Sunday, August 25, 2013

सरकार सातवा वेतन आयोग कसा पेलेल?

सातवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन केली आहे. वेतन आयोग हा सध्या तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर राज्य सरकारनेही स्वीकारल्या होत्या. राज्यात सर्वसाधारणपणे केंद्र सरकारने महागाई भत्ता जाहीर केला, की तो भत्ता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही लागू केला जातो. गोवा केंद्रशासित प्रदेश असल्यापासूनची ही व्यवस्था घटक राज्य झाल्यानंतरही कायम आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाची घोषणा करावी यासाठी विविध राज्यांतील कर्मचारी संघटनांच्या महासंघाने प्रयत्न सुरू केल्याकडे राज्यातील पन्नासेक हजार कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची तामिली केल्यामुळे सरकारी तिजोरीला बसलेल्या दणक्‍याची झळ (विशेषतः राज्य सरकारांच्या तिजोऱ्या) अजून निवते न निवते तोच सातवा वेतन आयोग स्थापण्याची गरज आहे का, मोठ्या प्रमाणात असलेल्या संघटित रोजगारातही असलेल्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची ही खिरापत काय म्हणून; सहाव्या वेतन आयोगाच्या, कर्मचारी कपातीसंदर्भातील शिफारशींच्या तामिलीचे काय, सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारी वेतनवाढ आणि या कर्मचाऱ्यांची उत्पादकता यांची काही तरी सांगड असते का... या धर्तीच्या प्रतिक्रिया लगोलग खासगीत व्यक्त झाल्या आहेत. या विविध प्रतिक्रियांमधून उमटलेल्या सुरात व्यक्त झालेल्या भावना वास्तव असल्या तरी सरकारच्या मनुष्यबळाशी संलग्न असलेल्या या एका महत्त्वाच्या बाबीची चिकित्सा केवळ इतक्‍या मर्यादित चौकटीतच करणे चुकीचे आहे. उदारीकरण आणि खासगीकरणाच्या काळात "सरकार' आणि "खासगी क्षेत्र' या अर्थकारणाच्या क्षेत्रातील दोन भिडूंच्या कार्यकक्षांची फेरआखणी होते आहे. त्यानुसार सरकारची एकंदर अर्थव्यवहारातील भूमिका बदलते आहे. खासगीकरणाचे ढोल-ताशे कितीही बेभानपणे बडविले तरी संरक्षण, कायदा-सुव्यवस्था-न्यायपालिका, पायाभूत सेवासुविधा, प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रांत सरकारची मध्यवर्ती भूमिका भविष्यातही कायम राहणार आहे. मात्र, सरकारच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल; तसेच उच्च शिक्षित, प्रशिक्षित, कल्पक मनुष्यबळाची सरकारला असणारी गरजही वाढेल. या साऱ्या घडामोडींच्या चौकटीत वेतन आयोग आणि त्याच्या शिफारशींचा विचार होणे यापुढे गरजेचे आहे.
वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे सरकारच्या महसुली उत्पन्न व खर्चाचा मेळ विस्कटून जातो आणि सुटीचा वाढता ढीग बोकांडी बसल्याने एकंदरच सार्वजनिक वित्त व्यवस्थेची घडी पार मोडते, ही बाब वेतन आयोगांच्या संदर्भात हिरिरीने मांडली जाते. या प्रतिपादनात सत्यांश अजिबातच नाही, असे कोणीही म्हणणार नाही. परंतु, या वास्तवाची छाननीदेखील सरकारच्या एकंदर वित्त व्यवहारांच्या व्यापक चौकटीतच केली गेली पाहिजे. सरकारी जमा-खर्चांची एकंदर जडण-घडण, त्यात आजवर होत आलेले बदल, महसुली खर्चाची संरचना, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते याव्यतिरिक्त महसुली खात्यावरील खर्चाच्या अन्य बाबी, सरकारी महसूल, महसूलवाढीचा वेग, हा वेग वाढण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न, एकंदर सरकारी वित्त व्यवस्थेतील बेशिस्त अथवा शिस्त यांसारख्या अन्य आनुषंगिक बाबींचीही काटेकोर चिकित्सा होणे अगत्याचे आहे. अन्यथा, सरकारच्या ढासळलेल्या वित्तीय समतोलाचे खापर फोडण्याचे हुकमी ठिकाण, असे स्वरूप वेतन आयोगाच्या शिफारशींना येईल.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी राज्य सरकारांची-वित्तीय प्रकृती नाजूक बनली, असे विश्‍लेषण केले जाते. हे विश्‍लेषण चुकीचे मुळीच नाही. पण म्हणून पूर्ण सत्यही ठरत नाही. सहाव्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारच्या वित्त व्यवस्थेची प्रकृती "बिघडली' असे म्हणण्यापेक्षा, आयोगाच्या शिफारशींपायी ती "अधिक बिघडली' असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. कारण, सहावा वेतन आयोग स्थापन झाला आणि त्याची अंमलबजावणी 2006 झाली. केंद्र व राज्य सरकारांची वित्तीय प्रकृती बिघडण्यास प्रारंभ झाला तो थेट 1980 च्या दशकाच्या आगेमागे. वित्तीय बेशिस्तीपायी केंद्राच्या वित्तीय तब्येतीची हेळसांड सहावा वेतन आयोग स्थापन होण्यापूर्वीपासूनच सुरू होती. सहाव्या वेतन आयोगामुळे ती सारी हेळसांड डोळ्यांत खूप लागली एवढेच!
सरकारच्या वाढत्या वित्तीय तुटीपेक्षाही अधिक चिंताजनक आहे. ती महसुली तूट. सरकारी कारभार चालविण्यासाठी लागणारा पैसा सरकारी (कर तसेच करेतर) महसुलाद्वारे तिजोरीवर जमा होत होता. मात्र, 1980-81 सालापासून चित्र पालटलेले दिसते. 1980 च्या दशकापासून महसुली खात्यावर सातत्याने वाढती तूट आहे. म्हणजेच, सरकारचा दैनंदिन खर्च चालवण्यासाठीही कर्ज उभारणी करावी लागते आहे. सरकारने वेळोवेळी उभारलेल्या कर्जांवरील व्याजात सतत होत असलेली वाढ, हे महसुली लुटीचे एकमात्र कारण आहे, असा निष्कर्ष काढण्यास जागा आहे. महसुली खर्चातून व्याजाची रक्कम बाजूला काढून उर्वरित खर्च महसुली जत्रेतून वजा केला, तर महसुली खात्यावर तूट दिसत नाही. याचा अर्थ एवढाच की वित्तीय बेशिस्तीपायी वाढलेले कर्ज हे दुखण्याचे खरे आहे.
याचा अर्थ सरकारने कर्ज उभारणी करताच कामा नये, असा अजिबातच नाही. कर्जउभारणी कशासाठी केली जाते आणि कर्जाऊ निधीचा वापर किती उत्पादक पद्धतीने होतो, यावर त्या कर्जाची गुणवत्ता अवलंबून असते. सरकारच्या महसुली तुटीचे सरकारच्या वित्तीय तुटीशी असलेले प्रमाण हे या गुणवत्तेचे द्योतक असते. महसुली तुटीचे एकंदर वित्तीय तुटीशी असणारे प्रमाण वाढत जाते आहे. याचाच अर्थ हा, की कर्जाचा विनियोग अनुत्पादक पद्धतीने, रोजचे हातखर्च भागविण्यासाठी करण्याचा कल, प्रवृत्ती वाढते आहे. परिणामी, कर्जाची परतफेड आणि व्याजाचा भरणा करण्याएवढे किमान उत्पन्न देणारी भांडवली मालमत्ता काही या कर्जाऊ निधीच्या विनियोगाद्वारे निर्माण होत नाही. असे कर्ज अनुत्पादक ठरल्याने त्याच्यावरील व्याजाचा भरणा करण्यासाठीदेखील पुन्हा प्रसंगी नव्याने कर्ज घ्यावे लागते! सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची तामिली झाल्यानंतर या बेशिस्तीची पाळे-मुळे-उपमुळे उघडी पडली इतकेच.
वेतन आयोगांची स्थापना रोखल्याने वा लांबणीवर टाकल्याने आज ढासळलेला वित्तीय समतोल पूर्ववत होऊन सारे कसे एकदम आलबेल होईल, असे समजणे निव्वळ भाबडेपणा ठरेल. उलट, आजच्या कमालीच्या स्पर्धात्मक जगात, चांगले गुणवान, दर्जेदार, प्रशिक्षित आणि कार्यक्षम मनुष्यबळ मिळविण्यासाठी, ते टिकवून ठेवण्यासाठी, यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची कार्यप्रवणता व इच्छाशक्ती बुलंद राखण्यासाठी सरकारला चांगली घसघशीत आकर्षक "पे पॅकेजेस' श्रमांच्या बाजारपेठेत मांडावीच लागतील. तेव्हा, कर्मचाऱ्यांवरील खर्च हा वाढतच राहणार आहे. सरकारपुढे खरे आव्हान असणार आहे ते या वेतनदारांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजविण्याचे, "पे पॅकेज'च्या जोडीनेच त्यांची "प्रॉडक्‍टिव्हिटी'ही वाढविण्याचे!

