबांनी सिंधुदुर्गातील शिरोडा येथे हा सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या चिरस्थायी विकासाचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पटवर्धन यांनी आपल्या मायभूूमीची वाट धरली. कणकवलीनजीक वागदे गावात त्यांचे सहकारी मित्र प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या सहकार्याने 18 एकर टाकावू जमिनीवर 5 मे 1948 रोजी गोपुरी आश्रम या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. केवळ संकल्पना न मांडता आपले विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. युरोपियन देशातील उच्च राहणीमान अप्पांनी अनुभवले होते. भारतीय लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे हे धोरण त्यांनी अवलंबिले. गोरगरीब लोकांना परवडतील, असे शौचालय बांधण्याचे प्रयोग त्यांनी केले. सोन खतापासून उत्तम खत निर्माण होते हेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी उभारलेली मॉडेल्स आजही गोपुरी येथे पाहायला मिळतात. गोबरगॅस आणि त्यावर जेवण शिजविण्याचा त्यांचा प्रयोग म्हणजे सुरवातीला आक्रीतच वाटले. उत्तम बायोगॅस निर्माण करता येऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी कणकवलीतील छात्रालय येथे "मैला गॅसप्लॅन्ट' उभारला. अप्पांनी ग्रामीण ऊर्जा व स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेक प्रयोग केले. धवल क्रांतीची कोकणात सुरवात व्हावी यासाठी संकरित गायी आणल्या. पुण्याहून चारा आणला. फलोत्पादन, शेतीचे नवे प्रयोग, पेरू, केळी, आंबा, यावर वेगवेगळे प्रयोग, मसाले पिकांची लागवड त्यांनी स्वतः केली व शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. आजही गोपुरीत अनेक प्रयोग सुरू आहेत. काजू सरबताचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. आजही कृषी सहली गोपुरीला आवर्जून भेट देतात. नंदकिशोर परब, सरिता धामापूरकर, जया सदडेकर, उमेश जाधव, प्रसाद आचरेकर यांनी गोपुरी आश्रमात नव्या कल्पना राबविण्यासाठी चांगले सहकार्य केले. त्या आश्रमात असताना कोकण दौऱ्यावर आलेले अण्णा हजारे माझ्या खोलीत एक दिवस मुक्कामाला राहिले ही आठवण मी हृदयात जपून ठेवली आहे.