"शेजाऱ्यांची' गोव्याशी स्पर्धा दखलपात्र

दाबोळीवर नागरी विमाने उतरणे बंद होणार की मोपा विमानतळ हवा की नको, असे वाद नव्याने पुन्हा सुरू झाले आहेत. किनाऱ्यांवर अमली पदार्थांची रेलचेल पुन्हा सुरू झाली असून, माफियाराज सुरू झाल्याचे खुलेआमपणे मान्य केले जात आहे. कसिनो मांडवी नदीतून हटवावे की नको यावरही परस्परविरोधी मते व्यक्त केली जात आहेत. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मराठी-कोकणी असावे अशी सरकारची भूमिका असल्याने इंग्रजी प्राथमिक शाळांचे अनुदान सुरू ठेवावे की नाही यावरही वाद रंगत आहे. माध्यान्ह आहार द्यावा की नको, शाळांची वेळ किती असावी असेही वाद चर्चेत आणले जात आहेत. अधूनमधून प्रादेशिक आराखडा रद्द करा, दुरुस्त करा अशीही हाकाटी पिटली जाते.
केंद्र सरकार सध्या छोटी-छोटी राज्ये तयार करण्याच्या मनःस्थितीत आहे. प्रशासकीय दृष्ट्या आणि विकास करण्यासाठी छोटी राज्ये सोयीची होतात, असा दावा यामागे करण्यात येतो. या न्यायाने गोव्याकडे पाहिल्यास काय दृष्टीस पडते? विकसित राज्य म्हणून राज्याचा देशपातळीवर अनेकदा गौरव झालेला आहे. जागतिक ख्यातीचे पर्यटन केंद्र म्हणून गोव्याने कमावलेल्या नावाला कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. तरीही गोव्याच्या पर्यटनाला मुक्तीनंतरच्या 52 वर्षानंतरही बऱ्याच मर्यादा आहेत, त्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधाही उभ्या राहिलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आरोग्य क्षेत्राचा विकास झाल्याचा दावा केला जात असला तरी आजही प्राथमिक आरोग्य केंद्रे ही बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण पाठविणारी केंद्रे यापलीकडे स्वतःची ओळख निर्माण करू शकलेली नाहीत. रोजगार निर्मितीसाठी सरकारकडेच नजर लावून पाहण्याची वेळ युवकांवर येते याला काय म्हणावे?
राज्यापुढील कटकटी मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. खाणकामावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाने बंदी घातली आणि राज्यावर आर्थिक संकट आल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. राज्य आर्थिक संकटात आहे असे जाहीरपणे मान्य करण्यात आले नसले, तरी केंद्राकडे अतिरिक्त मदतीची मागणी करण्यातच सारे काही आले. खाणकाम आणि पर्यटन यावर अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा होता. खाणकाम बंद झाल्याने आता फक्त पर्यटन क्षेत्रच आर्थिक आधारासाठी शिल्लक राहिले आहे. सरकारकडूनही कसिनो मांडवी नदीबाहेर काढण्यास होणाऱ्या विलंबाला कसिनोंमधून मिळणाऱ्या महसुलाचे कारण सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांत विभागण्यात आलेले अपयश ठळक झाले आहे.
राज्याच्या उत्पन्नाचा स्रोत कोणता असावा हे ठरविण्याचा राज्याला पूर्ण अधिकार असतो. तो वापरण्यासाठी आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी शक्ती खर्ची घालायला हवी होती. मात्र प्रत्येक वर्षी सुरू होणारा नवा वाद आणि त्यावर भूमिका घेण्यात नंतर कोणत्या तरी एका गटाच्या समाधानासाठी निर्णय घेत, दुसऱ्या गटाची नाराजी ओढवून घेण्यात सरकारची आजवरची शक्ती गेल्या अनेक वर्षांत खर्ची पडल्याचे दिसते. राज्य म्हणून असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याइतपत सुविधा येथे तयार होऊ शकलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. सध्या राज्य अवलंबून असलेल्या पर्यटन क्षेत्राचाही विचार केल्यास त्यासाठी लागणारे मासे, चिकन, भाजीपाला, अळंबी आणि हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये दैनंदिन लागणाऱ्या वस्तू या शेजारील राज्यातून येतात हे सत्य आहे.
त्यामुळे त्यातून निर्माण होणारा पैसा स्थानिक अर्थव्यवस्थेत येत नाही. हॉटेल्सची मालकीही गोमंतकीयांकडे असण्याचे प्रमाणही अत्यल्प असल्याचे किनारी भागात फिरताना दिसून येते. त्यामुळे सरकारला कर रूपाने महसूल मिळत असला तरी स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्यात याचा मोठा वाटा नाही, हेही मान्य करावे लागेल.
गेल्या अनेक वर्षात राज्य म्हणून या प्रांताचा सर्वांगीण विकास झाला नसतानाच आता आपलेच शेजारी असलेले बेळगाव, कारवार आणि सिंधुदुर्ग जिल्हे विकासाची गती घेणार असल्याचे दिसते. कारवार आणि त्या परिसरात पर्यटन केंद्रे विकसित करण्यावर कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. गोकर्णमध्ये 10 वर्षांपूर्वी राहण्यासाठी एक चांगले हॉटेल नव्हते. आता तिथे पाच मोठी हॉटेल्स उभी राहिली आहेत. दांडेली लगतचा परिसरही पर्यटनासाठी गेल्या पाच वर्षातच विकसित झाला आहे. गोव्याआधी "रिव्हर राफ्टींग' सुरू करण्याचा मानही दांडेलीला जातो. कारवली उत्सव कर्नाटकात सुरू झाला. शिर्सी, बनवासी परिसरात पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. त्या भागात अद्याप औद्योगिक विकास झाला नसला तरी कर्नाटक सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कारवार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी तरतूद केली आहे. त्या भागातील हातांना काम देण्यासाठी कारवार जिल्ह्यात उद्योजकांनी यावे, यासाठी काही गोमंतकीय उद्योजकांशी तेथील जमीन मालकांनी यापूर्वीच बोलणीही केली आहे. गणेश चतुर्थीनंतर हे उद्योजक तेथे जमीन पाहणीसाठीही जाणार आहेत. विशाल गोमंतक कल्पनेचे समर्थन करतेवेळी तेथील जमीन विकासासाठी उपलब्ध होईल, अशी कल्पना मांडण्यात आली होती. मात्र आता तेथील लोकांनी आपला विकास साधण्यास सुरवात करण्याचे ठरविल्याचे दिसते. कारवारचा आशिया खंडातील सर्वांत मोठा नौदल तळ, कैगा येथील अणुभट्ट्या यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला थोडी का होईना सध्या गती मिळालेली आहे. त्यामुळे गोव्याशी स्पर्धा करण्यासाठी हा विभाग सज्ज होत असल्याचे दिसून येते.
शेजारील सिंधुदुर्ग जिल्हाही पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात लगतच्या गोव्याला स्पर्धा करण्यासाठीची तयारी करू लागला आहे. गोव्याइतकीच या जिल्ह्यात नैसर्गिक क्षमता आहे, मात्र आतापर्यंत त्याचा वापर होत नव्हता. गेल्या आठ-दहा वर्षात या दिशेने सिंधुदुर्गाची पावले पडू लागली आहेत. गोवा आणि सिंधुदुर्ग यांच्यात भौगोलिकदृष्ट्या बरेच साम्य आहे. असे असले तरी गोव्यात पर्यटन, खाण उद्योग अनेक वर्षांपासून रुजला आहे. गेल्या काही वर्षात उद्योगातही गोव्याने बाजी मारली आहे. सिंधुदुर्गात गोव्यासारखी प्रगती करण्याचे स्वप्न आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी दाखविले, त्या दिशेने प्रयत्न मात्र झाले नाहीत. आता विकासाच्या कक्षा सगळीकडेच रुंदावू लागल्या आहेत. याला सिंधुदुर्गही अपवाद नाही. या ठिकाणी गावोगाव मूलभूत सुविधा पोहोचल्या आहेत. यामुळे पर्यटनही वाढू लागले आहे. भविष्यात गोव्याचे पर्यटन सिंधुदुर्गापर्यंत विस्तारणार आहे. मोपा येथे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळही सिंधुदुर्गाजवळ आहे. यामुळे पर्यटन सिंधुदुर्गाच्या दिशेने झेपावायला संधी आहे.
उद्योग क्षेत्राबाबत आतापर्यंत गोव्याशी स्पर्धेचा सिंधुदुर्गने विचारही केला नव्हता. येथे उद्योग, व्यवसाय फारसे टिकत नाहीत असा समज होता. मात्र आता महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्रालय सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांच्याकडे आहे. त्यांनी गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या दोडामार्ग तालुक्‍यात एमआयडीसी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी आडाळी, केर या गावांमध्ये जागेसाठी चाचपणी सुरू आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात एक हजार उद्योग आणण्याचे नियोजन आहे. गोव्यातील उद्योग क्षेत्रात कार्यरत बहुसंख्य कामगार सिंधुदुर्गातील आहेत. येथील हॉटेल व्यवसायातील कामातही सिंधुदुर्गातील तरुणांचा भरणा मोठा आहे. सिंधुदुर्गात पर्यटन व उद्योग विकास झाला तर तेथील तरुणांना सिंधुदुर्गातच काम मिळेल. गोव्यालगत एमआयडीसी झाली तर विविध कंपन्यांना लगतच्या गोव्यातील दळण-वळण व इतर सुविधांचा उपयोग होऊ शकेल.
एकूणच सिंधुदुर्ग गोव्याशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला आहे. गोव्यात वाढीला मर्यादा असल्याने या ठिकाणी पर्यटन व उद्योग क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आहे. त्यामुळे गोव्याने गाफील राहण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.

Tuesday, July 23, 2013

महासागर माझा सखा!

सागराचे सौंदर्य आणि विविधता ही मानवाला मिळालेली देणगीच आहे. निसर्गाचा हा समतोल किती नाजूक आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी. अत्यंत नाजूक अशा पर्यावरण व्यवस्थेवर होणारे प्रतिकूल परिणाम किमान प्रमाणात राहतील अशा पद्धतीने आमच्या जीवन पद्धतीत बदल घडवून आणणे हाच संदेश आम्ही सागराकडून घेतला पाहिजे.
सागरी प्रदूषणाचा मानवी जीवनाशी थेट संबंध आहे. मानवासाठी उपलब्ध जल स्त्रोत्रांपैकी एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणून आज सागरजलाकडे पाहिले जाते. समुद्रजलावर सौरशक्ती प्रक्रिया करून ते पिण्यासाठी उपलब्ध करून एकमेव पर्याय आज जगातील बऱ्याच देशासमोर राहिला आहे. आज सहापैकी एका व्यक्तीला शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. भावी काळात हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नद्या अडवून प्रचंड मोठी धरणे उभारणे हे दिवसेंदिवस खर्चिक होत चालले आहे. त्यात पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याचा धोकाही जास्त असतो. म्हणून समुद्राचे पाणी खेचून प्रक्रियेद्वारे पुरवठा करणे अधिक स्वस्त आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर सागरांचे वाढते प्रदूषण हा कळीचा मुद्दा ठरला आहे. गेल्या तीस वर्षात तर प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येते. प्रमुख्याने तेल, सांडपाणी, कचरा, रसायने किरणोत्सर्गी पदार्थ वगैरे समुद्रात सोडल्यामुळे सागरी प्रदूषण वाढीस लागते. सागरी प्रदूषणामुळे तेथील सागरी जीवसंपत्तीवर विपरीत परिणाम होणे ओघानेच आलेच. हल्ली मृत मासे किनाऱ्यावर थडकण्याचे प्रमाणही वाढले आहे. 1944 पासून अणुशक्तीद्वारे वीजनिर्मिती आणि अण्वस्त्रे यांचे उत्पादन वाढले आहे. यातून निर्माण होणारा किरणोत्सर्गी पदार्थ मिश्रित कचरा समुद्रात फेकला जातो. आता यावर एका सर्वंकष कराराद्वारे बंदी आलेली असली तरी अशा छोट्या छोट्या घटना डोळ्याआड घडतच राहातात.
ते टाळण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी सागरी प्रदूषणाला आळा घालण्याच्या प्रयत्नात सामान्य माणसालाही हातभार लावता येईल. घरगुती पातळीवर रसायनांचा कमीत कमी वापर करावा. कमीत कमी सांडपाणी तयार होईल याची काळजी घ्यावी. कागदाचा वापर शक्‍यतो कमी करावा. रंगाचा वापर अधिक प्रमाणात करू नये. प्लास्टिकचा वापर टाळावा. इंधन वाचेल अशा प्रकारे गाडी चालवावी आदि अन्य प्रदूषण कमी करण्याचे उपाय हे समुद्री प्रदूषण आटोक्‍यात आणण्यास उपयुक्त ठरतात. कारण प्रदूषण कोणतेही असो, परंतु त्याचे दुष्परिणाम सारखेच असतात.
पृथ्वीचा दोन तृतीयांश भाग महासागराने व्यापला आहे. जीवनदायी पावसापासून जीवसंरक्षक औषधांपासून नित्याच्या भोजनात असलेल्या समुद्री अन्नापासून वाहतुकीच्या किफायतशीर सुविधांपासून ते आमच्या जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या प्राणवायूच्या पुरवठ्यापर्यंत मानवी जीवनातल्या सर्वच बाबतीत महासागर एक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. खरे तर मानवाच्या अस्तित्वासाठी महासागर ही निकडीची गरज आहे.
सागर संपत्तीदिनाच्या निमित्ताने सागराच्या जीवनदायी भूमिकेची पुन्हा एकदा जाणीव करून देण्याची ही संधी आहे. 10 वर्षापूर्वी रिओ- द जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वसुंधरा शिखर परिषदेत महासागर दिवस साजरा करण्याची कल्पना पुढे आली आणि त्यातून गेल्या दहा वर्षाच्या काळात सागरी संपत्तीबाबत फार मोठी लोकजागृती घडवून आणणे शक्‍य झाले आहे.
उपाहारगृहात उपलब्ध होणाऱ्या समुद्री अन्नाच्या मूळ स्त्रोताबाबतचा तपशील जाणून घेणे, गाडी धुताना किंवा झाडांना पाणी देताना पाण्याची बचत होईल याकडे लक्ष देणे, घरगुती स्वरूपातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, टाकाऊ पदार्थांचे नीट व्यवस्थापन करणे, त्यांचा पुन्हा पुन्हा उपयोग करणे किंवा त्यांचे कंपोस्ट खतांमध्ये रूपांतर करणे, वाहनांपासून होणारे प्रदूषण आटोक्‍यात ठेवणे, महासागरातील प्राणी जीवनाचे संरक्षण करणे, समुद्री पक्षी, कासवे, आणि त्यांच्या प्रजनन स्थळांचे संरक्षण करणे,किनारा स्वच्छता किंवा अशा प्रकारच्या अन्य सागर स्वच्छतेशी निगडित कार्यक्रमात सहभागी होणे आदी कार्यक्रमातूनही कोणीही सागराशी आपले नाते जोडू शकतो.
किनारा स्वच्छता कार्यक्रम हाती घेणे हा एक आनंददायी उपक्रम. अतिशय सोपा परंतु खूपच परिणामकारक. किनाऱ्यावर फेरफटका मारताना एका माणसाने किनाऱ्यावरची वस्तू उचलून तिची योग्य विल्हेवाट लावण्यापासून संपूर्ण समाजाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विशिष्ट लांबीच्या किनाऱ्याची स्वच्छता करण्यापर्यंत उपक्रम राबवता येईल. किनारा स्वच्छता हा उपक्रम केवळ सागरी किनाऱ्यावरच राबवावा असे मात्र नव्हे. एखाद्या तलावाच्या काठी, नदीच्या किनाऱ्यावर किंवा एखाद्या सामाईक अशा जलस्त्रोतांपासून वाहणारे पाणीच पुढे सागराला मिळत असते आणि म्हणून या स्त्रोतांची स्वच्छता ही देखील सागराच्या स्वच्छतेएवढीच महत्त्वाची आहे. महासागरांचे संरक्षण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. समस्या निर्माण करण्याच्या कामी जर आपण सर्वजण जबाबदार असू तर या समस्येच्या सोडवणुकीसाठी उपाय योजना राबविण्यातही आमच्या सर्वांचे योगदान आवश्‍यक आहे.

Friday, July 19, 2013

लढाई, बिबट्या आणि माणसाची

राज्यातील वनक्षेत्र वाढल्याचा दावा वनखाते करते. दुसऱ्या बाजूने बिबटे मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी असल्या तरी त्या गोष्टी खऱ्या आहेत. बिबटे आणि मानवाचा संघर्ष का होऊ लागला आहे याचा विचार न केल्यास यातून अनेक प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे.
बिबटे शहरात घुसले ही बातमी आता टीव्हीवर पाहण्याइतपत मर्यादित राहिलेली नाही. आपल्या आसपास बिबटे वावरू लागले आहेत. गोव्यात सध्या बिबटे लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. एरवी दाट जंगलात वावरणारा बिबटा लोकवस्तीत घुसण्याचा सिलसिला गोव्यात दहाएक वर्षांपूर्वी सुरू झाला. सिकेरी येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या हेलिपॅडवर आढळलेला बिबटा नंतर गोव्यातील वेगवेगळ्या भागांतील लोकवस्तीमध्ये दिसू लागला. दाबोळीच्या नौदल तळावरही आठनऊ वर्षांपूर्वी बिबटा सापडला होता. नंतर बांबोळी येथे महामार्ग ओलांडत असलेल्या बिबट्याचे दर्शन घडले होते.
अलीकडच्या काही वर्षांत बिबट्याचे दर्शन ही दुर्मिळ बाब राहिली नाही. वाळपई, डिचोली, पेडणे, सासष्टी, केपे व काणकोण या परिसरात बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकायला मिळतात. सासष्टीतील राय, कुडतरी, चांदर, पारोडा, सारझोरा, चिंचोळणे, नुवे या भागात बिबट्यांचा सर्रास वावर आहे. घाटमरड-चांदर येथे तर पाचसहा बिबटे आहेत. वनखात्याने या भागात अनेक वेळा सापळे लावले. पण, या बिबट्यांना पकडण्यात यश आले नाही. बिबटा हा मार्जार कुळातील सर्वांत बिलंदर प्राणी आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्यास बिबटा वाकबगार मानला जातो. म्हणूनच चिता व पट्टेरी वाघांची संख्या कमी होत असताना बिबट्यांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसते. गोव्यात 41 बिबटे असल्याची वनखात्याकडे नोंद आहे. पण, या संख्येपेक्षा तिप्पट बिबट्यांचा गोव्यात वावर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. इतर राज्यांतही बिबटे लोकवस्तीत घुसण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दाट लोकवस्तीच्या मुंबईतही बिबटे सापडले आहेत. सहसा माणसावर हल्ला न करणारा बिबटा नरभक्षक बनल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. हुबळी येथे तीन चार वर्षांपूर्वी बिबट्याने दोन मुलांना ठार केले होते. उत्तराखंडातील तेहरी व छमोली या गावात गेल्या वर्षी दोन नरभक्षक बिबट्यांना वनखात्याने ठार मारले. तर तेहच्या डोंगराळ भागात सहा बिबटे नरभक्षक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गोव्यात डुकरे, कुत्री व मांजरे या पाळीव प्राण्याच्या रूपात बिबट्याला मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. विशेषतः डुकरे हे बिबट्यांचे आवडते खाद्य असल्याचे दिसून आले आहे. तरी बिबट्याची माणसाला भीती ही वाटतेच. याच भयातून आगशी येथे एका बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावणारा बिबटा लोकवस्तीत का घुसू लागला याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. बिबटा माणसांच्या वस्तीत नव्हे, तर माणूस बिबट्यांच्या वस्तीत घुसू लागलाय असा प्राणीप्रेमींचा युक्तिवाद आहे आणि त्यात बरेच तथ्यही आहे.
बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात असे अनेक वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला खडतर कष्ट करावे लागतात. त्यातही मांसाहारी प्राण्यांना जास्त. कारण त्यांना शाकाहारी प्राण्यांप्रमाणे आयते अन्न उपलब्ध नसते. आधी भक्ष्य शोधावयाचे, त्याच्या मागावर जायचे, अनुकूल संधी शोधायची आणि मग हल्ला करून शिकार साधायची हे प्रत्येक मांसाहारी प्राण्याला अपरिहार्य असते. एवढे करूनही भक्ष्य मिळण्याची शक्‍यता तुलनेने कमीच. मार्जार कुळात सिंह, वाघ, बिबट्या आणि जॅग्वार (दक्षिण अमेरिका) हे खरे "बडे' सदस्य म्हणावे लागतील. "परिपूर्ण शिकारी' अशीच त्यांची खरी ओळख आहे. त्या तुलनेत फाटकी शरीरयष्टी, लहान आकार आणि कमी वजनामुळे चित्ता दुय्यम ठरतो, त्यामुळे मार्जार कुळातल्या उपकुळात त्याचा समावेश झाला आहे. या सर्वांनी अधिवासही जणू वाटून घेतले आहेत. सिंह कळपाने राहतो म्हणून तो खुरट्या जंगली किंवा मैदानी प्रदेशात वावरतो. वाघाला दाट जंगल पसंत आहे. बिबट्याने मात्र कोणताही भेदभाव न करता मिळेल ते स्थान आपले असे धोरण ठेवले आहे. उग्र आणि कावेबाज स्वभावामुळे बिबटे मात्र नरभक्षक होतात. जिम कॉर्बेटचा रुद्रप्रयागचा, केनेथ ऍण्डरसनचा गुमालपूरचा हे नरभक्षक बिबटेच होते. त्यामुळे काणकोणच्या गावडोंगरीत बिबट्याने माणसावर हल्ला केला यात कोणतेही नवल नाही.
मुळात बिबटे मानवी वस्तीत येऊ नयेत म्हणून वन खाते कोणतीही उपाययोजना करत नाही हा खरा प्रश्‍न आहे. मानवी वस्तीत बिबटा शिरला की तेथे पिंजरा लाव त्याला पकड आणि जंगलात सोड असे वनखात्याचे बिबट्यांबाबतचे सध्याचे धोरण आहे. शिकारीसाठी लोकवस्तीमधील पाळीव जनावरांना लक्ष्य करणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करण्याचे सत्र वन खात्याने सुरू केले आहे. परंतु हे बिबटे जंगलातून लोकवस्तीत घुसण्यामागची कारणे कोणती व त्यावरील उपाय यावर वन खात्याने गांभीर्याने विचार केलेला नाही. बिबट्यांना जेरबंद करून दुसऱ्या जंगलात सोडल्यावर जंगलातील अन्नसाखळीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. मात्र बिबट्यांच्या समस्येवर शास्त्रीय तोडगा काढण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. गावात बिबट्याचा उपद्रव सुरू झाला, की वन खाते त्याठिकाणी सापळा रचून बिबट्याला पकडून अन्य जंगलात सोडून देते. वन खात्याची ही प्रक्रिया काही वर्षांपूर्वी ठीक वाटायची, परंतु आता बिबटे लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. वन खात्याचे अधिकारी हे बिबटे नेऊन दुसऱ्या जंगलात सोडताहेत. यामुळे ज्या जंगलात पकडण्यात आलेला बिबटा राहतो, तो परिसर मोकळा राहतो, अन्‌ ज्या जंगलात उपद्रवी बिबटे सोडले जातात त्याठिकाणी पूर्वीचा बिबटा व खात्याने सोडलेला बिबटा आल्यामुळे तेथील अन्नसाखळीवर परिणाम होऊ शकतो.
बिबट्यांची नैसर्गिक संचार पद्धती त्यांच्या कृत्रिम स्थलांतरणाने बदलल्यास भविष्यात त्यांच्या एकूण अधिवासावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. बिबटा हा क्षेत्रीय प्राणी (टेरिटोरियल) असल्यामुळे आपले संचार क्षेत्र हा प्राणी आखून घेतो. त्या क्षेत्रात दुसरा बिबटा घुसत नाही. अशा परिस्थितीत बिबटाविरहित जंगलपट्ट्यात दुसऱ्या क्षेत्रातील बिबटा सहजपणे शिकार मिळत असल्याने संचार करतो. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना जंगलामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे असा समज होतो. लोकवस्तीमध्ये बिबट्यांचा संचार वाढला आहे, याचे कारण बिबट्यांची संख्या वाढली आहे, असे नव्हे तर विकासाचे लोण जंगलापर्यंत पोचल्यामुळे बिबट्यांचे अस्तित्व लोकांना सातत्याने जाणवू लागले आहे.
बिबट्या दिसला, बिबट्याने हल्ला केला, बिबट्यासारखा प्राणी दिसला, या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच अफवा हल्ली सर्वांच्या कानावर पडत आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यात पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या डोक्‍यात बिबट्या चांगलाच भिनला आहे. तथापि बिबट्यापेक्षा साधारणपणे बिबट्यासारखाच दिसणारा "तरस' हा प्राणी जंगल परिसरात परिसरात अधिक आढळतो, हे वास्तव आहे. बिबट्यासारखा प्राणी दिसला अशा घटना बऱ्याच घडल्या आहेत. बिबट्यासारखा प्राणी ज्यांनी पाहिला, त्यांनी ती साधारण संध्याकाळची वेळ सांगितली आहे. मात्र बिबट्या दिवसासुद्धा शिकार करतो आणि तरस फक्त रात्रीच्या वेळी शिकार शोधण्यासाठी बाहेर पडतो. बिबट्याला अशा अफवांमुळे बदनाम करणारा तरस हाच प्राणी आहे.
"निसर्गाचा सफाई कामगार' असे संबोधले जाणारे तरस साधारणपणे करड्या-तपकिरी रंगाचे असते. त्यावर आडवे धुसर पट्टे असतात. त्यामुळे तो साधारण पट्टेरी वाघाच्या किंवा बिबट्याच्या बछड्यासारखा दिसतो. प्रत्यक्षात बिबट्याचा रंग तांबूस पिवळसर असून त्यावर काळे ठिपके असतात. पाळीव जनावरांना असला तरी तरसापासून माणसाला तसा धोका नाही. शिवाय राजबिंडा बिबट्या आणि कुत्रा वर्गातील तरस यांची तुलना होऊच शकत नाही. मात्र मुळात सर्वांच्या मनात बसलेली बिबट्याची भीती आणि रात्रीच्या अंधारात लांबून भासणारे दोघांच्या बाह्यरूपातील काहीसे साम्य, यामुळे लोक तरसालाच बिबट्या समजून भेदरून जातात. त्यामुळे पावलांचे ठसे घेऊन वन खात्याने याबाबत लोकांना सत्य नेमके काय हे सांगण्याचीही वेळ आली आहे.

Thursday, June 27, 2013

फणसाख्यान

गोवा विद्यापीठातील डॉ. नंदकुमार कामत यांनी एक ईमेल पाठविले. त्यात केरळमध्ये झालेल्या फणस महोत्सवाची निमंत्रण पत्रिका होती आणि त्या महोत्सवाची एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीची लिंक होती. त्यामुळे फणसापासून किती प्रकारचे पदार्थ केले जाऊ शकतात याची कल्पना आली. आंबा, काजूची व्यावसायिक लागवड केली जाते मात्र फणसाची तशी लागवड केली जात नाही. फणसाचे झाड वर्षानुवर्षे पीक देऊ शकते. नैसर्गिकरीत्या उगवलेल्या झाडापासूनच उत्पन्न घेतले जाते.
गोव्याबरोबरच फिलिपिन्स, श्रीलंका, मलेशिया येथे फणस मोठ्या प्रमाणात आढळतात.
फणसाचे कापा आणि बरका असे दोन प्रकार आहेत. यातील कापा फणस अधिक लोकप्रिय आहे. याचे गरे पिवळे धम्मक व घट्ट असतात. याची चव अप्रतिम असते. शिवाय तो अधिक काळापर्यंत टिकतो. साधारण पक्व झाल्यानंतर तीन ते चार दिवसापर्यंत हा फणस खाण्यायोग्य असतो. बरक्‍या फणसाचे गरे मऊ असतात. या गऱ्यांनाही चांगली चव असते. मात्र हा फणस पक्व झाल्यानंतर जास्त काळ टिकत नाही. या फणसाच्या गऱ्यांचा वापर सर्रास प्रक्रिया उद्योगासाठी केला जातो. फणस साधारण फेब्रुवारीपासून लागायला सुरवात होतात. मार्चच्या मध्यापासून फणसाचे खऱ्या अर्थाने उत्पन्न मिळायला सुरवात होते. अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा हंगाम चालतो. फणसाच्या झाडापासून साधारण आठ ते दहा वर्षापासून उत्पन्न मिळायला सुरू होते. फणस कापा असणार, की बरका हे तो लागेपर्यंत सांगणे कठीण असते. या झाडाला खूप पाण्याची आवश्‍यकता नसते. याचा वृक्षही मोठा डेरेदार आणि दाट सावली देणारा असतो. फणसाच्या झाडाचे आयुष्यही 80 ते 100 वर्षापर्यंत असू शकते. त्यापेक्षाही जास्त काळ झालेले वृक्ष गोव्यात अनेक ठिकाणी आहेत. झाड जितके जुने तितके त्याचे इमारती लाकूड अधिक किमती असते. याच्या लाकडाला जास्त किंमत असल्याने गेल्या काही वर्षात फणसाच्या झाडांची तोड वाढली आहे.
काजू, आंबा, कोकम यांची तुलना करता फणसाचा प्रक्रिया उद्योगात तितकासा उपयोग होताना दिसत नाही. फणसाचे गरे खाण्याबरोबरच कच्च्या फणसाच्या गऱ्यांपासून बनविलेली भाजी लग्नाच्या हंगामात जास्त लोकप्रिय असते. फणसाच्या हंगामात ग्रामीण भागात सर्रास पेज आणि फणसाची भाजी असा आहार अगदी रोज घेतला जातो. फणसाची भाजी अतिशय रुचकर आणि आरोग्यदायक असते.
या बरोबरच बरक्‍या फणसापासून फणसपोळी, फणसाचे साठे असे पदार्थ बनविले जातात. अलीकडे फणसाचे चिप्ससुध्दा बनविले जातात. कच्चे गरे सुकवून त्याची भाजीही करता येते. अतिशय रुचकर फळ असूनही गोव्यात तरी ते दुर्लक्षित राहिले आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण प्रॉलिफीक ही फणसाची नवी जात विकसित केली आहे. हा अतिशय रुचकर आणि कापा फणस आहे.

Sunday, February 17, 2013

माऊलीची महती

 संत मुक्ताबाई नसत्या तर संत ज्ञानेश्‍वर घडलेच नसते. पूर्वी स्त्री-पुरुषांमध्ये भेद व्हायचा. तो भेद दूर करण्यासाठी संतांनी त्या काळापासून प्रयत्न केल्याचे दिसून येते. स्त्रियांना मिळालेले अधिकार हे कोणत्याही आंदोलनातून मिळालेले नाहीत. स्त्रीने आपल्या बुद्धीच्या बळावर हे अधिकार मिळविले आहेत. त्यामुळे संतांच्या काळापासून स्त्रियांना महत्त्व दिले गेले आहे. आर्थिक स्थैर्य नव्हते म्हणून पूर्वी स्त्रिया चूल आणि मूल यामध्ये अडकल्या होत्या. आजची स्त्री प्रगल्भ बनली आहे. निर्णय घेण्याची क्षमता स्त्रियांमध्ये आली आहे. आज समाजात स्त्रियांना मानाचे स्थान मिळत आहे; परंतु इतिहास पाहिला तर संतांनी स्त्रियांना पुरुषांबरोबरचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्रिया पूर्वीपासूनच सक्षम आहेत, हे सिद्ध होते. सातशे वर्षांपूर्वी संतांच्या संमेलनाची सूत्रे एका स्त्रीकडे देण्यात आली होती. संतांच्या पहिल्या संमेलनात संत ज्ञानेश्‍वरांनी दासी असलेल्या जनाबाईंकडे संमेलनाची सूत्रे सोपविली होती. महिला संतांचे श्रेष्ठत्व कुणालाही कळले नव्हते. ते त्या काळी संत ज्ञानेश्‍वरांना कळले होते. त्यामुळे स्त्रियांना कमी लेखणे चुकीचे ठरेल. स्त्री संतांच्या साहित्याचाही प्रचार व्हायला हवा. पूर्वी स्त्रियांना जो सन्मान होता तो आज राहिलेला नाही. स्त्रियांकडे वासनेच्या नजरेने पाहिले जाते. पुरुषांची ही दृष्टी बदलली पाहिजे. स्त्रियांकडे माऊलीच्या दृष्टीने पाहिले जायचे. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. सोयरा आणि निर्मळा, मुक्ताबाई, जनाबाई आदींनी आपल्या बुद्धीच्या बळावर आपले स्थान निर्माण केले होते. त्यांनी जी उंची गाठली ती कुणालाही शक्‍य होणार नाही. महिला संतांच्या साहित्याचा अभ्यास करून महिलांना स्वावलंबी बनण्याची प्रेरणा मिळू शकेल. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री संतांची शिकवण आणि विचार महत्त्वाचे ठरतात.

Tuesday, January 15, 2013

चकन दा बाग

जम्मू काश्‍मीरमधील ऑक्‍ट्रॉय या भारत पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेला भेट दिल्यानंतर पीर भद्रेश्वर येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट दिली. पण त्याच वेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही आंतरराष्ट्रीय सीमेसारखी व्यवस्था असेल असे मला वाटले नव्हते. धुळीने भरलेल्या रस्त्यावरून (मागे पुढे डझनभर कमांडोंसह) सहा तासांच्या प्रवासानंतर पूंछमध्ये पोचल्यावर काय दृष्टीस पडले तर उंचच उंच डोंगररांगा आणि केविलवाणा बाजार. त्यावरून त्या परिसराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज आल्यावाचून राहिला नाही.
पूंछवरून विसेक किलोमीटरवर चकन दा बाग हे भारताचे शेवटचे ठाणे. त्या पलीकडे रावलाकोट हे पाक व्याप्त काश्‍मीरमधील गाव. सध्या चकन दा बाग भागातील लोक वगळता बाहेरच्या लोकांसाठी या परिसरात प्रवेश निषिद्ध. कारण ही आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. अवघ्या काही मीटरवर पाकिस्तानी लष्कर (रेंजर्स नव्हेत) मशिनगनच्या चापावर बोट ठेवून खडे. आपल्याकडेही तसेच चित्र. कुठून केव्हा गोळी सुटेल व गोळ्यांचा वर्षाव सुरू होईल हे सांगणे महाकठीण काम. तसेच सीमावर्ती भाग भू सुरूंगांनी भरलेला. एखाद्या नको त्या ठिकाणी पाय पडला तर जीवच गमवावा लागायचा (नाहीतर पाय गमवावा लागणे हे ठरून गेलेलेच). त्यामुळे मी तेथे जाण्याअगोदर सोबत असलेल्या मेजरचा सल्ला तंतोतंत पाळण्याबाबत वारंवार सूचना करायला वरिष्ठ लष्करी अधिकारी विसरले नाहीत. सुरुंग कुठे आहेत याचे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार फलक लावलेले असतात तरी प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य तशीही स्थिती असते. त्यामुळे रस्ता सोडून विशेष म्हणजे मेजरची साथ सोडून कुठे जाऊ नये असे सांगण्यात आले.
काश्‍मिरी जनतेला पाकव्याप्त काश्‍मीरमधील आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी (पाकव्याप्त काश्‍मीरमधील लोकांना काश्‍मीरमधील नातेवाइकांनीही भेटण्यास येण्यासाठी) तीन मार्ग खुले करण्याबाबत भारत पाकिस्तानचे एकमत झाले. त्यापैकी एक मार्ग उरी येथून खुला करण्यात आला. दुसरा मार्ग चकन दा बाग येथून खुला करण्यात आला, तिसरा मार्ग मागे लिहिल्याप्रमाणे (जम्मू सियालकोट) ऑक्‍ट्रॉय येथून खुला होणार आहे. चकन दा बाग हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा परिसर असल्याने तेथे निर्मनुष्य प्रदेश (नो मेन्स) नाही. भारताचे नियंत्रण संपते त्या दुसऱ्या इंचालाच पाकिस्तानचे नियंत्रण सुरू होते. तेथे आंतरराष्ट्रीय सीमेसारखे फाटक बसवावे अशी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. पण सरकारी इच्छेमुळे ते शक्‍य झाले आहे. चकन दा बाग येथील घनदाट अरण्य साफ करून तेथे आता हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरण केलेला रस्ता अस्तित्वात आला आहे. दोन्ही बाजूला फाटके बसविण्यात आली. फाटकांना समांतर अशी तारेच्या कुंपणाचीही व्यवस्था करण्यात आली. एमिग्रेशनचा परवाना देण्यासाठी आता प्रशस्त कार्यालयही चकन दा बाग येथे सुरू करण्यात आले आहे.
महिन्यातून दोन सोमवारी पाकिस्तानकडून चाळिसेक नातेवाइकांना भारतात प्रवेशासाठी पाठविले जाते. तेवढेच नातेवाईक भारताकडूनही पलीकडे पाठविले जातात. एरव्ही या लोकांना पाकिस्तानात जाण्यासाठी पंजाबमधील वाघा सीमेवरून पाकिस्तानात जाऊन पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये यावे लागत असे वा त्याच पद्धतीने पलीकडच्या लोकांनाही द्राविडी प्राणायामाचा अनुभव येत असे. आता या सीमेवरून (चकन दा बाग) फक्त जम्मू काश्‍मीरमधील लोकच पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊ शकतात, त्यासाठीही सीमेपलीकडे नातेवाइकांची यादी देऊन त्या नातेवाइकांनीही या प्रवासाला मान्यता द्यावी लागते. हीच पद्धती तेथून भारतात येणाऱ्यांसाठीही लागू आहे.
चकन दा बाग येथे मला स्थानिक ग्रामस्थ महमद बशीर यांची भेट घेता आली. ते म्हणाले, भूकंपाने अर्ध्याअधिक चकन दा बागला उद्‌ध्वस्त केले होते. आता कुठे ते सावरू लागले आहे. तेथील जनतेने सारे पाहुणे सीमेपलीकडे आहेत. भारतातील व्यक्ती हिंदू तर पाक व्याप्त काश्‍मिरातील भाऊ मुस्लीम अशीही अनेक उदाहरणे आहेत. आता सीमेपलीकडे महागाईने कहर केल्याने दैनंदिन चीजवस्तू घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांकडे येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही या माहितीस दुजोरा दिला. कपडे व धान्यही वाहून नेता येईल तितके नेले जाते. विचारणा केली तर नातेवाइकांनी भेट दिली असे सांगितले जाते. पाच महिन्यांपूर्वी येथे फाटक करकरले त्या वेळी पाकव्याप्त काश्‍मीरमधील लोक मोठ्या संख्येने भारतात प्रवेश करण्यासाठी धावून आले होते, अशी आठवणही बशीर यांच्याकडून ऐकता आली.
अशा या चकन दा बागला भेट दिली त्या वेळी पाकिस्तानने काश्‍मिरी बांधवांचे स्वागत आहे असा लावलेला फलक ठळकपणे दृष्टीस पडला. दुसऱ्याच फलकावर ला इलाह इल्लीलाह असे लिहिले आहे. भारताने मात्र मजहब नही सिखाता आपस में बैर रखना आणि सर्वांचे स्वागत असे फलक लावले आहेत.
त्याच रात्री चकन दा बाग येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तारेच्या कुंपणापलीकडे पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या तिसेक मीटरवर लष्करी ठाण्यात राहण्याची संधी मला मिळाली. रात्री मी गस्तही घातली (बाकी तपशील गोपनीयतेच्या शपथेमुळे देता येत नाही). शेजारून वाहणारा ओढा पाकव्याप्त काश्‍मीरच्या दिशेने वाहत होता. रात्रीच्या अंधारात ओढ्याचा आवाज काळजाला भिडत होता. ओढ्याप्रमाणेच दोन्हीकडच्या माणसांच्या मनाचा प्रवास होत असेल अशी कवी कल्पना मला स्पर्शून गेली. सकाळ झाली नि चकन दा बागचे सुनेपण अंगावर आले नि मी परतीच्या प्रवासाला निघालो.